उद्योगाधारित कौशल्ये आत्मसात करावीत -डॉ. राजेंद्र जगताप यांचा सल्ला
केजे शिक्षण संस्थेत पदवीप्रदान सोहळा
पुणे : “शैक्षणिक राजधानी असलेले पुणे ऍटोमोबाईल, माहिती तंत्रज्ञान, साखर उद्योग आणि इतर अनेक उद्योगांचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पही पुण्यात आला आहे. परिणामी अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अभियंत्यांनी उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करावीत व या संधींचा फायदा उठवावा,” असा सल्ला पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना दिला.
केजे शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित केजे अबियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय व ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयांच्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. जगताप बोलत होते. प्रसंगी सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक मारुती कुदळे, कॅडबरी चॉकलेटचे अजित तावडे, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, कॅम्पस संचालक डॉ. व्यासराज काखांडकी, केजे अबियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. निलेश उके आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे आपण ‘स्मार्टवर्क’ करण्यावर अधिक भर देत आहोत. मात्र, त्याला ‘हार्डवर्क’ची जोड असल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. मूलभूत गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. आज माहितीचा खजिना इंटरनेटवर उपलब्ध असला, तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा याचे तंत्र आपल्याला अवगत असायला हवे.”
अजित तावडे म्हणाले, “कठोर परिश्रम हे दूरगामी यशासाठी उपयुक्त असतात. उद्योगांना कुशल मनुष्यबळ हवे आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपण शिकायला हवीत. समस्या सोडविण्यावर आपला भर असला पाहिजे. शिवाय कोणत्याही ठिकाणी काम करताना ‘माणूस’पण जपणे महत्वाचे आहे.”
मारुती कुदळे म्हणाले, “पदवी घेतली म्हणजे आपले शिक्षण संपले असे नव्हे. सतत नव्या गोष्टी शिकण्याचा ध्यास असावा. देशाच्या विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असावे. गेल्या सात दशकांत देश विकासनशीलतेकडून विकसित अवस्थेकडे वाटचाल करतो आहे. त्यात आपले योगदान असावे.”
कल्याण जाधव म्हणाले, “आपल्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा सामान्य माणसाच्या हितासाठी उपयोग होईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नाविन्यपूर्ण कल्पनेतून उद्योग उभा करण्याचा विचार केला, तर रोजगार निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी उद्यमशीलतेला प्राधान्य दिले पाहिजे.”
यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुहास खोत यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. सोनाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. निलेश उके यांनी आभार मानले.