जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये संबंध नाही–माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही–देशमुख जेलमध्ये गेले, आता बेलवर बाहेर आलेत
मुंबई-राज्यात माझ्यावर टीका करण्यासाठी काही सुपारीबाज तयार झाले असून ते सुपारी घेऊन आपल्यावर आरोप करतात, श्याम मानव हे त्यांच्या नादी लागलेत का हे पाहावं लागेल, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मानव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला श्याम मानव लागले तर नाही ना, हे एकदा पाहावं लागेल.
मनोज जरांगे यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटमध्ये राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगेंची केस आहे ती 2013 सालची आहे. या पूर्वीदेखील त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आलं होतं. पण ते हजर राहिल्यानंतर ते रद्द झालं. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट निघालं. ते तारखेवर हजर राहिले तर वॉरंट रद्द होतात. आमच्यावरही असे अनेक वॉरंट निघाले आहेत. अटक वॉरंट निघालं आणि त्यावर कोर्टात हजर राहिलं तर ते वॉरंट नंतर रद्द होतं.
मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे गेल्या वेळी माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली. उपोषणामुळे त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे तसं वक्तव्य झालं असं ते म्हणाले होते. आताही उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली असतील.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचं आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय काही बोलत नाही, असा इशाराही त्यांनी देशमुख यांना दिला.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आताही ते बेलवर बाहेर आहेत.
महाजनांवर मोक्का लावण्याचा डाव होता
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप करण्यात आला आहे. महाजनांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावले याचे ऑडिओ व्हिज्युएल पुरावे आपण दिले होते. ते पुरावे सीबीआयने कोर्टात दाखल केले. महाविकास आघाडी सरकारने विरोधी आमदारांवर कशा प्रकारे मोक्का लावण्याचा प्रयत्न केला हे यावरून दिसतंय.