पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेअंतर्गत Enumeration Form (गणना पत्र) भरून नुकतेच बूथ लेव्हल ऑफिसर (BLO)कडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. हा अधिकार अबाधित राहण्यासाठी मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेत प्रत्येक नागरिकाने ३० जुलै पर्यंत स्वतःचे गणना पत्र भरून ते आपल्या बीएलओकडे वेळेत जमा करावे.”
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाची ही मोहीम म्हणजे मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. मतदार यादीतील माहिती अद्ययावत राहिल्यास निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता अधिकृत सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रांसह गणना पत्र भरावे आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
दरम्यान, दर सहा वर्षांनी होणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु असून, त्यासाठीही पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपली नाव नोंदणी करावी, असेही त्यांनी यावेळी सर्वांना आवाहन केले.

