आयआयटी संचालक डॉ. शिरीष केदारे
पुणे,
संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची किंवा बौद्धिक कसरत करण्याची प्रक्रिया नसून, समाज परिवर्तनाच्या संधी निर्माण करणारी व्यापक प्रक्रिया आहे. संशोधनात केवळ तंत्रज्ञान विकसित करून चालत नाही, तर त्यामागे सामाजिक संदर्भ, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाचा विचार असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) संचालक डॉ. शिरीष केदारे यांनी केले.
डीईएस पुणे विद्यापीठ,सम्यक समाज अध्ययन, क्षमता संवर्धन केंद्र आणि सस्टनॅबिलीटी इनिशिएटीव्ह यांच्या वतीने ‘सम्यक-पाठयवृत्ती योजना शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, डॉ. जयंत कुलकर्णी, व्ही. के. ग्रुपचे कार्यकारी संचालक ऋषिकेश कुलकर्णी आणि सस्टनॅबिलीटी इनिशिएटीव्हच्या विश्वस्त अपूर्वा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
डॉ. शिरीष केदारे म्हणाले, “पीएच.डी. हा केवळ शैक्षणिक प्रवास नसून विचारसरणी विकसित करणारी प्रक्रिया आहे. संशोधनादरम्यान अनेक अडचणी येतात, निराशेचे क्षणही येतात; मात्र त्यावर मात करून पुढे जाण्यातच संशोधकाची खरी जडणघडण होते” संशोधन करताना केवळ तांत्रिक दृष्टिकोन न ठेवता विविध घटकांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही समस्येच्या समाधानासाठी संबंधित सर्व घटकांचा सहभाग आणि सामाजिक संदर्भ समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. रवींद्र आचार्य म्हणाले,, “डेक्कन एड्युकेशन सोसायटीचे १८ कॉलेज, ३६ शाळा आणि साठ हजार विद्यार्थी आहेत. सर्वात मोठी जागा आणि परंपरा असलेले हे विद्यापीठ आहे. डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचा सामाजिक दृष्टिकोन आमच्या डीएनएमध्ये आहे. मुळात समस्याकेंद्रित संशोधन करणे आणि केलेल्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी करणे आवश्यक आहे. यादृष्टीने या पाठ्यवृत्ती योजनेत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्या त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी केले आहे. जनजाती समाजातील विज्ञान आम्हाला पुस्तक रूपात पुढे आणायचे आहे. यासाठी आम्ही वनांचल विज्ञान केंद्रही सुरू करणार आहोत.”
कुलगुरू डॉ. राजेश इंगळे म्हणाले, ‘रिसर्च टू इम्पॅक्ट’ हीच काळाची गरज आहे. संशोधनाचा प्रत्यक्ष समाजाला उपयोग होणे हेच त्याचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सामाजिकदृष्ट्या जबाबदार नेतृत्व, नवोपक्रम आणि पुराव्यांवर आधारित धोरणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सम्यक सेंटर ऑफ सोशल स्टडीज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली ही फेलोशिप तरुण संशोधक, नवोपक्रमक आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. जयंत कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. सागर विद्वांस यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ.शीतल रुईकर यांनी केले.

