पुणे, दि.२९ : शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदी, दुरुस्तीच्या प्रलंबित अर्जांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून निवृत्तिवेतनासारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यानंतरही महापालिका प्रशासन गतीने कारभार करत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. त्यासंबंधी उत्तरे देताना प्रशासनाची तारांबळ उडाली.प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड दरम्यान, जन्म-मृत्यू दाखल्यासंबंधीच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) २०१९ पासून कार्यान्वित झाली आहे. मात्र काही महिन्यांपासून संबंधित प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिले. डॉ. बोराडे या खोटी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही या प्रश्नाकडे आरोग्य विभाग गांभीर्याने पाहत नसल्याची सद्यःस्थिती आहे. नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दाखल्यांच्या प्रश्नावरून प्रशासनास कोंडीत पकडले. शिंदे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होऊन सात महिने झाले. तरीही त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप मृत्यू दाखला मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतनापासून वंचित रहावे लागले आहे. दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालयांमधील प्रवेश रखडले आहेत.’’ सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राज्य व केंद्र शासनाच्या नव्या नियमांमुळे काही निर्बंध लागू झाल्याचे सांगत, नियमांच्या चौकटीत नागरिकांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी आयुक्तांनी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यासंदर्भात तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले.

