मुंबई-मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलन सुरु केले असतानाच ‘या आंदोलनात काही पेड लोक घुसली असून हे आंदोलन बदनाम करुन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा त्यांचा डाव आहे’, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
राज्यात मराठा संघटनांनी आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरु केले असून या आंदोलनात सोमवारी औरंगाबादजवळ काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. यानंतर आंदोलन चिघळले असून मंगळवारी राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काम केले आहे. आता हा मुद्दा न्यायालयाच्या अखत्यारित आहे. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण शेवटी यात समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. काही पेड लोक या आंदोलनात घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात चार वर्षे उत्तम कारभार चालला. शेतकऱ्यांना कर्जमाफीही झाली. पण आता निवडणुका जवळ येताच हिंसक आंदोलनाचे प्रकार वाढतील. आता जे खरे आंदोलक आहेत, त्यांनी समाजकंटकांना खड्यासारखे बाजूला काढावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकार आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाला जीव गमवावा लागला, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण अशा मार्गाने प्रश्न सुटणार नाही. जे आपल्या हातात नाही, त्यासाठी आंदोलन करुन उपयोग नाही. बंदमुळे पंढरपूरमध्ये ७ लाख वारकरी अडकून पडले आहेत, याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी विचारला.