पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली व्यतिरिक्त महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत. अशी मागणी कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम (Chandu Kadam Congress) आणि नगरसेवक अरविंद शिंदे (Arvind Shinde Congress) यांनी केली आहे. याबाबत विधी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या येत्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या दर ३ वर्षांनी नियतकालिक बदल्या करणेबाबत धोरण आहे. परंतु काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या बदल्या या फक्त कागदोपत्री होत असून हे कर्मचारी बदली खात्यात रुजू होत नाहीत असे निदर्शनास येत आहे. असा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या राजकीय दबावाने तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या आशिर्वादाने महसूली खात्यात एकतर्फी बदल्या केल्या जातात असे देखील निदर्शनास आलेले आहे. (उदा. बांधकाम विभाग, कर आकारणी कर संकलन विभाग, आकाशचिन्ह विभाग, मुख्य लेखापाल व इत्यादी).
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, अशा महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यासाठी मोठया आर्थिक देवाणघेवाण होतात अशी महापालिकेत चर्चा असते. तसेच ठराविक कर्मचारी हे अन्य विभागात बदली झाली तरी, पुन्हा पुन्हा महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात येण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच एकतर्फी बदलीने कामास येतात हे अनेकवेळा दिसून आलेले आहे. परिणामी सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे अन्यायाची भावना तयार होते. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात दर ३ वर्षानी नियतकालिक होणाऱ्या बदल्या करणेबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
या प्रस्तावावर आता समितीच्या येणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

