पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, शहर सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी या संदर्भात आरोग्य विभागाकडे उष्माघात कक्ष सुरु करावा अशी मागणी केली होती, त्याचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले, चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशा त्रासांना सामोरे जात आहेत. काही जणांचा तर मृत्यूही होतो. अशा वेळी प्रकृती गंभीर असताना रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असून त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना याचा फटका बसते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून शहरभर या सुविधा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत आणि गंभीर परिणाम टाळता यावेत, या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ”महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला जाणार आहे. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने हा कक्ष सुरु केला आहे.”

