देव देवतांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या गाथा, आख्यायिका, दंतकथा आपल्याकडे पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. मौखिक परंपरेतून, लोक कलांमधून, पुस्तकांमधून या गोष्टी आपण ऐकलेल्या बघितलेल्या आणि वाचलेल्या असतात. या कथांमध्ये होणारे चमत्कार त्या दैवी गोष्टी आपल्या मनाला कायम भुरळ घालतात आणि त्या कथांचं आकर्षण प्रत्येकच पिढीत असतं. अशाच आख्यायिकांमध्ये प्रसिद्ध असलेली गाथा म्हणजे महादेवाने केलेले समुद्रमंथन. अमृत प्राशन करण्याच्या सुर-असुरांच्या लढ्यात समुद्रातून बाहेर आलेल्या हलाहलाने पृथ्वीचा विनाश होऊ नये म्हणून महादेवाने ते विष प्राशन केल्याची गाथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हीच गाथा एका भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमधून. येत्या ५ मे पासून समुद्रमंथनाची ही गाथा या मालिकेत सुरू होणार आहे.
‘जय मल्हार’ मालिकेत सध्या नारद आख्यान सुरू आहे. म्हाळसादेवी आणि बानूला आपल्या मूळ रूपाची जाणीव करून देणे हा या आख्यानाच्या उद्देश. या आख्यानातून ज्या कुणाला मुळ रूपाबद्दल आधी समजेल तिच्यासोबत मल्हार कैलास पर्वतावर जाणार त्यामुळे म्हाळसा आणि बानूमध्ये याबाबत एक वेगळीच धडपड सुरू आहे. नारदमुनी विविध कथा या आख्यानामधून मांडत आहेत ज्यातून म्हाळसा आणि बानूला अनेक नव्या नव्या गोष्टी कळत तर आहेतच पण सोबतच काही प्रश्नही पडत आहेत. नारदमुनींच्या याच आख्यानात आता समुद्रमंथनाची गाथा बघायला मिळणार आहे.
दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे या सृष्टीतून लक्ष्मीमाता समुद्रात लुप्त होतात आणि त्यांना परत मिळवण्यासाठी समुद्रमंथनाचा मार्ग पुढे येतो. यासाठी श्री विष्णू कुर्मावतार घेतात. या मंथनासाठी मेरू पर्वताचा रवी म्हणून तर वासुकीचा दोरी म्हणून वापर करण्यात येतो. या समुद्रमंथनातून बाहेर येणारी रत्ने, ते मिळवण्यासाठी देव आणि दैत्यात होणारी लढाई यादरम्यान बाहेर येणारं हलाहल या सर्व गोष्टींचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने ‘जय मल्हार’ मालिकेत बघायला मिळणार आहे. समुद्रातून बाहेर आलेलं हे हलाहल पृथ्वीचा विनाश करणार हे लक्षात येताच महादेव हे सारं हलाहल प्राशन करतात ते त्यांच्या शरीरात पसरण्यापूर्वी पार्वतीदेवी तिथे येतात आणि आपल्या दिव्य शक्तीने ते हलाहल त्यांच्या कंठाशी रोखून धरतात. या आख्यायिकेवरूनच महादेवाचं ‘नीलकंठ’ हे नाव पडलं. समुद्रमंथनाची ही रोमहर्षक गाथा ‘जय मल्हार’ या मालिकेत येत्या ५ मे पासून सायंकाळी ७ वा. बघायला मिळेल फक्त झी मराठीवरून.