नागपूर येथे विधान मंडळ परिसरात अभिवादन कार्यक्रम
यवतमाळ, दि. 01 – हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी धोरणांची देशाची आज खऱ्या अर्थाने गरज असून त्याची अंमलबजावणी व्हावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त नागपूर येथे विधान मंडळ परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. सुनील केदार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. गिरीष व्यास, विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, देशातील कृषी समृद्धीत कै. वसंतराव नाईक यांनी दूरदूष्टीने राबविलेल्या धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. कालांतराने शेती करण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले. आज शेती आधुनिक झाली आहे. तरीही शेतकरी मात्र समृद्ध होताना दिसत नाही. शेती आणि शेतीचे अर्थकारण विविध कारणांनी बदलले आहे. शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी कै. वसंतराव नाईक यांच्या धोरणांची आज देशाला नितांत गरज आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास शेती आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास ना. राठोड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विधान मंडळ परिसरातील कै. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून ना. राठोड यांच्यासह उपस्थितांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला विधान मंडळाचे सचिव यु.के. चव्हाण, विधान परिषद सभापतींचे सचिव काज, उपसचिव थिटे, कुरतडकर, मुख्य ग्रंथपाल बाबा वाघमारे, यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विधान मंडळ सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी व बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.