मुंबई-राज्यातील सत्ताधाऱ्यांनी नाशिकच्या महानगरपालिकेत मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, या घोटाळ्याचे पुरावे येत्या दोन दिवसात सादर करणार असल्याचेही ते म्हणाले. राऊतांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया माध्यमावर (ट्वीट) एक पोस्ट शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांतपणे झोपावे, असा इशाराही राऊतांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण आहे तरी काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राउतांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांनी एका बाजूला मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले असतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन याने बुधवारी (1 मे) पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या घटनेवरून राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.संजय राऊत म्हणाले, या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलिस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे, याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचे गृहमंत्रालय, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. या आत्महत्याप्रकरणी अधिक तपास करण्याची गरज आहे. आम्ही तशी मागणी करतोय. मात्र ही मागणी करून काहीच होणार नाही. कारण त्यासाठी सरकार बदलणे आवश्यक आहे. सरकार बदलले तर अशा प्रकरणांचा तपास होईल. अन्यथा हे लोक अशी प्रकरणे दाबतील.