दिवंगत पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या सहाव्या स्मृतिदिन अभिवादन सभेत आदरांजली अर्पण
पुणे,घरातील महिला भगिनी या मुकनायिका आहेत. त्या घरातल्या सैनिक आहेत म्हणून तुम्ही बाहेर लढू शकता. महिला केवळ व्होटबॅंक वा जनन यंत्र नव्हे. त्या तुमच्या लढ्यातील साथीदार आहेत. त्यांना राजकारणाची ओळख करून द्या. त्यांना राजकारण शिकवा. रमाईच्या लेकी जेव्हा पँथरच्या लढ्यासाठी रणांगणात उतरतील तेव्हाच पँथरच्या लढ्याला बळ प्राप्त होईल, असे मत दलित पँथरच्या केंद्रीय अध्यक्षा मल्लिकाताई नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केले.
दलित पँथरचे संस्थापक विद्रोही कवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मल्लिकाताई ढसाळ अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
अभिवादन सभेच्या आरंभी भन्ते हर्षवर्धन यांनी बुद्धवंदना सादर केली. त्यानंतर मल्लिकाताईं ढसाळ यांच्या हस्ते दीपप्रजवलंन,महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण आणि दिवंगत पँथ नेते नामदेव ढसाळ व कै. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यासपीठावर दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ, दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष अविश राऊत, घनश्याम भोसले, दलित सेनेच्या आरती साठे, सुभाष लाटकर , ऍड. लक्ष्मी माने , सोनाली नवदूनगव आणि पॅंथरचे असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते व चाहते उपस्थित होते.
यावेळी मल्लिकाताई ढसाळ म्हणाल्या, पद्मश्री नामदेव ढसाळ यांना जाऊन सहा वर्षे सरली परंतु त्यांनी लावलेले बीज आणि चेतवलेला ज्वालामुखी अजुनही धगधगत आहे, हे पाहून समाधान वाटते. पॅंथरमुळे अनेकजण नेते, मंत्री बनले, परंतु सामान्यांचे दैन्य संपले नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे, माझी माणसे शासनकर्ती जमात व्हावी, असे झाले तरच बाबासाहेब आणि नामदेव ढसाळांच्या विचारांचे सार्थक होईल.
यावेळी यशवंतभाऊ नडगम म्हणाले, आजही गावागावात पॅंथरची गरज आहे. दादांनी (नामदेव ढसाळांनी) पुण्यात ३७२ झोपडपट्ट्या वसवल्या, परंतु दादांच्या उपकाराची जाणीव लोकांना राहिली नाही. दादांचे विचारामुळे अन्य राज्यातच नव्हे तर भारताबाहेरही पॅंथर पोहचली. तामिळनाडूत पॅंथर कार्यकर्ते आमदार मंत्री बनले.आज कन्हैयाकुमार जी भाषणे करतोय त्याचे शब्द दादांचे आहेत. दादांच्या कवितांचे पुस्तक वाचाल तर राजकारणाचे वाघ बनाल.
यावेळी अविश राऊत म्हणाले,भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे, बीजेपी सरकार धर्मावर अधारित नागरिकत्व सुधारणा (एनआरसी)कायदा आणून भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे. एनआरसी लागू झाल्यास एससी, एनटी, ओबीसी भरडला जाणार आहे. एनआरसी कायद्याला विरोध हीच नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
यावेळी घनश्याम भोसले, आरती साठे, सुभाष लाटकर, पालघरचे अजिंक्य म्हस्के, निलेश आल्हाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पडवळ यांनी प्रास्ताविकातून दलित पँथरच्या वाटचालीचा आढावा घेतला, तर विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन अजय वंदगल , मुदस्सर शेख , जॅक्सन पानेम , रुपेश जगताप , पप्पू पाटील , प्रिन्स कांबळे , नितीन नायर , विल्यम नायडू , प्रशांत वाघमारे , बापू माने , लहू लांडगे , मार्टिन जोसेफ व संजय कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले .