Home Blog Page 54

खगोल संशोधकांनी वापरली ब्रम्हांडाच्या मापनासाठी एक अभिनव भूमितीय चाचणी

0

मुंबई, 28 मार्च 2026

फार दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या अतिशय क्षीण प्रकाशाच्या आधारे विश्वाचा इतिहास आणि रचना उलगडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ करत आहेत. या पार्श्वभूमीतील आकाशगंगांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचताना मार्गातील जवळच्या आकाशगंगांच्या गुरुत्वाकर्षणामुळे वाकतो व विकृत होतो. या प्रक्रियेला ‘गुरुत्वीय लेन्सिंग’ (gravitational lensing) असे म्हटले जाते. या तंत्राच्या साहाय्याने विश्वातील पदार्थांचे, विशेषतः अदृश्य ‘डार्क मॅटर’चे नकाशे तयार केले जातात आणि विश्वातील रचनांची वाढ कशी होते, याचा अभ्यास केला जातो.

गुरुत्वीय लेन्सिंग निर्माण करणारा आकाशगंगांचा एक मोठा समूह (credit : NAOJ)

या संशोधनात ‘रेडशिफ्ट’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. विश्वाच्या प्रसरणामुळे प्रकाश किती ताणला गेला आहे, याचे मोजमाप म्हणजे रेडशिफ्ट. मात्र, यातील अनिश्चिततेमुळे विश्वाच्या विविध वैश्विक परिमाणांच्या (cosmological parameters) मोजमापात पूर्वग्रह (bias)  निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक आकाशगंगेचा अचूक रेडशिफ्ट मोजणे वेळखाऊ असल्याने, शास्त्रज्ञ प्रामुख्याने आकाशगंगांच्या रंगांवरून त्याचा अंदाज लावतात. ही पद्धत पूर्णतः अचूक नसून त्यात लहान प्रमाणात पद्धतशीर त्रुटी राहतात.

आयुका (IUCAA), पुणे या संस्थेशी संबंधित खगोलशास्त्रज्ञांनी याच समस्येवर उपाय म्हणून एक अभिनव भूमितीय पद्धत, ‘शिअर रेशियो’ चा वापर केला आहे. नेदरलँड मधील लाईडन विद्यापीठातील संशोधक डॉ. दिव्य राणा (माजी विद्यार्थी, IUCAA), प्रा. सुहृद मोरे (IUCAA संशोधक) आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांनी ‘Physical Review D’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

या पद्धतीत, एका पार्श्वभूमी संचामधल्या आकाशगंगांवरच लक्ष केंद्रित न करता, समोरील एकाच आकाशगंगांच्या संचानी वेगवेगळ्या रेडशिफ्टवर असलेल्या पार्श्वभूमी आकाशगंगांच्या प्रकाशाला कशा प्रकारे वाकवले,  याची तुलना केली जाते. या तुलनेमुळे वायू, तारे आणि आकाशगंगा निर्मितीशी संबंधित गुंतागुंतीचे घटक आपोआप नगण्य ठरतात आणि विश्वाच्या भूमितीचे एक ‘स्वच्छ’ मोजमाप मिळते. ही भूमितीचा रेडशिफ्टच्या अंदाजातील त्रुटी अचूकपणे शोधून तिचा ब्रह्माण्ड मापनासाठी वापर करता येतो.

ही पद्धत Subaru Hyper Suprime-Cam (HSC) ह्या आकाशगंगांच्या सर्वेक्षणातील डेटावर यशस्वीपणे वापरण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आकाशातील पदार्थांचे व्यापक नकाशांकन केले जात आहे. संशोधकांनी रेडशिफ्टमधील त्रुटी दुरुस्त करताना विश्वातील पदार्थाची घनता आणि असमानतेची तीव्रता यासंबंधित महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले.

“भविष्यातील मोठ्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांमध्ये रेडशिफ्टमधील अनिश्चितता ही एक मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. या अभ्यासातून ‘शिअर रेशियो’ पद्धत रेडशिफ्ट मोजमापांची पडताळणी करण्यासाठी प्रभावी आणि स्वतंत्र साधन ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे.” – असे प्रा. सुहृद मोरे म्हणालेत.

निकट भविष्यात  व्हेरा सी. रुबिन वेधशाळा (LSST), रोमन अवकाश दुर्बीण (Roman Space Telescope), युक्लिड (Euclid) मोहिमेसारख्या प्रगत वेधशाळा कोट्यवधी आकाशगंगांचे नकाशे तयार करणार आहेत. डार्क एनर्जी आणि विश्वाच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी या सर्वेक्षणांना अचूक आणि विश्वासार्ह डेटाची गरज भासणार असून, ‘शिअर रेशियो’ ही पद्धत त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, म्हणाले – देशात इंधनाचा तुटवडा नाही

मुंबई- भारताच्या इंधन पुरवठ्यावर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या अफवांनी नागरिक धास्तावले असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत सर्व संभ्रम दूर केला आहे. “देशात किंवा राज्यात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही; अशा खोट्या बातम्या पसरवणे हे देशद्रोहासारखेच आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले आहे. तसेच अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत. एलपीजी सिलेंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “देशात आणि राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे. आपल्या देशाच्या डिप्लोमॅटिक रिलेशनशीपमुळे, पंतप्रधानांच्या नीतीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्याची काळजी घेतली जात आहे. अशा अफवा पसरवून जर कुणी गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर ते देशविरोधी काम आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भविष्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजूबाजूच्या देशात लॉकडाऊन सुरू असताना आपल्या देशात मात्र त्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर पडू दिला नाही. एलपीजी गॅसचाही कुठेही तुटवडा नाही. देशात जर कुणी अफवा पसरवून गोंधळाची स्थिती निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

जागतिक घडामोडींमुळे इंधनाच्या किमतींवर किंवा पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. “नागरिकांनी कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन साठा करू नये. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे,” असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा श्रीराम कर्तव्यपूर्ती पुरस्काराने गौरव

पुणे : कसबा पेठेतील श्रीराम चव्हाण मंदिरातर्फे श्रीराम नवमीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा श्रीराम कर्तव्यपूर्ती पुरस्कराने गौरव करण्यात आला. मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रसाद बर्गे, माजी महापौर अंकुश काकडे, गौरी गणेश बिडकर, अप्पासाहेब गायकवाड, नगरसेवक देवेंद्र वडके, दत्ताभाऊ सागरे, संयोजक गणेश चव्हाण, भोला वांजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण परिवार, श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, चक्रवर्ती अशोक मंडळ ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे, वृक्षारोपणाचे कार्य करणारे राज देशमुख, महिला, मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या शिला शेट्टी, समाजसेवक दिनेश शहा, सामाजिक कार्यकर्त्या वनिता अंबिके, संध्या गायकवाड, सारिका अगज्ञान, ॲड. परेश खाडिलकर यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी म्हणून अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात गणेश चव्हाण म्हणाले, प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी श्रीराम कर्तव्यपूर्वी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

मान्यवरांचे स्वागत राहुल पारखी, रणजीत चौधरी, भारती चव्हाण, देवेंद्र वडके, दिलीप मोरे, हर्षल परदेशी, राजेश जोशी, दत्ताभाऊ सागरे यांनी केला.

काँग्रेस पक्षाची सोमवार ३० मार्चला सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

0

मुंबई, दि. २८ मार्च २०२६

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार आहेत. पदयात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून सकाळी ८ वाजता होणार असून संध्याकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे.

भाजपा सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाजपा सरकारच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत.भाजपा सरकार एमएसपीचा कायदाही करत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणाही भाजपा सरकारने केल्या पण त्याही कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, तर मोदी सरकारने अमेरिकेबरोबर व्यापारी करार करून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस संसद, विधिमंडळ व रस्त्यावरही लढत असून, या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.

PMPML भ्रष्ट, गैरकारभार: मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सीएमडी देवरेंच्या कार्यकाळातील कामकाजाची “श्वेतपत्रिका” काढा: उज्वल केसकर

पुणे-PMPML मधील भ्रष्ट, गैरकारभाराच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सीएमडी देवरेंच्या कार्यकाळातील कामकाजाची “श्वेतपत्रिका” काढा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर तसेच सुहास यांनी केली आहे.

केसकर म्हणाले,’ पीएमपीएमएल मधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले यांनी आपल्या पदाचा राजीनामा टपालातून दिल्याचे आम्हाला कळाले.पीएमपी गैरव्यवहारातली वसुली पथकातील “”पहिली विकेट”” पडली.हे महाशय राज्य सरकारच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर पीएमपी मध्ये आले होते.तत्कालीन अध्यक्ष यांनी त्यांना साधा ठराव करून नियुक्त केले होते.
बढत्या, बसेस भाड्याने घेणे, Arbitration इत्यादी सर्व विषयांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमी होते ऑडिओ क्लिप मध्ये देखील त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला ऐकला आहे.त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या सेवकांनी व्यवहार केले होते त्यांचे व्यवहार पूर्ण होणार नाहीत असे दिसते.
संस्थेच्या नुकसान करून सहज यांचा राजीनामा स्वीकारू नये यांची जबाबदारी निश्चित करून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, पेन्शन इत्यादी ज्या गोष्टी थांबवता येणं शक्य आहे त्या थांबवाव्यात, जबाबदारी निश्चित करावी.
मुख्य सूत्रधारांच्या पर्यंत देखील जाणे गरजेचे आहे कारण गरीब सामान्य कामगाराने जीवनाची सर्व पुंजी वसुली पथकाला दिली होती वसुली पथकातील इतर अधिकाऱ्याने देखील आता त्यांच्या “”आका””कडे जे पोचवले आहे ते “”आका”” कडून घेऊन द्यावे.
हा सगळा व्यवहाराचा पर्दाफाश जेव्हा आम्ही करायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यात काही होणार नाही.
आता घडायला सुरुवात झालेली आहे.
राज्य सरकारकडे जो अहवाल आहे तीन सदस्य समितीचा त्यावर कार्यवाही करावी अशी विनंती आहे माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना करणार आहोत.वेळ मध्ये कार्यवाही झाली नाही तर लोकायुक्त/ हायकोर्टामध्ये जाऊन दाद देखील मागणार आहोत.
सीएमडी श्री देवरे यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याबाबत पीएमपीने एक “श्वेतपत्रिका” काढावी अशी आमची मागणी आहे.

भोंदू बाबा ऋषीकेश वैद्यला अटक

पुणे पोलिसांनी पिंपरीत ठोकल्या बेड्या; ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर केला होता बलात्कार
पुणे-अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिची समाज माध्यमातून वसई येथील ऋषीकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. पीडित महिला व्रतवैकल्ये करत असल्याने, वैद्यने तिला आपल्या जाळ्यात ओढले. ‘माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र मी तुला शिकवतो,’ असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला. त्याने मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली. तिथे त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा वसई येथे बोलावून तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे.नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला तिने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर भागातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

ऋषीकेश वैद्य याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 पथके नियुक्त केली होती. ही पथके आरोपीचा कसून शोध घेत होती. त्यात आरोपी ऋषीकेश वैद्य पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, “ऋषीकेश वैद्यने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केले आहेत. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान; सेवाकर्मी प्लस कार्यक्रमातही प्रथम स्थानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गौरव

पुणे, दि.२८: मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्य मापनात पुणे जिल्हा परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे; सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेची ‘प्रथम’ क्रमांकाने निवड झाली आहे.आज मुंबई येथील सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री यांच्या१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये सात महत्त्वाच्या घटकांवर- कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली.
श्री. गजानन पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेकडून Integrated Works Management System (IWMS), ‘स्पंदन’, ई-लॉटरी, System of Pension Illustration (SOPI), क्यूआर कोड आधारित कर संकलनप्रणाली यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या असून, यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ हे द्विभाषिक, सुरक्षित व सुलभ असून नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. ‘आपले सरकार’ प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहे. तसेच इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे.

‘Pune ZP Samvaad’ या व्हॉट्सअॅप AI चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ माहिती व सेवा मिळत आहेत. एआय, ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा व विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे.

सेवाकर्मी कार्यक्रमातही विशेष कामगिरी

सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड होणे ही जिल्हा परिषदेच्या सेवा गुणवत्ता, नागरिक समाधान, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि डिजिटल सेवा विस्ताराची पावती मानली जात आहे.
१५० दिवसांच्या कार्यक्रमातील यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या सादरीकरणात व सर्व घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सामान्य प्रशासन विभाग व त्याच्या टीमचेही त्यांनी अभिनंदन केले.

श्री. गजानन पाटील: मुख्य कार्यकारी अधिकारी: ‘डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. पुणे जिल्हा परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासवासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि राज्यातच नव्हे तर देशातही एक आदर्श मॉडेल म्हणून उभी राहील.’

श्री वीरधवल जगदाळे, अध्यक्ष जिल्हा परिषद: “पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ गुणांचा नाही, तर नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या आपल्या वचनबद्धतेचा गौरव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने काम करून हा माव मिळवला आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील.”

श्री. विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद: “पुणे जिल्हा परिषदेने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची दिशा अधिक मजबूत झाली आहे.”

पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे-पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर मैदानावर शनिवारी (दि. 28) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक ‘फिट’ आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुरुषोत्तम बारकुल (23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलिस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता.

दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक ‘फिट’ (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अचानक तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलिस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

भोंदू बाबा कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली,सरकारने त्याला राजमान्यता दिली होती..

मुंबई-सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल.

संजय राऊत म्हणाले की, आपले पंतप्रधान कधी राष्ट्रीय विचार करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधील टीम त्यांच्याकडे नाही. हम दो हमारे दो असे ते वागतात. जे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही ते टीम इंडियाम्हणत आहे. हे सर्व ढोंग आहे. ते कधीच विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच कोणत्या विषयावर चर्चा करत नाही.
संजय राऊत म्हणाले की, मंत्री झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी कशी करणार. मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, असे ते बोलले होते. पण ती सत्यता पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असे काही घडले असते तर सरकारने आधी फाशी मग चौकशी ही भूमिका घेतली असती. इथे फाशीचे नावच नाही, करू चौकशी सुरू आहे.

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही.

खरातसारख्या माणसाला कोणी पोसलं?:16 वर्षांपासून भोंदूकडून महिलांच्या शोषणाचे प्रकार

पुणे-खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. चाकणकर यांचा आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा एकाच वेळी होऊ शकला असता. आयोगाच्या राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला त्यामध्ये काही तटकरेंचा रोल नव्हता. आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काही राजीनामा नाही ही गच्छंती आहे,असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला आहे, ते पक्षातील नाराजी ओळखत घेतला आहे. चाकणकर यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल असे वाटते. एसआयटीवर विश्वास ठेवायला हवा.सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणी पोलिस तपास करतील त्या तपासाकडे आमचे लक्ष राहील. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची या प्रकरणी का चौकशी व्हावी याबद्दल माहिती आम्ही एसआयटी प्रमुखांना दिली आहे. चाकणकर यांचा राजीनामा ही आमची मागणी नाहीच. त्यांना पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यांच्या राजीनाम्यासाठी मी नाही तर त्यांच्या पक्षातीलच लोकं आग्रही होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरातकडून 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुरू आहे. यात किती केसेस असतील? हजारो केसेस या प्रकरणी असू शकतात. चाकणकर आणि खरात याचा 12 ते 13 वर्षांपासून संपर्क आहे. खरातला मोठे करणारी लोकं कोण आहेत, तर दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केला ते शालेय शिक्षणमंत्री? ते एमआयडीसीच्या मैदानावर काय करत होते. आवारे नावाचा माणूस जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे त्या पतसंस्थेमध्ये खरातचे आर्थिक व्यवहार असू शकतो त्या आवारेंची चौकशी झाली पाहिजे. खरातसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे.

पुण्यात इफ्तारवेळी मुस्लिम तरुणांवर हल्ला; आठ आरोपी अटकेत

पुणे, : पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसरात इफ्तारच्या वेळी मुस्लिम तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी (इफ्तारसाठी) काही मुस्लिम तरुण आस्करवाडी-भिवरी परिसरातील तलावाजवळ जमले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे १०० जणांच्या जमावाने अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार फिरोज जावेद सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, हल्लेखोरांनी तरुणांना धमकावत त्यांच्या डोक्यावरील टोप्या काढण्यास भाग पाडले आणि त्यानंतर काठ्या व धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हल्ल्यात किमान ११ तरुण जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, “या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.”

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: गणेश वाल्मीक कटके (२९), गणेश अशोक दळवी (३९), निखील वसंत कटके (२८), सागर नारायण कटके (३५), सुनिल रामदास भोराडे (३६), अजित शांताराम कटके (३३), युवराज बाजीराव कटके (३८) आणि ऋषिकेश संजय कटके (२३). हे सर्व आरोपी भिवरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील असून त्यांना २७ मार्च २०२६ रोजी पहाटे १.५५ वाजता अटक करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

या प्रकरणात अॅडव्होकेट तोसिफ शेख यांनी फिर्यादीच्या वतीने कायदेशीर कामकाज पाहिले. त्यांनी फिर्यादीला योग्य कायदेशीर मार्गदर्शन करत तक्रार नोंदविण्यापासून ते पुरावे सादर करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. जखमींना न्याय मिळावा यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रियेतही ते सक्रियपणे काम करत आहेत.

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक


मुंबई, 27 मार्च 2026

महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बहुवार्षिक वीजदर आदेश दिला असून त्यामध्ये महावितरणच्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक अशा सर्व वीज ग्राहकांसाठी 2030 पर्यंत सलग पाच वर्षे टप्प्या टप्प्याने वीजदरात कपात होणार असून त्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता व महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, गेले वर्षभर याबाबत आयोग, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर विविध सुनावण्या झाल्या. आता संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आयोगाकडून आदेश आल्यामुळे स्पष्टता व निश्चितता आली आहे.
त्यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून वीजदर कपातीच्या आदेशामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
कोणत्याही घटकातील वीज ग्राहकांसाठीच्या वीजदरात पाच वर्षे वाढ होणार नाही तर कपातच होणार आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पाच वर्षात 26 टक्के इतकी मोठी वीजदर कपात होणार आहे. एकूण घरगुती वीज ग्राहकांमध्ये या गटातील ग्राहकांचे प्रमाण 70 टक्के आहे. महिना 100 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच्या वीजदरातही पाच वर्षात पाच टक्के इतकी कपात होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, आयोगाने आर्थिक वर्ष 2026 ते 2030 असा पाच वर्षांचा आदेश दिला आहे. त्यामध्ये आता आर्थिक वर्ष 2026 -27 मध्ये प्रवेश करत असल्याने वीज ग्राहकांना आदेशातील दुसऱ्या वर्षाचा दर लागू होईल म्हणजेच त्यांना अधिक सवलत मिळेल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत ( म्हणजे सोलर अवर्समध्ये) वापरलेल्या वीजेसाठीची सवलत आता प्रती युनिट 8 पैशावरून वाढून 85 पैसे होईल. त्याच प्रमाणे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचा सरासरी दर आता 7 रुपये 10 पैसे होईल. शंभर ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठीचा सरासरी दर 12 रुपये 94 पैसे होईल. औद्योगिक ग्राहकांचाही दर आणखी कमी होईल.

विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन

आयोगाने या आदेशात विद्युत वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठीचा वीजदर स्पष्टपणे दिला आहे. हा दर महावितरणच्या कृषी वगळता सरासरी पुरवठा दरापेक्षा कमी ठेवला आहे. उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनसाठी आता प्रती युनिट 9 रुपये 50 पैसे इतका दर असेल. 2030 पर्यंत हा दर जवळजवळ स्थिर राहणार असल्याने विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, असे मा. विश्वास पाठक म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने, उत्पादन शुल्कात केली घट

किरकोळ पेट्रोल पंपांवरील किमती स्थिर, नुकसानग्रस्त तेल विपणन कंपन्यांनाही अंशतः दिलासा

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

केंद्र सरकारने, आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट केली असून, ती  तात्काळ लागू करण्यात आली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतींचा उडालेला भडका लक्षात घेऊन, ही घट करण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, कच्च्या तेलांच्या किमती वाढत असून, गेल्या महिनाभरात, त्या प्रती बॅरल 70 डॉलर्सवरुन, प्रती बॅरल 122 डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत-  पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि, त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने, केवळ चार आठवड्यात, यात 75 टक्क्यांची वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्री करणाऱ्या पेट्रोलपंपांवरच्या किमती स्थिर

उत्पादन शुल्कातली घट, किरकोळ पेट्रोल पंप धारकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही. त्याऐवजी, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन –आणि, या काळात, ग्राहकांना त्यांच्या पुरवठ्यापेक्षाही कमी किमतीत इंधन पुरवठा सुरू ठेवत, नुकसान सहन केले आहे- त्यांचे नुकसान या निर्णयामुळे अंशतः भरुन निघू शकेल. सध्या, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती लक्षात घेता, तेल कंपन्यांना, पेट्रोलमध्ये 26 रुपये प्रतिलीटर तर, डिझेलमध्ये 81.90 प्रती लीटर एवढे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे, तेल विपणन कंपन्यांचे दररोज एकत्रित नुकसान, सुमारे 2,400 कोटी रुपये इतके आहे. उत्पादन शुल्क घटल्याने, दोन्ही इंधनात होणारे हे नुकसान, लीटरमागे 10 रुपयांनी कमी होऊ शकेल. ज्यामुळे, किरकोळ बाजारात इंधनाच्या किमतीत बदल  न करता, तेल विपणन कंपन्या, इंधन पुरवठा सुरू ठेवू शकतील.

हे संकट उद्भवल्यानंतर दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशात, इंधनाच्या किमती 30 ते 50 टक्क्यांनी वाढल्या आहे. तर उत्तर अमेरिकेत 30 टक्के आणि युरोपात 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारताने मात्र, ही दरवाढ रोखून धरली आहे. यामुळे, सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असला तरीही तो सहन करण्याचा मार्ग सरकारने निवडला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले:

“सरकारसमोर दोन पर्याय होते: पहिला, इतर सर्व देशांनी जे केले, तसे भारतातील नागरिकांसाठी किमतीत मोठी वाढ करणे. किंवा, दुसरा पर्याय म्हणजे, नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेची झळ बसू नये, यासाठी आर्थिक आघाडीवर स्वतःच तो भार सोसणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकाचे हित जपण्यासाठी, सरकारी तिजोरीवरचा भार सोसण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती गगनाला भिडल्या असताना, तेल विपणन कंपन्यांना सध्या होत असलेले प्रचंड नुकसान कमी करण्यासाठी, सरकारने आपल्या कर महसूलावर पडणारा मोठा प्रभाव सहन करण्याचा निर्णय घेतला आहे.”

उत्पादन शुल्क कपातीबरोबरच सरकारने डिझेलवर  निर्यात शुल्क देखील लागू केले आहे. आंतरराष्ट्रीय डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्या असताना, निर्यातीला निरुत्साहित करण्यासाठी आणि रिफायनरी उत्पादन प्रथम देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने वळेल हे सुनिश्चित करण्यासाठी ही आकारणी करण्यात आली आहे. सध्या जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती लक्षात घेता, निर्यातीच्या संधी व्यावसायिकदृष्ट्या कितीही आकर्षक वाटत असल्या, तरी भारतातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा अखंड ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

हा निर्णय 2022 मधील रशिया-युक्रेन संघर्षानंतर स्वीकारलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या काळात तेल विपणन कंपन्यांनी सातत्याने होणारा तोटा सोसला होता, आणि जागतिक किमतींमधील चढ-उतारांपासून कुटुंबे व व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने केंद्रीय करांमध्ये कपात केली होती. आज करण्यात आलेला हस्तक्षेपही याच तत्वावर आधारित आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीसाठी भारताचे नागरिक आणि उद्योग क्षेत्र कारणीभूत नसून, त्यांना या व्यत्ययाची किंमत चुकवावी लागू नये. यासाठी, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवेल, आणि भारतीय ग्राहकांसाठी पुरवठा स्थिर राखण्यासाठी आणि किंमतींचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक संपन्न

पुणे, दि. २७: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. वाहतूक नियमनासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अतिरिक पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक नियोजन व नियंत्रणासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म तपशील लक्षात घेऊन पुढील १० वर्षाचे नियोजन करावे. मुख्य रस्त्यांवरील मिसिंग लिंक, बॉटलनेक काढणे, रस्ता रुंदीकरण, फुटपाथ व पायाभूत सुविधांसह संपूर्ण कॉरिडॉरच्या सुधारणा करण्यासाठी प्राथम्याने करावयाच्या येणाऱ्या कामांची यादी पुणे महानगरपालिकेने तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पथारी विक्रेत्यांचे क्षेत्र निश्चित करावेत, कार्यक्षेत्रानुसार काम करणाऱ्या संस्थांची निवड करावी, कामांची यादी तयार करुन कृती आराखडा तयार करावा, असे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

बैठकीत शहरातील ९० मुख्य चौकांमध्ये रस्ता रुंदीकरण, फेरीवाल्यांना सार्वजनिक सुविधा जागांमध्ये जागा देणे, पथदिवे बसविणे, बिनधनी वाहनांकरिता जागेची उपलब्धता, तंत्रज्ञान आधारित वाहतूक नियोजन, प्रलंबित इ-चलन, वाहतूक सल्लागार नेमणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

चंद्रपूरच्या मथुराताई पुनर्वसन प्रकरणाचा आढावा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २७ मार्च २०२६ : नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. घरकुल योजनेअंतर्गत घराचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सध्या प्लास्टरचे काम सुरू आहे. अंत्योदय योजनेद्वारे कुटुंबाला नियमित रेशन मिळत आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) चौकीदार म्हणून नोकरी देण्यात आली असून, आर्थिक स्थैर्यासाठी १० लाख रुपयांपैकी ७ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) सुपूर्द करण्यात आली आहे.

डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने निवारा, रोजगार आणि आर्थिक मदत या तिन्ही स्तरांवर समन्वित कार्यवाही केली आहे.

ग्रामसेवक व स्थानिक प्रशासनामार्फत योजनांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, उर्वरित बाबींबाबत उपसभापतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आर्थिक मदतीतील शिल्लक ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ वितरित करावी, घराचे उर्वरित २० टक्के बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करून कुटुंबाला लवकरात लवकर घर हस्तांतरित करावे, तसेच आरोग्य, रोजगार व उपजीविका या सर्व बाबींचा समावेश असलेली सर्वसमावेशक पुनर्वसन योजना राबवावी, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, कार्यवाहीचा नियमित प्रगती अहवाल उपसभापती कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मथुरा ताई यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाला गती मिळाली आहे