पुणे-युवा माळी संघटनेच्यावतीने ” गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ” संपन्न झाला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तात्रय बाळसराफ , प्रमुख पाहुण्या म्हणून माजी आमदार कमलताई ढोलेपाटील , प्रकाश फुलारे , युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत , सचिव वृषाली शिंदे , माजी नगरसेवक संदीप लडकत , ऍड. भालचंद्र कोद्रे , बाबुराव धायरकर , बाळासाहेब आल्हाट , सिताराम झगडे , उन्नती बोरावके , प्रितेश गवळी ,दीपक जगताप , महात्मा फुले मंडळ अध्यक्ष चांगदेव पिंगळे , दत्तात्रय भुजबळ आदी मान्यवर , पालकवर्ग , विद्यार्थीवर्ग व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे उदघाटन संत सावतामाळी , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून दीपप्रज्वलित करून उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी माजी आमदार कमल ढोलेपाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , माळी समाज हा कष्टकरी समाज आहे , विद्यार्थ्यांनी आपल्या कलेप्रमाणे आपले करिअर घडवावे , विद्यार्थ्यांनी आपल्या कामाचे सोने करून दिले पाहिजे . महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती जाणून घ्या , त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन घडा .
यावेळी समारंभाचे अध्यक्ष इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,दहावी हे जीवनाला कलाटणी देणारे वर्ष आहे , तर बारावी हे जीवनाला गती देणारे वर्ष आहे , विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन आपले करिअर घडवावे , परंतु आजच्या काळात मोबाईल व बाईक या दोन गोष्टी करिअरमध्ये अडचणीच्या ठरत आहे . या भौतिक गोष्टीना महत्व न देता आत्मविश्वासाने आपले करिअर घडवावे, ज्ञानधिष्ठीत समाज घडवा .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनिता भगत यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर यांनी केले तर आभार धनिष्ठा कल्याणकर यांनी मानले .