पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने नागरिकांचे हाल होणार असतील तर असला हलगर्जीपणा आपण खपवून घेणार नाही असा इशारा आज महापौर मंजुश्री नागपुरे यांनी येथे प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांना दिला
शहरात अलीकडील पावसामुळे विविध भागांत पाणी साचणे, रस्त्यांवर पाणी तुंबणे, नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक दि. २३ एप्रिल २०२६ रोजी महापौर कार्यालयात आयोजित केली होती .
या बैठकीस महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर (जनरल) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर तसेच सर्व उपआयुक्त, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान महापौरांनी पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:
- शहरातील तलावांमध्ये दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूच्या घटना घडत असल्याने पाण्याची नियमित तपासणी करावी.
- तलावातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
- जलपर्णी (water hyacinth) निर्मूलनासाठी कार्यक्षम यंत्रणा वापरावी तसेच त्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधावा.
- पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक उपायांचा अभ्यास करून अंमलबजावणी करावी.
तसेच, टेकड्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट रस्त्यांमार्गे नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाले सफाई आणि पावसाळी कामांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
- नाले सफाईसाठी दिलेल्या कंत्राटांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
- संबंधित कंत्राटदारांकडे आवश्यक यंत्रसामग्री आहे का याची तपासणी करावी.
- कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित करावी.
महापौरांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.

