Home Blog Page 55

केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ;१३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केशवनगर (मुंढवा) येथे सुमारे १३५.५७ कोटी रुपयांच्या योजनेला गती देण्यात आली आहे. या कामासाठी स्थायी समितीने आज मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी केशवनगर भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. या भागात गेल्या काही वर्षांत वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा ताण आला आहे. सध्या अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दररोज ३० ते ३५ टँकरची गरज भासत आहे.

प्रस्तावित योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी, पंपिंग यंत्रणा, जलवाहिन्यांचे जाळे आणि जल नलिकांमार्फत उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये २०० ते ८०० मिमी व्यासाच्या सुमारे ६.१९ किमी लांबीच्या मुख्य जलवाहिनीचे काम, ६०० किलोवॅट क्षमतेची पंपिंग यंत्रणा, तसेच सुमारे ७१.५० किमी लांबीचे वितरण जाळे उभारले जाणार आहे. याशिवाय २.५ ते ३.५ एमएल क्षमतेचे सहा उंच जलकुंभ उभारण्याचाही समावेश आहे.

या कामांचा एकूण खर्च सुमारे ११४.६६ कोटी रुपये असून, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि इतर शुल्क मिळून एकूण खर्च १३५.५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात या योजनेसाठी पुढील तीन वर्षांत (२०२६-२७, २०२७-२८ आणि २०२८-२९) टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या उपलब्ध निधी इतर गावांसाठी वापरला गेल्याने केशवनगरसाठी स्वतंत्र तरतूद आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७२ (ब) नुसार खर्चाचे दायित्व स्वीकारण्यासाठी मुख्य सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या पाहणीदरम्यान केशवनगरमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या योजनेला गती मिळाली.

नव्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करताना पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. केशवनगरमधील ही योजना पूर्ण झाल्यानंतर टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन नागरिकांना नियमित आणि दाबाने पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आल्याने दीर्घकालीन दिलासा मिळेल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

गाडीखाना दवाखान्याच्या विकासकामांसाठी ९७ लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

कसबा मतदारसंघातील गाडीखाना दवाखान्यात विविध विकास कामांसाठी सुमारे ९७.९६ लाख रुपयांच्या निविदेला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या भवन विभागामार्फत या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या कामाच्या एकूण खर्चात जीएसटी, रॉयल्टी आणि मटेरिअल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, एकूण खर्च सुमारे ९७.९६ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षात या कामासाठी अंदाजपत्रकात सुमारे ९५.२० लाख रुपयांचीच तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध निधीनुसार टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने गाडीखाना दवाखान्यातील विकासकामे महत्त्वाची मानली जात आहेत. या कामांमुळे दवाखान्याची पायाभूत सुविधा सुधारून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा भिमाले यांनी व्यक्त केली.

बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्रांचे लवकरच पूर्ण होणार

बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याच्या सुमारे १.७९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूरी दिली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
दरम्यान, त्याचे बांधकाम सुरू झाले असून लवकरच प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या भवन विभागामार्फत हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ८८+६५ ब तसेच ५४/१, ५४/२, ५४/३ या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. या कामासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या, त्यापैकी तीन पात्र तर तीन अपात्र ठरल्या. सर्वात कमी दराची निविदा स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली असली तरी संबंधित दर प्रचलित बाजारभावाशी सुसंगत नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून अतिरिक्त परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट (एफडी) घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या कामाच्या एकूण खर्चात जीएसटी, रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, एकूण खर्च सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. हा खर्च २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील ‘शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणे’ या अर्थसंकल्पीय शीर्षकातून भागवण्यात येणार असून, यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व सुसज्ज निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना राहण्याची सोय आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या गाध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरु आहे. दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत १ एप्रिल २०२६ पासून नवीन बॅचेस सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मागणी आधारित असून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत कौशल्ये उमेदवारांना प्रदान केली जाणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यामुळे त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांत अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार यांनी https://forms.gle/5ex7TDsBzP2BxAP58 या लिंकवर किंवा क्युआर कोडमध्ये आपली माहिती भरावी. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे शहर, ४८१, रास्ता पेठ, पुणे-४११०११ या कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवावे, भ्रष्टाचारांची चौकशी करून कारवाई करावी या या मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विद्यार्थी प्रश्नाबाबत युवा सेना, एन एस यु वाय, सम्यक विद्यार्थी आंदोलन, छात्र भारती, आझाद समाज पक्ष व इतर समविचारी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.विद्यापीठाच्या आधीसभेचे कामकाज सुरू असताना हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये युवासेनेचे राम थरकुडे, युवराज पारेख, परेश खांडके, वैभव दिघे , सोहम जाधव, प्रथमेश भुकन व आदी पदाधिकारी सहभागी होते. याचबरोबर छात्रभारतीचे अनिकेत घुले, सौरभ शिंपी  उपस्थित होते. प्रज्योत गायकवाड व इतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. आझाद समाज पार्टीचे सुलतान शहा, नॅशनल स्टूडेंट्स युनियन ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, महासचिव शीतल उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभुळकर, जिल्हा महासचिव रविराज कांबळे, सुशांत दसाडे, संदीप गायकवाड, शकील शेख, विकास अवचार व आदी कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अधिसभा सदस्य वायदंडे, पालवे तसेच परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी आंदोलकांशी संवाद साधला.

दहा दिवसात या मागण्या मार्गी लावण्याचे पत्र प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी दिले.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर “कमवा आणि शिका” योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जाणारे मानधन ₹५५ वरून ₹८० प्रति तास करण्यात यावे, अशी मागणी युवासेना, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तसेच समविचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

— सागर साळुंखे, प्रदेशाध्यक्ष, NSUI

विद्यापीठातील काही सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कमिशनखोरी, टेंडरिंग प्रक्रिया आणि मक्तेदारीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पुरेसा वेळ नसल्याचेही नमूद करण्यात आले.

— राम थरकुडे, शहर प्रमुख, युवासेना

एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा निषेध नोंदवण्यात आला असून, येत्या दहा दिवसांत हे कोर्स बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

— अनिकेत घुले, प्रदेशाध्यक्ष, छात्रभारती

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने शिवभक्तांसाठी ‘शिववंदना’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर, ता. भोर येथे आयोजित करण्यात आला.यामध्ये शाहिरी-गायन-वादन सादरीकरणही करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तमी’ १६४५ ला मावळ्यांसह परकीय राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, या घटनेला ३८१ वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभुमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात रायरेश्वर भूमीचा समग्र शाश्वत विकास, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत व महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वराज्य सर्किट’ (किंवा शिव स्वराज्य सर्किट) मध्ये श्री क्षेत्र रायरेश्वर प्रेरणाभूमीचा समावेश व हिंदवी स्वराज्य स्तंभ श्री क्षेत्र रायरेश्वर येथे उभारण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केली. स्वराज्याचा कुंभमेळा अधिक शासकीय माध्यमातून आणि व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याच्या निर्धार केला. भारताच्या-राज्याच्या विविध मंत्री महोदयांनी या सोहळ्याला, अभियानाला दिलेल्या शुभेच्छा व पाठीब्याचे वाचन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त शाहिरी-गायन-वादन सादरीकरणाचा शिव वंदना हा विशेष कार्यक्रम साजरा झाला. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था- रायरेश्वर, बायोस्फिअर्स संस्था, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. मोहन वामन, डॉ. सचिन अनिल पुणेकर, युवराज जेधे, मारुती आबा गोळे, दत्तात्रय जंगम, मौनीबाबा महाराज, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, मंगेश शिळीमकर, सुनील चिकणे, राहुल पापळ, रवींद्र जंगम, सचिन देशमुख, रोहन इंगवले, अमित घरत यांच्या उपस्थितीत उपक्रम संपन्न झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहातच साजरी झाली पाहिजे -महापौर मंजुषा नागपुरे यांचे आदेश

पुणे, दि. २७ मार्च २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त आवश्यक नियोजनाबाबत पुणे महापौर दालनात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक व कार्डियाक अॅम्ब्युलन्सची नियुक्ती, विद्युत रोषणाई, अग्निशमन व्यवस्था, महापालिका सुरक्षा, मोबाईल टॉयलेट, मंडप, स्टेज, टेबल-खुर्ची तसेच मदत कक्ष उभारणी यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय सम्राट अशोक स्तंभाची देखभाल व दुरुस्ती, तसेच दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी आणि डी.पी. रोड, औंध येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नियोजनानुसार ३० मार्च रोजी विश्रांतवाडी येथे आणि ३१ मार्च रोजी पुणे स्टेशन परिसरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे पुढील बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत महापौर सौ. मंजुषा नागपूरे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी प्रशासनाला सर्व नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस ,निलेश आल्हाट,सभासद,पुणे महानगरपालिका, ओमप्रकाश दिवटे ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), हिम्मत जाधव, डी.सी.पी. ट्राफिक,पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (बंडगार्डन,पुणे), श्रीमती संगीता देसाडला,कार्यकारी अभियंता ,भवन विभाग, धनंजय पिंगळे, ट्राफिक विभाग,श्रीमती आशा राऊत,उपायुक्त ,सुरक्षा विभाग, माधव जगताप, उपायुक्त झोन क्र.०१ , रवी पवार उपायुक्त कर आकारणी कर संकलन विभाग, डॉ. अशोक घोरपडे सह महापलिका आयुक्त उद्यान विभाग, सोमनाथ बनकर, उपायुक्त अतिक्रमण विभाग, अविनाश सकपाळ, उपायुक्त घनकचरा विभाग, वसुंधरा बारवे उपायुक्त शिक्षण विभाग,बिपीन शिंदे पुणे मुख्य अभियंता भवन विभाग, नंदकिशोर जगताप मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग, हांडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव, पोलिस निरीक्षक येरवडा वाहतूक श्रीमती निशिगंधा शिंगे, येरवडा वाहतूक विभाग, संदीप माढाले, फरासखाना विभाग,कुणाल धुमाळ, रमेश शेळके, राकेश विटकर सुरक्षा अधिकारी, प्रमोद उंडे कार्यकारी अभियंता विद्युत विभाग,सुनिल यादव कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल आंधळे,श्रीमती प्रज्ञा पवार सहा.महापालिका आयुक्त विजय भिलारे सहायक विभागीय अधिकारी अग्निशामक विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल

पुणे : ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’….‘घेई छंद मकरंद’,‘सावळा नंदाचा मूळ खोटा गे’  या अभंग, गवळणी आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या सुरेल सादरीकरणाने ‘सद्गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ भक्तिमय वातावरणात रंगला. राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या गायन सेवेमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात राजीव बर्वे व प्रियांका बर्वे यांनी गायन सेवा दिली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रियंका बर्वे यांनी हंसध्वनी रागातील गणपती स्तवनाने केली. त्यानंतर राजीव बर्वे यांनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या अभंगाने वातावरण प्रसन्न झाले. पुढे संत तुकाराम महाराजांचे ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, ‘मी माझा हरपून बसले गं’, ‘ध्यान करू जाता मन हरपले’, ‘घेई छंद मकरंद’ या अभंगांनी श्रोत्यांना भक्तिरसाचा आनंद दिला.

संत नामदेवांच्या रचनेवर आधारित व श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘विठ्ठला आवडी प्रेम भाव’ या सादरीकरणालाही विशेष दाद मिळाली. प्रियंका बर्वे यांनी सादर केलेली ‘सावळा नंदाचा मूळ खोटा गे’ ही गवळण टाळ्यांच्या गजरात रंगली. श्रोत्यांना तल्लीन करणाऱ्या ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 कार्यक्रमासाठी धनंजय वसवे (ढोलकी), आदित्य आठल्ये (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), अनय गाडगीळ (सिंथेसायझर) व राजेंद्र साळुंखे (तालवाद्य) यांनी उत्कृष्ट साथ-संगत केली.

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे

पुणे : प्रतिनिधी

एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा नव्याने घडवून त्याला जगाचे गुरुस्थान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थी वर्गावर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवताना राष्ट्रनिष्ठा आणि कामावरील निष्ठा अबाधित ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभुमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बलकवडे आणि उद्योजक डॉ. दिलीप देशपांडे यांच्या हस्ते सदानंद अचवल यांच्या स्मरणार्थ नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार अमेरिकास्थित अनिल प्रयाग यांनी प्रायोजित केलेले आहेत.

यावेळी ‘नाट्य आराधना’ पुरस्काराने इयत्ता सहावीतील अमोघ किरण कुलकर्णी, तर ‘नाट्य प्रेरणा’ पुरस्काराने इयत्ता दहावीतील गौरव विशाल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ‘माय सुपर हिरो’ या नाटकातील विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना बलकवडे यांनी कला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “कला माणसाचे जीवन समृद्ध करते आणि ती प्रभावी संवादाचे साधन आहे. भारताला ६४ कलांची परंपरा लाभली असून नव्या पिढीने ती अधिक समृद्ध करावी,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी नाटकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “नाटक हा समाजाचा आरसा आहे. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रभावी चित्रण नाटकातून करता येते. ही जिवंत कला असल्याने कलाकारांकडे समयसूचकता आणि एकाग्रता अत्यावश्यक असते.”

कार्यक्रमाची सुरुवात तनय नाझीरकर यांनी सादर केलेल्या नांदीने झाली. उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. अचवल यांचे वर्गमित्र दिलीप परदेशी यांनी अचवल यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर दीप्ती डोळे यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, नाट्यछंद विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि १९६३ च्या मॅट्रिक बॅचमधील अचवल यांचे अनेक वर्गमित्र उपस्थित होते.

शासन व्यवस्थेचा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले-गोपाळदादा तिवारी

पुरोगामी महाराष्ट्रात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ काँग्रेस ने केला.. मात्र त्यास प्रभावहीन करण्याचे काम फडणवीस सरकार काळात झाले…!

काँग्रेसची प्रखर टीका..!

पुणे : राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेने’ म्हंटल्या प्रमाणे मानवी वर्तन व निर्णय प्रक्रियेत वैचारिक तर्क लावण्याचे प्रयत्न केले जात नाहीत,” तेंव्हा अनायसे भिती निर्माण होते व तर्क विसंगत स्वार्थ व लाभासाठी निष्पापींवर अत्याचार होतात व अबला भगिनी अंधश्रध्देस बळी पडून ते या नराधमांच्या विकृत वाासनेच्या बळी जातात .. हे दुष्ट चक्र थांबवणे बाबत सरकारी व्यवस्थेची काय पावले पडतात (?) हेच लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थानी असलेल्या सरकारचे कर्तव्य असते. देशात प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने अंध श्रद्धा- जादू टोणा विरोधी बिल हे समाजाच्या व निष्पाप लोकांच्या रक्षणा साठी केले.. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणी; प्रबोधन व जनजागृती अभावी अबला भगिनी आज ही भोंदू गिरीचे बळी ठरत आहेत हे सत्तेवरील राज्यकर्त्यांचे अपयश असल्याची घणाघाती टिका काँग्रेस चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुणे काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

याप्रसंगी सुभाष थोरवे , ,भोला वांजळे तात्या शिर्के ,आबा जगताप ,गणेश मोरे ,राजेश सुतार ,संजय अभंग ,सुभाष जेधे गणेश शिंदे ,उदय लेले ,नरेश आवटे आदि उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, येनकेन प्रकारे सत्ता ताब्यात आल्यावर रयते प्रती, लोक रक्षणा प्रती, सामाजिक सुरक्षेच्या राजधर्माला सोईने तिलांजली दिली जाते.. हेच संतांच्या, समाज क्रांती कारकांच्या व राष्ट्रपुरुषांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडते आहे.. याची खंत वाटते.
समाजात योग्य वेळी योग्य मदतीच्या शोधात माणसे असतात. जेंव्हा लोकांच्या व्यक्तीगत सामाजिक अडचण वाढतात. सरकारी यंत्रणेवर वा शासकीय व्यवस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास उडायला लागतो… त्यांना सरकारचा ठोस आधार वाटत नाही.. तेंव्हा ते समस्यांसाठी मार्ग शोधू लागतात व बुवाबाजी’चा आधार घेण्यास आंधळे पणाने तिकडे वळतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन व वास्तववादी प्रयत्न शासकीय व्यवस्थेकडून होत नसल्याने हे प्रकार घडतात.
जादू टोणा व अंधश्रद्धा विरोधी कायदा याचे सरकार किती प्रचार व प्रसार करते (?) या बाबत सरकार पातळीवर प्रचंड अनास्था पाहायला मिळते. निद्रित राज्यकर्ते व सरकारी व्यवस्थेमुळे भोंदू बाबांचे व पाखंडीचे प्रस्थ वाढल्याची टीका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते यांनी केली.
व्यवस्था पारदर्शक व संवेदनशीलतेने काम करत नाही त्यामुळे ही असे दुर्दैवी प्रकार घडतात.
पुरोगामी व प्रगतीशील महाराष्ट्रात.. बुवा बाजीचे व भोंदू गिरी च्या फसवणुकीचे प्रस्थ वाढण्यास राजकीय हस्ती व राजाश्रय कारणीभूत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
“राज्यसरकार मधील सत्तेच्या प्रभावाचा प्रचंड दुरुपयोग” भोंदूबाबा खरात सारखी मंडळी करत होती .. तेंव्हा फडणवीसांचे सरकार काय करत होते…
४ मार्च २०२५ दैनिक खबरदार पुढारी… भोंदू कॅप्टन बाबाचा पोल खोल… बातमी प्रसिद्ध…
किती शासकीय व पोलीस यंत्रणांनी याची दखल घेतली,।

उलट पक्षी,,, महिला आयोग प्रमुख चाकणकर यांनीच पुढारी वृत्त पत्राचे संपादक खेमनार यांनाच माफ़ी मागायला लावली?
भक्ती ही आंतर्मनाची ठेव आहे.. बाह्य दिखाव्याची नाही…
संकटाचा तार्किक शोध घेण्याऐवजी झटपट उपायांचा मार्ग लोक भिती व स्वार्था पोटी निवडतात.. अदृश्य शक्तीवर, व अंधश्रद्धा, जादूटोणा वर लोकांना विश्वास ठेवूनये यावर शासकीय यंत्रणेने प्रबोधन केले पाहिजे.
व्यवस्थेस प्रश्न विचारणे .. जनतेस सक्षम, साक्षर व वस्तुनिष्ठ ठेवण्यासाठी सतर्कता जोपासण्याचे काम राज्य सरकारचेच आहे. देशात सुसंस्कृत, सभ्य, प्रगत समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राच्या प्रतिमेस’ धक्का… खरात प्रकरणाने मोठा बसला आहे. महाराष्ट्राची ओळख ही प्रगतिशील विचारांमुळे राहीली आहें.
महात्मा फुले, छ श्रीमंत शाहू महाराज, डॅा आंबेडकर बुध्दीप्रामाण्यवाद आगरकर आदींनी समाजात विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची व अन्याय विरुद्ध ऊंभे राहण्याची शिकवण दिली.. अंधश्रद्धा भेदभाव शोषण या विरुद्ध लढण्याची शिकवण दिली..! विवेक , समता व विज्ञान निष्ठ दृष्टिकोन दिला
भारतीय राज्यघटनेत देखील याच विचारांना स्थान आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल ५१ (fundamentals duties) मुलभूत कर्तव्यामध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद जपणे व प्रगत आणि प्रगल्भ समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी सुधारणा करण्याची भावना जपण्याचे म्हटले आहे.
त्यामुळे समस्या व संकटे श्रध्देत नाही तर अंधश्रद्धेत आहेत असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर बदल, अल्पसंख्याक संस्थांना दिलेली सूट यांचा समावेश असल्याची माहिती  नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे, अमेय सप्रे उपस्थित होते. 

पुढे बोलतान सीए सर्वेश मेहेंदळे म्हणाले, भारतीय संविधानातील कलम 21A नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी भूमिका संस्थेची आहे. 

शिक्षण हा मूलभूत हक्क असल्यामुळे आरटीई  कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (Section 1(5)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणी करण्यात आली.

सध्याचा 1 किमी/3 किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत असल्याने, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे सुचविण्यात आले.  समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद

पुणे:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले. या शोभायात्रेमुळे धायरीत प्रचंड उत्साहाचे, भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

सरकार प्रतिष्ठान, अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली. लक्ष्मी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आशिष बेनकर, अक्षय उंदरे, गणेश साखरे, सचिन सोनवणे, संदीप स्वामी, गणेश पासलकर, गणेश खामकर, अजिंक्य जाधव यांनी ही यात्रा भव्य आणि देखण्या स्वरूपात पार पाडली.

भव्य रथावर फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई, त्यात प्रभू श्रीरामांची धनुर्धारी प्रतिमा स्थापित करण्यात आली. या रथाच्या समोर सध्या समाजातील अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेल्या महिलांवरील अत्याचार आणि विशेषतः लव्ह जिहादच्या नावाखाली होणारी महिलांची फसवणूक याबाबत जनजागृती करणारे देखावे, आणि चित्र यांचा समावेश असलेला रथ मार्गक्रमण करत होता. म मल्हारी खंडेराय आणि बानू यांच्या विवाहाचा देखावा आणि पारंपारिक कर्नाटकी देखावाही एका रथावर साकारण्यात आला.

शंखवादन पथक, परशुराम वाद्य पथक, ढोल लेझीम पथक, बँड पथके, वारकरी भजनी मंडळ यांनीही शोभायात्रेत सहभागी होऊन त्यात रंग भरले. शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या बाजूला गर्दी केली. गणेश नगरी ते धायरी फाटा या मार्गावर काढण्यात आलेल्या या शोभायात्रेमुळे परिसरातील वातावरण पावित्र्यमय बनले.

शोभा यात्रेचे हे दुसरे वर्ष असून अल्पावधीतच या उपक्रमाला धायरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांमध्ये धर्मभावना, संघटितपणाची वृत्ती निर्माण करण्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नाबाबत वाचा फोडणे व जनजागृती करणे, या उद्देशाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या रथयात्रेचे आयोजन केले जात असल्याची माहिती गणेश साखरे यांनी दिली.

युद्धाच्या परिणामाबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्योग संस्था, व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करावी – सुनील माने

पुणे -दिनांक २७ (प्रतिनिधी):  आखाती देशात इस्राइल व अमेरिका यांनी इराण बरोबर जे युद्ध सुरू केल आहे, त्यामूळे महाराष्ट्रातील व्यापार,कृषी, आयात – निर्यात या सर्व व्यवसायांवर संकट ओढावले आहे. उद्योग क्षेत्रातील अनेक लोक याबाबत चर्चा करत आहेत. त्यामूळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व संस्था, या संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी, शिखर संस्था यांच्याबरोबर एक बैठक घ्यावी अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्याना ई मेल द्वारे पाठवले आहे.

सुनील माने यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आपल्या देशाबरोबरच  महाराष्ट्राचे ही उद्योग, व्यापार यांचे नुकसान होत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरल्यामुळे आखाती देशांकडून आपल्या देशाला होणारा पेट्रोल. डिझेल, गॅस यांचा पुरवठा कमी झाला आहे. याप्रमाणेच रासायनिक खतांचा सुद्धा पुरवठा कमी झाला आहे. या युद्धामुळे अन्नधान्याची आयात –निर्यात ठप्प झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विजेसाठी लागणाऱ्या कोळश्याची सुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ऊर्जा आणि वीजपुरवठा क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशाबरोबर महाराष्ट्रावर सुद्धा होणार आहे. त्यामूळे युद्ध पुढे वाढले तर काय होईल याबाबत महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार क्षेत्र चिंतेत आहे. उद्योग क्षेत्रातील अनेकजण याबाबत आमच्याशी चर्चा करत आहेत.

या युद्धामुळे आर्थिक चक्र थांबण्याचे संकेत आहेत. राज्यातून निर्यात होणाऱ्या मालाचे हजारो कंटेनर जे एन पी टी बंदरात अडकून पडले आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी  संबंधित व्यापार- उद्योग संघटना तसेच पेट्रोलियम व  इतर कंपन्यांचे आधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक आयोजित करावी. या बैठकीत युद्धामुळे महराष्ट्रात आता स्थिती काय आहे?  शासकीय पातळीवर काय मदत केली जाऊ शकते याची माहिती दिली जावी, देशभरात एक कोटीच्यावर नोकऱ्यांना बाधा पोहचली आहे. महाराष्ट्रात अशी किती नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे याचीही चर्चा या बैठकीत व्हावी. तसेच या नुकसानीतून आपण कसे बाहेर पडू शकू याबद्दल सरकार तर्फे मार्गदर्शन करून काही योजना आणल्या पाहिजेत. या परिस्थितीमुळे राज्यातील जनता भयभीत झाली आहे. त्यामूळे दररोज या व्यापारावर लक्ष देण्यासाठी व राज्यातील जनतेची भीती कमी करण्यासाठी एक समिती नेमावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!

फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!

मुंबई, (प्रतिनिधी) : हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध परंपरा, मंदिरसंस्कृती, तसेच अतिथी देवो भव या तत्त्वावर आधारित आदरातिथ्यामुळे जगभरातील पर्यटक आणि व्यावसायिक येथे आकर्षित होतात.

अशा या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध फुकेतमध्ये पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून, मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा एक अनोखा उपक्रम साकार झाला आहे.

दुबईस्थित उद्योगपती आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांच्या पुढाकारातून भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयन नागरिकांसाठी फुकेतमध्ये घर खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या SQCC Properties LLC (Dubai, UAE) आणि Phuket9 Real Estate Development (Thailand) यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात आहेत.

फुकेतच्या रम्य समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गरम्य वातावरणात उभे राहणारे हे प्रकल्प आधुनिक जीवनशैली, सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देणारे आहेत. त्यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि स्थिर उत्पन्न या तिन्ही दृष्टीकोनातून गुंतवणूकदारांसाठी हा प्रकल्प विशेष ठरत आहे.

‘Phuket9’ ही कंपनी 2004 पासून फुकेतमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांचा समावेश असून सर्व प्रकल्पांसाठी व्यावसायिक प्रॉपर्टी मॅनेजमेंट सुविधा दिल्या जातात.

मुंबईतील JW Marriott, सहार येथे आयोजित कार्यक्रमात Phuket9 च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

फुकेतमधील दगडूशेट गणपती मंदिराच्या निर्मितीमागील कथा प्रेरणादायी आहे. या मंदिरात होणाऱ्या शोडोपचार पूजा, आरती आणि भजनात परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून भारतीय संस्कृतीचे जागतिक आकर्षण स्पष्ट होते. या मंदिराची निर्मिती सौ. मीपा यांच्या वडिलांनी केली असून, स्वतः त्यांचा मंदिरातील दररोजच्या सेवा कार्यात विशेष सहभाग असतो.

या प्रसंगी बोलताना मिस पापाचसॉर्न मीपा (Ms. Papachsorn Meepa “Kae”) म्हणाल्या, “आमचे ध्येय म्हणजे आमच्या ग्राहक, भागीदार आणि आमच्या टीमसाठी एक मजबूत आणि स्थिर संस्था उभी करणे. या दृष्टीकोनामुळे अधिकाधिक सकारात्मक विचारांचे लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आम्हाला आमच्या मुख्य कार्यालयात आपले वैयक्तिक स्वागत करण्यास नेहमीच आनंद वाटतो. फुकेत येथे आपले हार्दिक स्वागत आहे!”

यावेळी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले, “फुकेत ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भारतीयांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे नवे केंद्र आहे. मराठी संस्कृतीची जोड आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे हा प्रकल्प गुंतवणूकदारांसाठी विशेष ठरेल.”

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यात सातत्याने वाढ करण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय मानली जाते. वाढता पर्यटन व्यवसाय, मर्यादित जमीन उपलब्धता आणि नियोजित विकासामुळे फुकेतमधील मालमत्ता बाजार सातत्याने बळकट होत आहे.

Phuket9 चा फुल-सायकल अ‍ॅप्रोच हा या प्रकल्पाचा मुख्य आधार असून, सखोल मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापनापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि विश्वासार्ह परतावा मिळण्यास मदत होते. कंपनीकडून मोफत कन्सल्टेशन सेवा उपलब्ध असून, ग्राहकांना योग्य मालमत्ता निवडण्यासाठी तसेच वैयक्तिक प्रोजेक्ट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले जाते.

फुकेतमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी आणि संधी जाणून घेण्यासाठी   Ms. Shreya Manjjarekar, SOC Corporation Properties LLC, Tel : +971 50 472 9635, +97145136075 Mob: +971505343653, sunil@sqccproperties.com मेलवर किंवा www.sqccproperties.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मुंबईत संपन्न झालेल्या या विशेष परिषदेला महाराष्ट्रातील विविध शहरांमधून उद्योग-व्यावसायिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. ही महाराष्ट्रातील उद्योजक आणि नागरिकांसाठी सुवर्ण संधी असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून देण्यात आली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या हातातील घड्याळ गणेश शिंदे यांच्या हाती बांधून केला सन्मान

कोथरूडमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात; गणेश शिंदे यांच्या भाषणाने श्रोते भारावले

पुणे— रामनवमीच्या निमित्ताने कोथरूड येथील जीत मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुडुंब भरलेल्या मैदानात आणि सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.

या संमेलनात वक्ते गणेश शिंदे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी शैलीत निसर्ग, समाज आणि अर्थकारण या विविध विषयांना स्पर्श करत श्रोत्यांना भावनिक साद घातली. ऐतिहासिक दाखले देत त्यांनी सद्य परिस्थितीची सांगड घालत विचार मांडले. “आज सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असताना संतांचे विचारच मानवजातीला तारू शकतात,” असा आशय व्यक्त करत त्यांनी श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले.

त्यांच्या भाषणादरम्यान कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी स्तब्ध शांतता, तर कधी श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले. संपूर्ण वातावरण अक्षरशः भारावून गेले होते.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वतः उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत शिंदे यांच्या वक्तृत्वाचे मनापासून कौतुक केले. त्यानंतर ते शिंदे यांच्या जवळ जाऊन त्यांनी आपल्या हातातील घड्याळ त्यांच्या हातात बांधत विशेष सन्मान केला.

या प्रसंगी प्रतिक्रिया देताना गणेश शिंदे म्हणाले, “दादा, ही वेळ कायम लक्षात राहील.”

या प्रेरणादायी क्षणामुळे संमेलनातील उपस्थितांमध्ये उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

१५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता,विरोध भाषणात पण लेखी उपसूचना एकाकडूनही नाही

पुणे _महापालिकेतील स्थायी समितीने मुख्य सभेला सादर केलेल्या १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एकमताने मान्यता मिळाली.विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केवळ भाषणात केला पण कुठल्याही विषयात दुरुस्ती साठी वा अन्य लेखी उपसूचना एकाकडूनही देण्यात आली नाही. त्यामुळे भाषणात विरोध असतानाही अर्थसंकल्पाला एकमताने मान्यता मिळाली.अर्थात मुख्यसभेला अंदाजपत्रक सादर करताना तब्बल २ तास ४० मिनिटांचे झंझावाती भाषण आणि एका दिवसात १२ तास सभा चालवून अर्थसंकल्पाला मान्यता घेणारे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले या वर्षातील पहिल्याच अर्थ संकल्पाचे ‘बाजीगर ‘ ठरले आहेत. आता यापुढे अर्थात त्याच्या अंमलबजावणी साठी त्यांना हीच बाजीगरी दाखवणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

अर्थ संकल्प मुख्य सभेपुढे आला तेव्हा महापालिकेत मांडलेला १५ हजार ६६९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाद्वारे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकास करणारा आहे, असा दावा भाजपने अर्थसंकल्पावरील चर्चेत केला. तर, अर्थसंकल्प भाजप व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये भेदभाव करणारा आहे. समाविष्ट गावांच्या विकासावर परिणाम करणारा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली अर्थसंकल्पावरील सभा बारा तासांहून अधिक वेळ चालली. त्यात रात्री उशिरा अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी विशेष सभा घेण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी काहीकाळ सभागृहाचे कामकाज पाहिले.चर्चेच्यावेळी एकीकडे भाजपच्या नगरसेवकांकडून अर्थसंकल्पावर स्तुतिसुमने उधळली जात असताना, विरोधी पक्षांकडून मात्र राजकीय विरोधाचीच भाषणे झाली . अमोल बालवडकर यांच्या वार्डात निधी देण्याची मागणी भाषणातून झाली मात्र लेखी उपसूचना कोणीही दिली नाही, ७०० चौरस फुटाच्या घराला मुंबई महापालिका आता मिळकत कर माफी देऊ लागली आहे आपण ५०० चौरस फुटाच्या घराला सरसकट सर्वांना मिळकत कर माफी द्यावी अशी हि लेखी उपसूचना कोणी दिली नाही . मात्र भाषणातून .. आपण जाहीरनाम्यात ५०० फुटाच्या घराला सरसकट मिळकत कर माफी देण्याचे आश्वसन कशाला दिले होते ? असा सवाल मात्र केला गेला. यावेळी निवडणुकीतील भाजपचा जाहीरनामा कोणीही सभागृहात दाखविला नाही.

‘पुणे प्रथम’ या ब्रीदवाक्याला साजेसे चित्र अर्थसंकल्पात उमटले आहे. निधीची चांगली तरतूद केली आहे. त्यामध्ये सर्वांची दखल घेतली आहे. त्यामुळे मानाचा तुरा रोवला जाईल. विरोधकांच्या सूचना कामाला गती देतील, तो शहरहिताचा आरसा असेल. विकासाच्या मुद्द्यावर हेवेदावे विसरून आपण एकत्र आहोत, एकत्र काम करू.: महापौर मंजुषा नागपुरे

विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी निधी वाटपावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. निकम म्हणाले, ”विरोधी पक्षातील नगरसेवकांना अत्यल्प निधी दिला आहे. मतदारांचा, त्यांच्या प्रश्‍नांचा विचार केलेला नाही.” काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप म्हणाले, ”निधीचे वाटप करताना सत्ताधाऱ्यांना ४०-४० कोटी, तर कोंढव्यासारख्या भागाला हात आखडता घेतला आहे. सात नगरसेवकांना अत्यल्प निधी दिला, हे योग्य नाही.” भाजपने शिक्षण आणि आरोग्याचे खासगीकरण करू नये. आरोग्यासाठी ८८१ कोटी रुपयांची तरतूद असली, तरी प्रत्यक्ष उपचारांसाठी १८० कोटी रुपयेच उपलब्ध होत आहेत, असे नंदिनी धेंडे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात जाहीर केलेले कर्करोग रुग्णालय, आयव्हीएफ उपचारांसह आरोग्य योजनांमुळे पुणेकरांच्या निरोगी आरोग्यास प्राधान्य दिले आहे,” असे पल्लवी जावळे यांनी सांगितले. ”हा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा आहे,” असे स्मिता वस्ते यांनी नमूद केले. ”लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा अर्थसंकल्प आहे,” असे रूपाली धाडवे यांनी सांगितले. कॉँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम म्हणाले, ”हा स्वप्नाळू अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून पुणेकरांचा काहीही फायदा होणार नाही.”

अर्थसंकल्प तयार करताना सर्वांना समान निधी वाटप होईल, याची योग्य काळजी घेतली आहे. सत्ताधारी व विरोधक असा कुठलाही भेदभाव आम्ही केलेला नाही. शहरातील समस्या दूर करताना नव्या संकल्पना, योजना, उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.:श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती

देशातील सर्वांत जास्त विकसित होणाऱ्या पुण्याचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. त्यात सर्व घटकांना प्राधान्य दिले आहे. सर्व प्रश्‍नांवर ठोस उपाययोजना केल्या आहेत. राजकारण न करता विरोधकांनाही निधी दिला आहे. हा अर्थसंकल्प भाजपचा नसून पुणेकरांचा आहे.: गणेश बिडकर, सभागृह नेते, महापालिका

अर्थसंकल्पावर उपसूचना देण्याची आपल्या महापालिकेत प्रथा नाही..पण कायदेशीर तरतूद आहे.

जाणकार अधिकारी, माजी नगरसचिव , माजी स्थायी समिती अध्यक्ष या सर्वांशी चर्चा केल्यावर पुणे महापालिकेत मुख्य सभेत जेव्हा अर्थसंकल्प मंजुरी साठी आणला जातो तेव्हा त्यावर उपसूचना देण्याची प्रथा नाही पण कायदेशीर बाबी पाहिल्या तर उपसूचना देता येते असे सांगितले गेले .

अशी उपसूचना दिल्यावर काय होते ?

सभागृहातील विरोधी पक्ष नेते , गटनेते विविध समित्यांचे अध्यक्ष हे जाणकार मानले जातात . त्यांना महापालिका ज्या BPMC अॅक्ट नुसार चालते तो त्यांना चांगला अवगत असतो असे मानले जाते . कोणताही सदस्य अशा वेळी उठून मला उपसूचना द्यायची आहे असे म्हटल्यास , त्याला नगरसचिव यांच्याकडून एक फॉर्म दिला जातो . हि उपसूचना स्वीकारणे किंवा न स्विकारणे याबाबत महापौरांना तत्क्षणी काही अधिकार नसतो .ती स्वीकारावी लागते आणि अशी उपसूचना प्राप्त होताच संबधित सभा तत्काळ ३ दिवसासाठी तहकूब करावी लागते. त्यानंतर ३ दिवसांनी होणाऱ्या सभेची जाहिरात करावी लागते. आणि ती सभा जेव्हा सुरु होते तेव्हा ज्याने हि उपसूचना दिली त्या सभासदाला प्रथम हि उपसूचना का दिली? यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि नंतर ती उपसूचना स्वीकारायची किंवा नाही स्वीकारायची किंवा मतदानाने फेटाळायची याबाबत महापौर आदेश देतात .

पण या साऱ्या गोष्टींना बगल देऊन अर्थसंकल्प मान्य करून घेण्यात जी तरबेजता दाखविली ती नक्कीच राजकीय दृष्ट्या वाखाणण्याजोगीआहे. याचे आणि अर्थात चांगला आहे असाच अर्थसंकल्प केल्याचे सारे श्रेय स्थायी समिती अध्यक्ष यांना राजकारणात दिले जाईल यात शंका नाही.

घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर २% वरून १% करावा:नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची मागणी

0

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, मिळकत कर थकबाकीवरील दरमहा २% (वार्षिक २४%) शास्ती कर कमी करून १% करण्याची मागणी नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी केली आहे. यासंदर्भातील ठराव उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
वाढती महागाई, आर्थिक अडचणी आणि सर्वसामान्य नागरिकांवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेता, घरगुती करदात्यांवर सध्याचा उच्च शास्ती कर दर अन्यायकारक ठरत आहे. सध्या घरगुती आणि व्यावसायिक करदात्यांवर समान दराने शास्ती कर आकारला जात असून, याचा सर्वाधिक फटका लहान व मध्यम मिळकतधारकांना बसत आहे.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिक प्रथमच करप्रणालीत आलेले असून, त्यांना अद्याप करप्रक्रियेची पूर्ण माहिती व मूलभूत सुविधा (रस्ते, पाणी, मलनिस्सारण) पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर २% शास्ती कर लादणे योग्य नाही.
मिळकत कर विभाग हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून, १९ फेब्रुवारी २०२६ अखेर सुमारे २७१३.६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, सुमारे ५.४१ लाख मिळकतधारकांकडे अजूनही थकबाकी प्रलंबित आहे. यावरून मोठ्या थकबाकीदारांकडेच मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून असल्याचे स्पष्ट होते.
महानगरपालिकेच्या अभय योजनेत दंडावर ७५% सवलत दिल्यानंतर ९२४.७० कोटी रुपयांची वसुली झाल्याचे उदाहरण देत, दंड कमी केल्यास करदाते सकारात्मक प्रतिसाद देतात, असेही मानकर यांनी नमूद केले.
तसेच, आतापर्यंत केवळ २३४ मिळकतींवरच जप्ती व सीलिंगची कारवाई करण्यात आली असून, ती अपुरी आहे. मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या :
• घरगुती करदात्यांसाठी शास्ती कर दर २% वरून १% करावा
• मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबवावी
• जप्ती, सीलिंग व कायदेशीर कारवाई अधिक प्रभावी करावी
सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व कर वसुली अधिक न्याय्य आणि परिणामकारक करण्यासाठी हा ठराव मंजूर करावा, अशी मागणी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी केली आहे.