अवांतर वाचनाला प्रोत्साहन द्या ! :माजी कुलगुरू डॉ . एस .एन पठाण यांचे आवाहन
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्नेह संमेलन उत्साहात
पुणे :’ चंगळवादाचा धोका वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होण्याची जबाबदारीही वाढली आहे . अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाला आपण शिक्षण प्रक्रियेत प्रोत्साहन दिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्यासाठी वाचनाचे सकस पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत ,’ असे आवाहन राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . एस .एन पठाण यांनी काढले .
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन एमआयटी (कोथरूड )प्रांगणात उत्साहात झाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम . आय . टी . च्या विश्वस्त डॉ . स्वाती -चाटे -कराड होत्या . राज्याच्या उच्च माध्यमिक -माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष डॉ . शकुंतला काळे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होत्या .
डॉ . पठाण म्हणाले ,’जागतिकीकरणाचा लोंढा येत असताना चंगळवाद वाढत आहे . चारित्र्य घडण या शिक्षणाच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होत आहे . मग आदर्श समाज कसा घडणार असा प्रश्न पडतो . समाजात अन्याय ,अत्याचार ,अस्वस्थता वाढत असताना शिक्षणातून चारित्र्य संवर्धन होणार नसेल तर ते कुचकामी ठरेल ‘
मराठी माध्यमाचे विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण त्यांना अवांतर वाचनासाठी भरपूर चांगले पर्याय उपलभ आहेत . वाचनातून भेटणाऱ्या सकस व्यक्तिरेखा वाचून आणि भोवतालची ऊत्तुंग व्यक्तिमत्वे पाहून विद्यार्थी प्रेरित होऊ शकतात ,असेही ते म्हणाले .
डॉ शकुंतला काळे यांनी तणावमुक्त होऊन शालान्त परीक्षा कशी द्यावी ,याबद्दल मार्गदर्शन केले . तर डॉ . स्वाती चाटे -कराड यांनी मराठी विद्यार्थ्यांनी न्यूनगंड ठेवू नये ,असे आवाहन केले .
यावेळी किसन बुचडे ,प्राचार्य नागनाथ सानप यांच्या हस्ते डॉ . एस एन पठाण यांचा सत्कार करण्यात आला .