पुणे : “प्रत्येकाच्या आतमध्ये सुप्त गुण दडलेले असतात. या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर आयोजिले जाणारे महोत्सव उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासह कला-कौशल्ये आत्मसात करावीत,” असे मत प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केजे शैक्षणिक संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘मल्हार युवा महोत्सवा’च्या उद्घाटनावेळी जितेंद्र भुरुक बोलत होते.
सहा दिवसांच्या या युवा महोत्सावात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, व्यवस्थापनशास्त्र व वास्तुशास्त्राच्या विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला. फॉर्मल टाय डे, साडी डे, रोज डे, बॉलीवुड डे, चॉकलेट डे, स्कूल डे, मिसमॅच डे, सिग्नेचर डे, ब्लॅक अॅण्ड व्हाईट डे व ट्रेडीशनल डे आदी दिवस साजरे झाले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, पेन्सिल स्केचेस, छायाचित्रे, हस्तकला व रांगोळींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कलादालनाचे उद्घाटन सुनंदा जाधव व विभावरी जाधव यांनी केले.
‘म्युझिकल इव्हीनींग’मध्ये प्रसिध्द डीजे मित यांच्या उपस्थितीत मुलांनी नृत्याचा आनंद घेतला. गायन, संगीत, नृत्य, नाटक आदी कलांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. विद्यार्थ्यांनी दर्जेदार गाणी, नृत्य व नाटकांद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सर्व कलेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. कृष्णात पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. सुहास खोत यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
महोत्सवाच्या समारोपावेळी भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख कृष्णाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख-जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जी. फाकटकर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. एन. जे. उके, डॉ. मंगेश कश्यप, जी. बी. इंगोले, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ‘मल्हार युवा महोत्सवा’चे समन्वयक व केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्रा. छबिलदास गाजरे, प्रा. विकास मरळ, प्रा. अमृता ताकवले व सहकार्यांनी मेहनत घेतली.