महापालिका पर्यावरण तज्ञ व वाहतुक तज्ञांना विश्वासात घेऊन गणेशखिंड रुंदीकरण करण्याची शिफारस आयुक्तांकडून मागण्या मान्य
पुणे.दि.९:गणेशखिंड रस्त्यावरील नियोजित वृक्षतोडीमुळे पुणेकरांमध्ये निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करा आणि प्रशासनाने काढलेली वृक्षतोडीची जाहीर नोटीस तात्काळ मागे घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. ती पुणें मनपाने स्विकारली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी करत, शहरात नागरिकांच्या नकळत कोणी बेकायदेशीरपणे झाडे कापत किंवा छाटत असेल, तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी महापालिकेने एकच अधिकृत हेल्पलाईन सुरू करावी, अशी सुचना दिली . यावर सकारात्मक पाऊल उचलत पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येत्या शुक्रवारपर्यंत अशी विशेष हेल्पलाईन जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
तसेच, वृक्षतोडीबाबतची जुनी नोटीस रद्द करून, रस्त्याचे अंतिम डिझाईन फायनल झाल्यानंतरच नव्याने प्रक्रिया केली जाईल , अशी मोठी घोषणा आयुक्तांनी बैठकीत केली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पुणे मेट्रो लाईन-३ चे मुख्य अभियंता योगेश कुलकर्णी यांच्यासह ‘परिसर’ संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ, वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे व इतर तज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रस्ता रुंदीकरणामुळे होणाऱ्या वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र संभ्रमाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. “केवळ अंतर्गत समित्या नेमण्यापेक्षा नागरिकांच्या प्रत्यक्ष सूचना व हरकती मागवून त्यावर खुली चर्चा करणे अधिक उपयुक्त ठरेल,” असे सांगत पुण्याच्या शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांच्या भूमिकेला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले की, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मी झाडे तोडण्याचे विरोधात असुन याबाबत पुनःपरीक्षण करण्यात येईल. त्यांच्या शास्त्रोक्त पुनर्लागवडीवर (Transplantation) भर दिला जाईल. सामाजिक संस्थांशी चर्चा करूनच पुढील अंतिम आराखडा बनवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, ‘परिसर’ संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांनी केवळ रस्ते रुंद करणे हा वाहतूक कोंडीवर उपाय नसल्याचे सांगत झाडे वाचवणारा सुधारित रस्ते आराखडा महापालिकेला सादर केल्याची माहिती दिली. एकदा स्थलांतरित केलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने मूळ झाडे वाचवण्यालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तर वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे यांनी औंध आणि जंगली महाराज रस्त्यांच्या धर्तीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्याची सूचना केली. एकूणच, शहरातील विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत, नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील पावले टाकण्यावर या बैठकीत एकमत झाले.

