पुण्यात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर सजग नागरिक मंचाने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. खडकवासला धरणसाखळीत 15 जून रोजीही 4 टीएमसीपेक्षा जास्त पाणी शिल्लक राहील, असा हिशेब देत सध्या एवढी मोठी कपात करण्याची गरज नसल्याचं मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी म्हटलं आहे.
महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रात वेलणकर यांनी म्हटलं आहे की, 9 जून 2025 रोजी वरसगाव धरणात 1.87 टीएमसी, पानशेतमध्ये 2.25 टीएमसी आणि खडकवासला धरणात 0.82 टीएमसी असा एकूण 4.94 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
सध्या शेतीसाठी सुरू असलेलं आवर्तन 14 जूनपर्यंत चालणार आहे. त्यासाठी लागणारं आणि पुण्याला लागणारं पाणी वजा केल्यावर 15 जून रोजी खडकवासला धरणसाखळीत 4 टीएमसीहून जास्त पाणी शिल्लक राहील. पालखी सोहळ्यासाठी 0.5 टीएमसी पाणी गृहीत धरलं तरी 15 जूननंतर पुण्याच्या पिण्यासाठी 3.5 टीएमसी पाणी शिल्लक राहील. पुणे महापालिका दरमहा दीड टीएमसी पाणी खडकवासलातून आणि उर्वरित भामा आसखेडमधून घेते. या हिशेबाने 15 जून रोजी असलेलं पाणी साधारण 31 ऑगस्टपर्यंत पुरेल.आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवलं तर हेच पाणी जवळपास 10 सप्टेंबरपर्यंत पुरेल, असा दावा मंचाने केला आहे.
यंदा पाऊस 90% पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 75% पाऊस झाला तरी खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरतात, असंही पत्रात नमूद आहे.
अशा परिस्थितीत 15 जूनपासूनच एक दिवसाआड पाणी देण्याचं नियोजन करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होईल आणि हा निर्णय टँकरवाल्यांसाठी फायद्याचा ठरेल, असं मंचाचं म्हणणं आहे.
सजग नागरिक मंचाने 15 जून ते 15 जुलैपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावं, अशी मागणी केली आहे. तोपर्यंत पावसाच्या वाटचालीचा आढावा घेऊन गरज असल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठ्याबत निर्णय घ्यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.
महापालिकेच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी असताना, मंचाने मांडलेला हा आकडेवारीसहचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

