Home Blog Page 53

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग ‘पांढरा हत्ती’:अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

पुणे-शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खर्डेकर यांनी या निवेदनात असे म्हटले आहे कि , छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होता आणि पार्किंगची समस्याही आजच्या इतकी गंभीर नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरल्याचा आरोप करत त्यावेळी आंदोलनेही झाली होती.

गेल्या दोन दशकांत शहरातील परिस्थिती बदलली असली तरी, हा प्रकल्प बहुतांश काळ बंदच राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत पाठपुरावा केला असता, मेट्रो प्रशासनासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत ही यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असून, परिसरात कचरा साचलेला दिसत आहे.

तज्ञांच्या मते, सध्याच्या मोठ्या आकाराच्या वाहनांमुळे या जुन्या यंत्रणेत पार्किंग करणे अवघड आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या जागेचे नूतनीकरण करण्याऐवजी पर्यायी उपयोगाचा विचार करावा, अन्यथा पुन्हा ‘पांढरा हत्ती’ निर्माण होईल, अशी भूमिकाही खर्डेकर यांनी मांडली आहे.

बालेवाडीतील कचरा वर्गीकरण शेडला भीषण आग

पुणे- : बालेवाडी येथील महामार्गालगत असलेल्या कचरा वर्गीकरण शेडमधील कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. सलग तीन तास हा कचरा जळत असल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “कचरा वर्गीकरण शेड”च्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठवून ठेवला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असून कचरा डेपोच्या मागील बाजूस पुणे महानगरपालिकेचा बस डेपो देखील आहे. आगीमुळे बस डेपोला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच परिसरात मेट्रो, महामार्ग आणि बस डेपो असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हा कचरा वर्गीकरण प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवावा, अशी मागणी बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आग लागण्याची नेमकी कारणे शोधून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बालेवाडी रेसिडेन्शियल असोसिएशनने सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना यासंदर्भात निवेदन देऊन संभाव्य धोक्याबाबत इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

“पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोग कालवा फुटीप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या…”

कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना

मुंबई, दि. १२ मे २०२६ : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोग परिसरात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची गंभीर बाब उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आली आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.

दिनांक १२ मे २०२६ रोजी झालेल्या या घटनेमुळे कालव्याचे पाणी शेतजमिनीत घुसल्याने पिके, सुपीक माती, शेतबांध तसेच सिंचन व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत आणि स्थानिक शेतकऱ्यांनी डॉ. गोऱ्हे यांना दिली.

या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महसूल व जलसंपदा विभागामार्फत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार त्वरीत नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी सूचना केली आहे.

तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित कालव्याची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत. कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सदर प्रकरणात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयास सादर करावा, अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित विभागाला केली आहे.

महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने सकारात्मक चर्चा

“लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल – डॉ. नीलम गोऱ्हे”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार

मुंबई, दि. १२ मे २०२६ :
पुण्यातील महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विधानभवनात आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची प्रक्रिया राबविताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात यावे, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समिती, पुणे यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष व ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत रहिवाशांच्या पुनर्वसन, मोबदला, फ्लॅट वाटप आणि सर्वेक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इतर महानगरपालिकांमध्ये देण्यात आलेल्या मोबदल्याचा अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश दिले. महानगरपालिका किती जागा सामावून घेऊ शकते याचाही अभ्यास करण्यात यावा. ज्या महानगरपालिकांमध्ये जितका मोबदला देण्यात आला आहे त्याचाही अभ्यास करण्यात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना १५ तारखेला विशेष बैठक घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या. संबंधित रहिवाशांसमोर धोरण मांडण्यात यावे, त्यांना आवाहन करण्यात यावे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकता आणि लोकाभिमुख भूमिका महत्त्वाची असून ज्यांना रोख रक्कम हवी आहे त्यांना रोख मोबदला आणि ज्यांना फ्लॅट हवा आहे त्यांना फ्लॅट देण्याचा पर्याय विचारात घेण्यात यावा. सर्व स्मारकांचे सर्वेक्षण करून संपूर्ण तपशील लोकांसमोर मांडण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

कृती समितीच्या सदस्यांना स्थायी समिती सदस्यांकडे निवेदन सादर करून आपले मत अधिकृतपणे नोंदविण्याचाही सल्ला डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यामुळे किती लोक घर स्वीकारण्यास तयार आहेत आणि किती लोकांना रोख रक्कम हवी आहे याची स्पष्ट माहिती उपलब्ध होईल. बैठकीपूर्वी लोकांचे मत जाणून घेतले तर ते उपयोगी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सपकाळ यांनी सर्व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन वन-टू-वन संवाद साधण्यात यावा. त्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

तसेच महात्मा फुले स्मारक रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, उपायुक्त सपकाळ, नगर विकास विभाग २ च्या उपसचिव प्रियंका छापवाले, महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, समितीचे सदस्य विशाल मोहिते, अमर नाईक, अविनाश देवकुळे, श्रीनिवास गोणे, नरेंद्र कच्चावे यांच्यासह इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

बिबवेवाडीत आग … ५ सिलेंडरचे स्फोट

पुणे- उन्हाळा तापलेला असताना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील एका गोडाऊन ला भीषण आग लागली ,मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या हिकमतीने हि आग विझविली . आगीत पाच सिलेंडर चे स्फोट झाल्याची आणि १ टेम्पो आणि ७ दुचाकी वाहने जळाल्याची माहिती मिळते आहे.

अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले कि,’ ६५८, बिबेवाडी, अप्पर डेपो ओसवाल दवाखान्याच्या समोर काळे अँड सन्स गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची वर्दि नियंत्रण कक्षात प्राप्त होताच दलाकडून तातडीने अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.घटनास्थळी पोहोचताच पाहिले की, आगीने रौद्र रूप धारण केले असून आजूबाजूला वस्ती असल्याने तात्काळ आगीवर चार ही बाजूने पाण्याचा मारा करीत कोणी जखमी अथवा आगीत अडकले नसल्याची खाञी केली. या ठिकाणी मंडप साहित्याचा मोठा साठा असलेले आठ हजार चौरस फुटाचे गोडाऊन होते. आगीमध्ये त्या ठिकाणचे कार्पेट आणि कापड व इतर सजावट साहित्याला मोठ्या प्रमाणात आग होती. तिथेच असलेला एक चारचाकी टेम्पो व सात दुचाकी वाहने जळाली तसेच चार ते पाच सिलेंडरचे स्फोट झाले. या आगीत कोणी जखमी वा जिवितहानी नसून अग्निशमन दलाने वेळेत बजावलेल्या कार्यामुळे मोठा अनर्थ टळला असून यावेळी स्थानिक नागरिक, पोलिस, महावितरण यांनी सहकार्य केले. अग्निशमन दलाकडून ७ अग्निशमन वाहने व ३ वाॅटर टँकर तसेच मनपा विभागाचे ११ टँकर उपलब्ध झाले होते. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाकडून एक अग्निशमन वाहन दाखल होते.

या कामगिरीत मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईक नवरे, कैलास शिंदे आणि जवळपास ५० जवान यांनी आग विझवण्यात मोठी कामगिरी बजावली.”आगीची भीषणता व नागरिकांकडून नियंत्रण कक्षात सतत येणारे फोन पाहता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चार ही बाजूने अधिक अग्निशमन वाहने पाठवत आजूबाजूला नागरी वस्ती व दुकाने पाहता आग इतरञ न पसरु देता जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले व धोका टाळला. यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.

“आगीची भीषणता व नागरिकांकडून नियंत्रण कक्षात सतत येणारे फोन पाहता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चार ही बाजूने अधिक अग्निशमन वाहने पाठवत आजूबाजूला नागरी वस्ती व दुकाने पाहता आग इतरञ न पसरु देता जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले व धोका टाळला. यामुळे सुदैवाने मोठी हानी टळली.”- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर; आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.आणि आता, ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला, तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा, कुंभाभिषेक, ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती—हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरुत्थानाकडे झालेल्या अखंड प्रवासाची घोषणा करतात. सरदार पटेलांच्या दूरदृष्टीपासून आजच्या आत्मविश्वासपूर्ण भारतापर्यंतचा हा अखंड सांस्कृतिक प्रवाह आहे. ही परंपरा, कालातीत आणि प्रेरणादायी, प्रत्येक पिढीला आपल्या वारशाचे जतन करण्याचे, ऐक्याचे रक्षण करण्याचे आणि भारताच्या सनातन आत्म्यावर दृढ श्रद्धा ठेवत समृद्ध, सुसंवादी आणि अखंड भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन करते.

अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी एकदा म्हटले होते की वाराणसी इतिहास, परंपरा आणि आख्यायिकांपेक्षाही प्राचीन आहे. पण कदाचित त्यांनी प्रभास पाटण आणि सोमनाथ पाहिले नसावे. भागवत पुराणानुसार, चंद्राला त्याचे सासरे दक्ष यांनी शाप दिला होता. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने याच स्थळी भगवान शिवाची आराधना केली आणि म्हणूनच ‘सोमनाथ—चंद्राचा अधिपती’ हे नाव उदयास आले.

मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासून प्रभास पाटण हे मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. ३००० पासून येथे शेती आणि पशुपालन करणारी पूर्व-हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथे जीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत ७ ते १० मीटर खोलीवर सापडलेले दगडी नांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. हा किनारा केवळ निसर्गरम्य नव्हता, तर व्यापाराचे प्रवेशद्वार होता. येथे वस्ती आणि पवित्रता एकत्र वाढत गेली.

प्राचीन ग्रंथांमध्ये प्रभास क्षेत्राला तीर्थ म्हणून संबोधले आहे. महाभारतामध्ये भगवान कृष्णाच्या देहत्यागाचे स्थळ म्हणून प्रभासाचा उल्लेख आहे. दगडांनी अमरत्वाची भाषा शिकण्यापूर्वीच हा किनारा सांसारिक आणि आध्यात्मिक जगामधील एक पवित्र संगम होता. त्याची प्रारंभीची रूपे साधी—लाकूड आणि गवताची—असली, तरी ती मानवी मनाच्या दैवी शोधाची खूण होती.

इ.स. ६४९ च्या सुमारास वल्लभीच्या मैत्रक राजवटीत पहिले ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित मंदिर उभे राहिले. पुढे ९व्या–१०व्या शतकात चालुक्य/सोलंकी काळात सोमनाथ हे काशी आणि उज्जैनच्या बरोबरीचे प्रमुख तीर्थस्थान बनले. पुरातत्त्ववेत्ता बी. के. थापर यांना १९५०–५१ मधील उत्खननात असलेले गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप यांचा समावेश असलेली भव्य रचना. पूर्वाभिमुख त्रि-अंग संधार प्रासादाचे अवशेष सापडले. लक्षुलीश मूर्तीच्या अवशेषांनी त्याची शैव परंपरा सिद्ध केली. विद्वान मंदिराच्या नेमक्या कालखंडावर मतभेद करतात, परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे—सोमनाथ त्या काळात अत्यंत वैभवशाली झाले होते आणि लवकरच त्याची कठोर परीक्षा होणार होती.

ही परीक्षा अनेक लाटांमध्ये आली. इ.स. ७२५ मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला, जो पहिला इस्लामी आक्रमण मानला जातो. परंतु सर्वात मोठा आघात ८ जानेवारी १०२६ रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूद आपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला. शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला. अल बिरुनी यांनी मंदिरातील संपत्तीचे वर्णन केले आहे. सोने, चांदी, मोती, रत्ने आणि गावांच्या महसुलातून जमा झालेली संपदा.

तथापि, पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेष त्वरित एकत्र करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच, श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. १०३८ मध्ये गोव्याच्या कदंब राजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजा-अर्चा किंवा पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचे दिसते. मंदिराचे रूप तुटले, पण संस्कृतीचे चेतन कायम राहिले.

पुढील काळातही विध्वंस आणि पुनर्निर्माण यांचे चक्र सुरूच राहिले. इ.स. ११६९ मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवे भव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकाली मंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे.

त्यानंतर १२९९ मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खानने मंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणि पदमल यांनी मंदिररक्षण करताना प्राण दिले. पुढे चुडासमा राजा महिपाल देव यांनी १३०८ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण केले आणि त्यांचा पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.

यानंतर झफर खानने १३९५ मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथे जामा मशिद आणि प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेख आहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आक्रमक, आणि नंतर औरंगजेब यांच्या आदेशाने १६६५ आणि १७०६ मध्ये पुन्हा विध्वंस घडवून आणण्यात आला. पुजाऱ्यांची हत्या, मंदिर परिसरातील अपवित्र कृत्ये आणि संपूर्ण रचना पाडण्याचे प्रयत्न झाले; परंतु तीर्थक्षेत्र टिकून राहिले.

जरी मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले, तरी स्मृती कधीच नष्ट झाली नाही. इ.स. १७८२–८३ मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळ नवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर १९व्या आणि २०व्या शतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले.

१८४२ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी अफगाणिस्तानातील महमूद गझनीच्या कबरीतून चंदनाचे दरवाजे आणले आणि ते सोमनाथचे मूळ दरवाजे असल्याचा खोटा दावा केला. हा ब्रिटिश सत्तेचा हिंदू समाजाचे समर्थन मिळवण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीला वैध ठरवण्यासाठी राजकीय प्रचार होता. हे दरवाजे नंतर आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले.

१९२२ मध्ये के.एम. मुन्शी यांनी सोमनाथचे भग्नावशेष पाहिले. त्यांनी त्या अनुभवाचे वर्णन “भक्ती आणि लज्जा” असे केले आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात मंदिर पुनर्निर्माणाची आजीवन बांधिलकी निर्माण झाली.

स्वातंत्र्यानंतर सोमनाथच्या इतिहासाचे अंतिम पर्व सुरू झाले. ऑक्टोबर १९४७ मध्ये जुनागढ भारतात विलीन झाले आणि हिंदूंना मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यात आली. १२–१३ नोव्हेंबर १९४७ रोजी सरदार पटेल, एन. व्ही. गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली. तेव्हा पटेलांनी जाहीर केले: “या शुभ नववर्षदिनी आम्ही सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.”

जुनागढ प्रशासन आणि जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या. सुमारे ५,००० एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणि सांस्कृतिक केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली.

यानंतर वाद निर्माण झाला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्यप्राय धार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेले सांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल.

दरम्यान, तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी या प्रकल्पाला ‘हिंदू पुनरुत्थानवाद’ म्हणून विरोध केला. परंतु सार्वजनिक देणग्यांमुळे प्रकल्प थांबवता आला नाही.

१५ डिसेंबर १९५० रोजी सरदार पटेल यांचे निधन झाले, तरी काम सुरूच राहिले. अखेर ११ मे १९५१ रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमपुरा शिल्पकारांनी बांधलेल्या मारू-गुर्जर शैलीतील मंदिरात नवीन ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. शतकानुशतके कुजबुजत राहिलेली प्रतिज्ञा अखेर दगडात साकार झाली. नेहरू या समारंभाला उपस्थित नव्हते.

आज सोमनाथ हे केवळ पर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही; ते दगड आणि गाळात लिहिलेले भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे. त्याची खरी ओळख अखंड वैभवात नसून प्रत्येक विध्वंसानंतर पुन्हा उभे राहण्याच्या मानवी निर्णयात आहे.

त्याच्या पायाभूत थरांमध्ये हडप्पाकालीन वसाहती, प्राचीन व्यापारी आणि शांतीच्या शोधात आलेले भक्त सामावलेले आहेत. प्रत्येक पुनर्निर्माण—मैत्रक राजे, सोलंकी सम्राट, मराठा राण्या किंवा नवस्वतंत्र भारत यांना “ही समाप्ती नाही; आम्ही पुन्हा उभारू” हा एक जाणीवपूर्वक केलेला उच्चार होता.

सोमनाथ आपल्याला शिकवते की लवचिकता म्हणजे कधीही न पडणे नव्हे, तर पडूनही कायमचे न राहणे—पुन्हा पुन्हा उभे राहणे. समुद्रकिनारी उभे असलेले हे मंदिर केवळ भगवान शिवाचे स्मारक नाही; तर त्या अदम्य मानवी आत्म्याचे प्रतीक आहे, जो शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊन शांतपणे म्हणत राहतो—

“आम्ही अजूनही येथे आहोत.
आम्ही स्मरण ठेवतो.
आम्ही पुन्हा उभारतो.
आम्ही टिकून राहतो.”

-ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 12: राज्य शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या हंगामी उष्णतेच्या इशाऱ्यानुसार पुढील काही महिन्यांत सामान्यापेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचे अवगत केले आहे, अशा अत्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत सर्वाधिक कामगार आणि मजूरांना त्रास होतो , उष्णतेच्या लाटेच्या प्रतिकूल परिणामांपासून त्यांच्या संरक्षणाच्यादृष्टीने बहु-क्षेत्रीय उपाययोजना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

कामगार व उद्योग क्षेत्रासाठी : कामगारांचे कामाचे तास पुन्हा नियोजित करणे. विशेषतः दुपारच्या उष्णतेत काम टाळणे. आवश्यकतेनुसार कामाचा वेग कमी करण्याची परवानगी देणे, पुरेसे पिण्याचे पाणी, विश्रांती क्षेत्रे व थंडावा मिळेल अशी व्यवस्था करणे. आपत्कालीन बर्फ,पंखा व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करुन देणे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे.

कारखाने व खाणी व्यवस्थापनासाठी : कामगारांना सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत विश्रांती देणे. दोन व्यक्तीच्या गटाने काम करण्याची व्यवस्था करणे. इलेक्ट्रोलाइट पूरक पेय उपलब्ध करुन देणे. कामगारांना उष्णतेच्या धोका व उपाययोनांबाबत जागरुक करणे.

विशेष लक्ष देण्याचे गट : बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर व असंघटीत क्षेत्रातील कामगाराच्या जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर व श्रमिक चौकांवर मोहिमा आयोजित करणे.

ग्रामसभा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी : उन्हाळ्यात सुरू असलेल्या ग्रामसभा व धार्मिक,सांस्कृतिक मिरवणुका यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्त करुन आवश्यक उपचार साहित्य व उपाययोजना उपलब्ध कराव्यात. प्रक्रिया व कार्यक्रमांचे वेळापत्रक उष्णतेच्या उच्चांक काळात बदलण्याची शक्यता तपासावी. प्रत्येक ठराविक लोकसंख्येच्या गटासाठी थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे अनिवार्यपणे उभारावीत. यात्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करुन घ्यावे. जनजागृतीमध्ये स्थानिक पातळीवर पत्रके व माहिती फलकांचा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करावा.
प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या नागरिकांनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री.डुडी यांनी केले आहे.

पुणे–मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा प्रवास

दख्खनच्या पठाराला कोकणाच्या किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. पण माणूस भिंतींना भेदण्यासाठीच मार्ग शोधत आला आहे. या भिंतीला भेदून तयार झालेले घाट म्हणजे त्या जिद्दीचा साक्षीदार. त्यापैकी भोर घाट हा सर्वात महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि सतत वापरात राहिलेला मार्ग. आज आपण काही तासांत पार करणारा पुणे–मुंबई प्रवास, पूर्वी दिवसांच्या प्रवासातून पूर्ण होत असे. या प्रवासाची कथा म्हणजे हजारो वर्षांच्या बदलत्या काळाची, बदलत्या तंत्रज्ञानाची आणि बदलत्या गरजांची कहाणी आहे.

सातवाहन काल : व्यापार, संस्कृती आणि घाटवाटा
सातवाहन कालात सह्याद्री ओलांडण्याची गरज प्रामुख्याने व्यापारामुळे निर्माण झाली. कोकण किनाऱ्यावरील बंदरे.. सोपारा, कल्याण, चौल ही परदेशी व्यापाऱ्यांसाठीची प्रवेशद्वार होती. रोमन साम्राज्याशीही व्यापार होत असल्याचे पुरावे आजही जुन्नर, तेर इथे सापडल्याचे पुरावे तिथल्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळतात. या बंदरांवर उतरलेला माल दख्खनमध्ये पोहोचवण्यासाठी घाटवाटा तयार झाल्या. त्या पायवाटा होत्या… रस्ता नव्हता; पण मार्ग होता.
व्यापारी काफिले, जनावरे, आणि माणसे या घाटातून प्रवास करत असत. या प्रवासात धोके होते… वन्य प्राणी, दरोडेखोर, आणि कठीण भूप्रदेश. तरीही हा मार्ग जिवंत राहिला कारण तो गरजेचा होता. या मार्गातून केवळ वस्तूंची देवाणघेवाण झाली नाही, तर संस्कृती, भाषा, धर्म आणि विचारही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात पोहोचला. सह्याद्री हा अडथळा नसून, संवादाचा पूल ठरला.

मध्ययुगीन सत्ताकाळ
यादव, बहामनी आणि आदिलशाही सत्तांच्या काळात या घाटमार्गांचा वापर वाढला. सत्तेला विस्तार हवा होता, आणि त्यासाठी जलद संपर्क आवश्यक होता. घाटवाटा अधिक वापरात आल्या, काही प्रमाणात सुधारल्या गेल्या. पण या मार्गाला खऱ्या अर्थाने सामरिक धार मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात.
सह्याद्रीच्या किल्ल्यांच्या जाळ्यातून मराठा सत्तेने घाटांवर नियंत्रण मिळवलं. लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला हे किल्ले भोर घाटावर नजर ठेवून होते. घाटातून होणारी प्रत्येक हालचाल या किल्ल्यांच्या देखरेखीखाली होती. त्यामुळे हा मार्ग केवळ व्यापाराचा राहिला नाही; तो संरक्षण, गुप्त हालचाली आणि युद्धनीतीचा महत्त्वाचा भाग बनला.

ब्रिटिश कालखंड : पायवाट ते दगडी रस्ता
१८१८ मध्ये इंग्रजांनी महाराष्ट्रावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या दृष्टीने मुंबई–पुणे संपर्क अत्यंत महत्त्वाचा ठरला. व्यापार, प्रशासन आणि लष्करी हालचालींसाठी एक सक्षम रस्ता आवश्यक होता. त्यामुळे १८३० च्या दशकात भोर घाटात दगडी रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. हा रस्ता घोडागाडी आणि बैलगाडी चालेल असा होता. पुढे घाटातील वळणं सांभाळून, उतार-चढाव नियंत्रित करत हा रस्ता उभारण्यात आला. हा टप्पा म्हणजे पुणे–मुंबई मार्गाचा आधुनिक जन्म. हजारो वर्षांच्या पायवाटांना आता एक ठोस, अभियांत्रिकी पायाभूत सुविधा मिळाली.

रेल्वेचा चमत्कार : सह्याद्रीतून लोहमार्ग
ब्रिटिशांनी पुढे एक पाऊल टाकत ‘ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे’ (महान भारतीय द्वीपकल्प रेल्वे) मार्फत भोर घाटातून रेल्वेमार्ग उभारला. १८६३ मध्ये हा मार्ग सुरू झाला. हे काम त्याकाळी अत्यंत कठीण होते… डोंगर फोडणे, बोगदे खोदणे, पूल बांधणे… पण यामुळे सह्याद्री ओलांडण्याची संकल्पना बदलली. प्रवास जलद, नियमित आणि सुरक्षित झाला.

स्वातंत्र्यानंतर : राष्ट्रीय महामार्ग ते द्रुतगती मार्ग
स्वातंत्र्यानंतर भारताने या मार्गाचा विकास पुढे चालू ठेवला. पुणे–मुंबई मार्ग राष्ट्रीय महामार्गात विकसित झाला. पण वाढत्या वाहतुकीमुळे घाटातील वळणं आणि अपघातांची समस्या वाढू लागली. यावर उपाय म्हणून २००२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरू करण्यात आला. हा भारतातील पहिला सहा पदरी द्रुतगती मार्ग ठरला. प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि वेगाला नवे परिमाण मिळाले. पुण्याच्या विकासासाठीही मोठे सकारात्मक परिणाम झाले.

औद्योगिक आणि आयटी विकासाला मोठी चालना
पूर्वी मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास वेळखाऊ होता. द्रुतगती मार्गामुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे पुणे हे मुंबईला पर्यायी औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणून वेगाने पुढे आले. हिंजवडी आयटी पार्क, तळवडे, खराडी, मगरपट्टा, चाकण, रंजनगाव यांसारख्या भागांचा विकास झपाट्याने झाला. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक केली.

पुणे–मुंबई आर्थिक पट्टा
द्रुतगती मार्गामुळे पुणे आणि मुंबई यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले. अनेक व्यावसायिक मुंबईत बैठक घेऊन त्याच दिवशी पुण्यात परत येऊ लागले. लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग, वाहतूक आणि सेवा क्षेत्राचा विस्तार झाला. लोणावळा, खोपोली, तळेगाव या मधल्या पट्ट्यातही आर्थिक हालचाली वाढल्या.

रिअल इस्टेटचा मोठा विस्तार
द्रुतगती मार्गानंतर पुण्यातील बांधकाम व्यवसायाने प्रचंड वेग घेतला. हिंजवडी, वाकड, बाणेर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, रावेत, चाकण या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. मुंबईत काम करणाऱ्या काही लोकांनीही पुण्यात स्थायिक होण्यास सुरुवात केली.

पर्यटन आणि विकेंड संस्कृती वाढली
लोणावळा, खंडाळा, मावळ परिसर हा विकेंड पर्यटनाचा प्रमुख पट्टा बनला. पुणे आणि मुंबईतील लोकांचा परस्पर प्रवास वाढला. रिसॉर्ट्स, हॉटेल्स, फूड मॉल्स, अॅडव्हेंचर पर्यटन यांचा व्यवसाय वाढला.

शिक्षण क्षेत्राचा विस्तार
पुणे आधीपासून शिक्षणाचे केंद्र होते; पण द्रुतगती मार्गामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे अधिक सहज उपलब्ध झाले. खासगी विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि आयटी शिक्षण संस्थांचा विस्तार झाला.

पिंपरी-चिंचवडचा वेगवान शहरी विस्तार
ऑटोमोबाईल उद्योग आणि द्रुतगती मार्ग यांचा एकत्रित परिणाम म्हणून पिंपरी-चिंचवड महानगराचा झपाट्याने विस्तार झाला. वाहन उद्योग, पुरवठा साखळी आणि पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढले.

पुण्याची जीवनशैली बदलली
द्रुतगती मार्गानंतर पुणे अधिक “मेट्रो शहर” म्हणून विकसित होऊ लागले. मॉल संस्कृती, कॉर्पोरेट जीवनशैली, आयटी प्रोफेशनल्सची वाढ, उच्च उत्पन्न गट, नवीन टाउनशिप्स यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला

‘कनेक्टिंग लिंक’ : आधुनिक अभियांत्रिकीचा शिखरबिंदू
तरीही खंडाळा–लोणावळा घाटातील काही भाग अपघातप्रवण आणि वेळखाऊ राहिले. याच समस्येवर उपाय म्हणून ‘कनेक्टिंग (मिसिंग ) लिंक’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. खोपोली ते कुसगाव या दरम्यानचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी करणे आणि प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी घटवणे… हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश. सुमारे ६,६९५ कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार आणि मान्यवर मंत्री, सचिव यांच्या उपस्थितीत १ मे रोजी करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा मार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला, आणि सह्याद्री ओलांडण्याच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला.

पूल आणि बोगदे : अभियांत्रिकी कमाल
या प्रकल्पात दोन समांतर बोगदे आणि दोन उंच पूल उभारण्यात आले आहेत. ८.९२ किलोमीटर लांबीचा बोगदा लोणावळा तलावाच्या सुमारे १८० मीटर खाली खोदण्यात आला आहे. तसेच १८४ मीटर उंच केबल-आधारित पूल (तारांच्या आधारावर उभारलेला पूल) हा अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणं टाळली जातील. वाहतुकीचा अखंड प्रवाह राखला जाईल. इंधनाची बचत, वेळेची बचत आणि अपघातांमध्ये घट… या सर्व बाबींचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. अत्याधुनिक अग्निसुरक्षा, हवाप्रवाह व्यवस्था आणि डिजिटल नियंत्रण प्रणाली (संगणकीय नियंत्रण व्यवस्था) यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित बनला आहे.

महाकाय प्रकल्पांची उभारणी : आधुनिक तंत्रज्ञान आणि आव्हानांची शर्यत
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंकसारख्या प्रकल्पांची उभारणी करणे हे केवळ इंजिनिअरिंगचे (अभियांत्रिकीचे) काम नसून ते एक मोठे प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हान होते. हे प्रकल्प साकारताना निसर्गाची प्रतिकूलता आणि तांत्रिक क्लिष्टता यांचा मोठा सामना करावा लागल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी अधोरेखित केले आहे.

बोगद्यांचे जाळे आणि सुरक्षिततेचे कवच
बोगद्यात केवळ रस्ता तयार करणे पुरेसे नव्हते, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिथे एक स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. बोगद्यात नैसर्गिक सूर्यप्रकाश नसतो आणि हवेची हालचाल मर्यादित असते. अशा वेळी, वाहनांच्या धुरामुळे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढू नये म्हणून तिथे शक्तिशाली ‘जेट फॅन्स’ (वेगवान हवेचे पंखे) बसवले जातात. तांत्रिक बिघाडामुळे एखादी गाडी बोगद्यात बंद पडली, तर सुरक्षिततेसाठी दर ३०० ते ५०० मीटरवर ‘क्रॉस पॅसेज’ (आंतरजोड मार्ग) आणि ‘इमर्जन्सी पार्किंग बे’ (आपत्कालीन वाहन थांबा) दिलेले असतात. ‘ऑटोमॅटिक इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टिम’ (स्वयंचलित घटना शोध प्रणाली) मुळे एखादे वाहन थांबल्यास नियंत्रण कक्षाला तातडीने संदेश जातो, ज्यामुळे भ्रमणध्वनी सेवा नसतानाही मदत पोहोचू शकते.

वाऱ्याचा वेग आणि केबल-स्टेड ब्रिजचे आव्हान
कनेक्टिंग लिंक प्रकल्पांतर्गत लोणावळ्याजवळील दरीत जो भव्य केबल-स्टेड ब्रिज (ताराधारित पूल) उभारला गेला, तिथे सर्वात मोठे आव्हान वाऱ्याच्या वेगाचे होते. १८४ मीटर उंचीचे पायलान्स (आधारस्तंभ) आणि दरीतील प्रचंड वारा यामुळे पुलाच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन, या पुलाचे डिझाइन (आराखडा) अशा प्रकारे करण्यात आले आहे की, ताशी शेकडो किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा दाब हा पूल सहज पेलू शकेल. या पुलाच्या पायाभरणीसाठी वापरण्यात आलेल्या एका ‘फुटिंग’चे (पाया रचना) वजन तब्बल १०,००० टन आहे, जे या कामाच्या अवाढव्यतेची साक्ष देते.

कामाची गती आणि सकारात्मक दृष्टीकोन
गायकवाड एक वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, भूसंपादनावेळी झालेला विरोध असो किंवा घाटातील कठीण भौगोलिक परिस्थिती, या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते, तर जोखीम घेण्याची क्षमता आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असतो. “आम्ही प्रतिकूलतेत संधी शोधली आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र वेगवान रस्ते विकासाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे दिसत आहे .” त्यांच्या या बोलण्यातून हे काम किती आव्हानात्मक होते याची जाणीव होते.

जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबतचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या बोगद्याची रुंदी जगात सर्वाधिक २२.३३ मीटर अशी जाहीर केली.

या प्रकल्पाच्या कामात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कोविड-१९ महामारी, मुसळधार पाऊस, कठीण खडक, वन परवानग्या… तरीही अभियंते आणि कामगारांनी चिकाटीने हे काम पूर्ण केले.
सातवाहनांच्या पायवाटेपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘कनेक्टिंग (मिसिंग) लिंक’पर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री तसाच आहे… बदलल्या आहेत त्या त्याला ओलांडण्याच्या पद्धती. हा मार्ग आजही केवळ प्रवासाचा नाही… तो इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा जिवंत दुवा आहे… मिसिंग लिंकचा नवा थरारक अध्याय नव्या महाराष्ट्राच्या घडणीतील महत्त्वाचे पान ठरणार आहे ..!!

  • युवराज पाटील
    जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

महापालिकेच्या स्थानिक स्वराज्याला लावतेय कोणी ‘आग’..? 

महापालिकेतला सरकारीबाबूंचा  कारभार..अन उठतोय या स्थानिक स्वराज्य संस्थेचा बाजार 


पुणे – कालच महापालिकेत एका सरकारी अधिकाऱ्याला ज्याला उपायुक्त म्हणून नेमण्यात आले होते त्यास सहायक आयुक्त पदी नेमण्याचा आदेश महापालिकेला दिला गेलाय,महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्याची हि जागा असल्याने त्या जागेवर संबधित अधिकाऱ्यास न ठेवता त्यास आता सहायक आयुक्त म्हणून ठेवावे असा हा आदेश आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून सरकारी अधिकारी कसे आणि का येथे आणले जातात याची चर्चा उसळते आहे.महापालिकेतील नियुक्त्या, खातेवाटप हल्ली कायमच वादग्रस्त ठरू लागलेय.महापालिकेत येणारा एखादा दुसरा वरिष्ठ सरकारी अधिकारी जणू धुमाकूळ माजवितो,टार्गेट ओरिएन्टल थेरपी सुरु करतो अन त्यामुळे इथल्या स्थानिक स्वराज्याची धूळधाण उडविली जाते असाच काहीसा हा प्रकार आहे.निवृत्ती अगोदर काहींच्या येथील कारभाराची चर्चाही आता रंगू लागली आहे.
 

तिन्ही अतिरिक्त आयुक्त सरकारीच महापालिकेत सरकारी अधिकारी कोण कोण?

महापालिकेचा कारभार मोठा झाल्याने आता महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त आहेत.यातील एक अतिरीक्त आयुक्त पदाची जागा हि स्थानिक अधिकाऱ्यासाठी असताना देखील याही पदावर सध्या सरकारी अधिकाऱ्याचीच वर्णी लागलेली आहे. या शिवाय सुमारे तब्बल  २५ अधिकारी हे महापालिकेत सरकारी अधिकारी आहेत.सुमारे ११ स्थानिक अधिकाऱ्यांच्या हक्काच्या जागा हिसकावून या २५ नियुक्त्या करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.कोण कोण सरकारी अधिकारी पुणे  महापालिकेत कामकाज करत आहेत ते प्रथम पाहू या….उपायुक्त पदावर…रवी पवार,प्रसाद काटकर ,संतोष वारुळे,प्रशांत ठोंबरे,विजय थोरात,अरविंद माळी,निखील मोरे,तुषार बाबर,आशा राउत,आणि वसुंधरा बारवे, नव्याने आलेले उपायुक्त टेंगळे हे सरकारी अधिकारी कार्यरत आहेत.तर सहायक आयुक्त पदावर विजय नायकल,अस्मिता तांबे,शीतल वाकडे,सुरेखा भणगे,बाळासाहेब ढवळे,प्रज्ञा पोतदार,कुणाल धुमाळ,कैलास केंद्रे ,इंद्रायणी करचे, सोमनाथ आढाव,सुचित्रा पानसरे हे कामकाज पाहत आहेत. तर आरोग्य प्रमुख पदावर नीना बोराडे या सरकारी अधिकारी कामकाज पाहत आहेत.या सर्व अधिकाऱ्यांकडे वरिष्ठांनी महत्वपूर्ण खाती दिलेली आहेत.जसे कर आकरणी,घनकचरा व्यवस्थापन,मालमत्ता, सेवक वर्ग याप्रमाणे ती आहेत.

स्पर्धा आणि दुफळी चे आव्हान आयुक्तांपुढे…

एकीकडे आता या अधिकाऱ्यांत हवे ते खाते मिळविण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा दिसते आहे. तर दुसरीकडे सरकारी अधिकारी आणि स्थानिक अधिकारी असे दोन वर्ग निर्माण होऊ पाहत आहेत,आता प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांच्या पुढे यांची योग्य सांगड घालण्याचा प्रश्न उपस्थित होऊ पाहतो आहे.स्थानिक अधिकाऱ्यांना असलेल्या भौगोलिक स्थितीची समस्यांची माहिती स्थानिक समाजकारण,राजकारण आणि अनुभव यांची माहिती घेऊनच प्रशासनात दुफळी होऊ नये यासाठी आयुक्तांना लक्ष घालावे लागेल असे दिसते आहे.

नियम काय सांगतो

साधरणतः वरिष्ठ अधिकाऱ्यात ५० टक्के स्थानिक अधिकारी बढतीवर नियुक्त केले पाहिजेत असे नियमावली सांगते आणि २५ टक्के थेट भरतीने तर २५ टक्के शासकीय सेवेतून नियुक्तीने भरावेत असे म्हटलेले आहे.पण प्रत्यक्षात २३ सहायक आयुक्त पदांपैकी तब्बल ११ सहायक आयुक्त हे सरकारी अधिकारी आहेत तर १८ उपायुक्तांमध्ये ११ शासकीय अधिकारी आहेत.आणि अतिरिक्त आयुक्त तर तिन्ही सरकारी अधिकारीच आहेत.म्हणजेच शासनाचा अजगर हळूहळू जणू हि स्थानिक स्वराज्य संस्था गिळू लागलाय कि काय ? असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर विशेष काही वाटणार नाही.

जुने पुणे छान पुणे…का होते असे? काय आहे पार्श्वभूमी ?

एकेकाळी महापालिकेचे बजेट जेव्हा ५०० कोटीपर्यंत होते तेव्हा महापालिकेत एकाच शासकीय अधिकारी ‘आयुक्त’ पदावर राज्य शासनाकडून नियुक्त केला जाई.तेव्हा एकच अतिरिक्त आयुक्त आणि २/३ उपायुक्त असत,महापालिकेतील स्थानिक अधिकारीच या पदांवर काम करत..अगदी आरोग्यप्रमुख, पाणीपुरवठा प्रमुख देखील महापालिकेतील स्थानिक अधिकारीच असत. या सर्वांना स्थानिक प्रश्नांची जाण असत,माहिती असत, आणि स्थानिक समाजकारण तसेच राजकारणातील घडामोडींची देखील चांगली जाण असे. म्हणूनच जुने पुणे छान असे.

पुणे अक्राळविक्राळ करण्यात नगरविकास खाते पुढे आणि शिव्या खायला स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी

काळ बदलत गेला,एकीकडे व्यास प्रकरणाने ज्यांचे मुख्यमंत्री पद गेले ते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महापालिकेची हद्द वाढविण्यास सुरुवात झाली अन शहर वेगाने वाढण्यास सुरुवात झाली.महापालिका हद्दीलगत सुरु झाला भूखंडांचा बाजार,आणि होऊ लागला राजकारण्यांचा,छोट्या छोट्या बिल्डरांचा जयजयकार..वकिली करून, पत्रकरिता करून,टेल्को,बजाज मध्ये नोकऱ्या सांभाळून समाजकारण करता करता नगरसेवक झालेल्यांची जागा तथाकथित भूखंड प्रेमी आणि बेनामी बिल्डर घेण्यास पुढे येऊ लागले. तेव्हा कोणता नगरसेवक चरितार्थासाठी काय काम करतो हे जनतेला ठाऊक असायचे,नंतर मात्र जनता त्यापासून अनभिज्ञ होत गेली. आणि बजेट महापालिकेचे हजार कोटीच्या पुढे सरकत गेले..तशी गावाहून गावेही महापलिकेत दाखल होत गेली,आणि शांत,पेन्शनरांच्या पुण्याने अक्राळ विक्राळ रूप धरण करायला सुरुवात केली. ज्यात केवळ महापालिकेने नव्हे तर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने महत्वाची भूमिका बजावली.TP प्लॅन, विकास आराखडे,भूखंडावरील आरक्षणे आणि नव्याने TDR नावाची संकल्पना आणून गगनचुंबी इमारतीना प्रवेश देत,कित्येक हजार कोटीच्या बजेट असलेल्या या महापालिकेला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले. नगरविकास खात्याने केलेल्या कारवायांनी या शहराला गिळंकृत करून टाकले.

१३ ते १४ हजार कोटीचे बजेट झालेल्या महापालिकेचे स्थानिक स्वराज्य हिरावून घेतले जातेय काय ?

आणि आता…. महापालिकेच्या स्थानिक स्वराज्यावर देखील सरकारने आक्रमण केलेय कि काय ? असे स्पष्ट जाणवेल अशी चित्रे दिसू लागलीत.पुण्याची महापालिका स्थानिक पुणेकर चालवितात कि राज्य सरकार चालवते असाही प्रश्न यानिमिताने विचारला तर नवल वाटण्याचे कारण नाही. १३ ते १४ हजार कोटीचे बजेट झालेल्या महापालिकेचे स्थानिक स्वराज्य हिरावून घेण्यात येऊ लागले.स्थानिक स्वराज्याच्या हक्कासाठी महापालिकेच्या सभागृहात लढलेल्या शिवाजीराव आढाव,योगेश गोगावले, गिरीश बापट यांच्याच भाजपची आज महापालिकेवर सत्ता आहे. येथे पुण्याचा पुण्यातील २ खासदार आहे, अनेक आमदार आहेत, आणि नगरसेवक देखील पुण्यातीलच आहेत. पण महापालिकेच्या रूपातील ‘स्थानिक स्वराज्य’ पुणेकरांचे आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने आपापल्या परीने शोधलेले बरे .

स्थानिक अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली आणि बदली होऊन जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना रुपेरी पालखी

महापालिकेचा कारभार वर्षानुवर्षे पाहणारेच नाही तर आयुष्यभर पाहणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली आणि एका वरून ५० सरकारी अधिकारी येथे आणून ठेवलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना मात्र रुपेरी पालखी असेच जणू इथे शिजते कि काय ? असा प्रश्न पडेल त्यास कारणही तसे आहेच.आता १३/१४ हजार कोटीचे बजेट झालेल्या महापालिकेत सारा कारभार स्थानिक अधिकाऱ्यांच्या हाती उरलेलाच नाही, त्यावर ताबा मारलाय तो सरकारी अधिकाऱ्यांनी … 

आग तर लागलीय..कोणी रोखणार आहे कि नाही ?

खरे खोटे देव जाणो..पण असे म्हणतात या महापालिकेत येण्यासाठी आता सरकारी अधिकारी म्हणे बोली लावतात.. ३ वर्षासाठी पुण्यात आलेले अनेक सरकारी अधिकारी येथून जातात आणि उच्च स्थानावर पोहोचतात,आणि काही तर कधीच पुणे सोडत नाहीत, सोडावे लागले तरी पुन्हा पुन्हा पुण्यात येतात.अशा अधिकाऱ्यांची नावे सांगायची निश्चितच गरज नाही.पण सध्या पुणे महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेला जणू सरकारी अजगराने जणू विळखाच घातला आहे. ज्यात या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जीव घुटमळत आहे. असे का वाटावे याला कारणही तसेच आहे. पूर्वी एकच शासकीय IAS अधिकारी येथे येत. आता किती येतात याचा हिशेब मांडायला हवा.खरे तर कोरोनाच्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक अधिकारीच लढले, पण त्यानंतर येथे सरकारी अधिकाऱ्यांची वारी येथे सुरु झाली. इथल्या आदरातिथ्याने या वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आणि इथली स्थानिक स्वज्य संस्था ढासळू लागली.आग लागू लागली..हो आग रोखायची कोणी? कोणी रोखणार आहे कि नाही ?हा खरा प्रश्न आहे .   

महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत:काँग्रेसचे नेते चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली व्यतिरिक्त महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत. अशी मागणी कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम (Chandu Kadam Congress) आणि नगरसेवक अरविंद शिंदे (Arvind Shinde Congress) यांनी केली आहे. याबाबत विधी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या येत्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या दर ३ वर्षांनी नियतकालिक बदल्या करणेबाबत धोरण आहे. परंतु काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या बदल्या या फक्त कागदोपत्री होत असून हे कर्मचारी बदली खात्यात रुजू होत नाहीत असे निदर्शनास येत आहे. असा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या राजकीय दबावाने तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या आशिर्वादाने महसूली खात्यात एकतर्फी बदल्या केल्या जातात असे देखील निदर्शनास आलेले आहे. (उदा. बांधकाम विभाग, कर आकारणी कर संकलन विभाग, आकाशचिन्ह विभाग, मुख्य लेखापाल व इत्यादी).

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, अशा महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यासाठी मोठया आर्थिक देवाणघेवाण होतात अशी महापालिकेत चर्चा असते. तसेच ठराविक कर्मचारी हे अन्य विभागात बदली झाली तरी, पुन्हा पुन्हा महसुली खात्यात अथवा महत्वाच्या खात्यात येण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच एकतर्फी बदलीने कामास येतात हे अनेकवेळा दिसून आलेले आहे. परिणामी सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे अन्यायाची भावना तयार होते. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात दर ३ वर्षानी नियतकालिक होणाऱ्या बदल्या करणेबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

या प्रस्तावावर आता समितीच्या येणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे अभय छाजेड अपघातात जखमी


पुणे
काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अभय छाजेड यांच्या मोटारीचा पिरंगुट जवळील कोलाड महामार्गावरील घाटात अपघात झाला. सोमवारी (ता. ११) रात्री साडे नऊच्या सुमारास अपघात झाला.यामध्ये छाजेड यांच्यासह तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

छाजेड हे पिरंगुट येथील आर्किटेक्ट महाविद्यालयात गेले होते. तेथून ते इलेक्ट्रीक मोटारीतून पुण्याकडे येत असताना घाटामध्ये चालकाचे मोटारीवरील नियंत्रण गेल्याने मोठा अपघात झाला. त्यांची मोटार थेट रस्ता ओलांडून वन विभागाच्या हद्दीत सुमारे २० फूट वर गेली. हा अपघात झाल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी मदत करून त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले.

छाजेड यांच्या पाठीला, पायाला मार लागला असून, पुढील उपचार सुरु आहेत. तसेच अन्य दोघांवरही उपचार सुरु आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, छाजेड यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

मोदी सलग दुसऱ्या दिवशी म्हणाले- पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करा:सोन्याची खरेदी टाळा, खाद्यतेलाचाही वापर कमी करा, शाळांनी ऑनलाइन वर्ग चालवावे

0

जामनगर-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी लोकांना इंधन आणि संसाधनांचा कमी वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशाला परकीय चलन वाचवण्यासाठी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी जनसहभागाची गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

वडोदरा येथे मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे देशाने एकत्र येऊन कोरोना संकटाचा सामना केला होता, त्याचप्रमाणे सध्याच्या संकटातूनही देश बाहेर पडेल. ते म्हणाले – सोन्याच्या आयातीवरही देशाचा खूप मोठा पैसा परदेशात जातो. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत आपण सोन्याची खरेदी टाळावी. सोन्याची गरज नाही.

मोदींनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले की, खाद्यतेलाच्या आयातीवरही देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते. जर लोकांनी खाद्यतेलाचा कमी वापर केला, तर यामुळे देश आणि शहर दोघांनाही फायदा होईल.

त्यांनी सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्याचा आणि शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग घेण्याचा सल्लाही दिला. मोदी म्हणाले की, देशाला सध्या परकीय चलन वाचवण्याची गरज आहे आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातच्या सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठेची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले- आजचा दिवस आणखी एका कारणामुळे खास आहे. आजच्याच दिवशी 11 मे 1998 रोजी देशाने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. त्यावेळी जगभरातील शक्ती भारताला दाबण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.

पंतप्रधानांनी सांगितले- भारतासाठी सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. पण आम्ही घाबरलो नाही, डटून राहिलो. भारताने पोखरण अणुचाचणीला ऑपरेशन शक्ती असे नाव दिले होते. कारण शिवाबरोबर शक्तीची आराधना करणे हीच आपली परंपरा आहे. मी भगवान सोमनाथांच्या चरणी नमन करून ऑपरेशन शक्तीबद्दल अभिनंदन करतो.

पंतप्रधान म्हणाले-

सोमनाथ आपल्याला आठवण करून देतो की, कोणताही देश तोपर्यंत मजबूत होऊ शकत नाही, जोपर्यंत तो आपल्या मुळांशी जोडलेला नाही.
भारतात वारसा आणि आधुनिकता एकमेकांपासून वेगळे नाहीत, दोन्ही सोबतच चालतात.
आपल्या देशात सांस्कृतिक आणि पवित्र स्थळांच्या पुनर्बांधणीवरून खूप राजकारण झाले आहे. दुर्दैवाने आजही अशा शक्ती आहेत, ज्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाला अधिक महत्त्व देतात.
लुटारूंनी सोमनाथ मंदिराची भव्यता मिटवण्याचा प्रयत्न केला. हे मंदिर वारंवार तोडले गेले, पण प्रत्येक वेळी त्याची पुनर्बांधणी झाली.
जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही आणि दाबून ठेवू शकत नाही.
वाजपेयी सरकारच्या काळात दुसरी अणुचाचणी झाली होती

11 मे 1998 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात भारताने आपली दुसरी अणुचाचणी केली होती. हे एक अत्यंत गोपनीय ऑपरेशन होते. याची तयारी इतकी गुप्त होती की परदेशी गुप्तहेर संस्थांना याची खबरही लागली नाही.

या चाचण्यांच्या माध्यमातून भारताने जगाला आपली सामरिक आणि वैज्ञानिक ताकद दाखवली. पण अणुचाचण्यांनंतर अमेरिका, जपान आणि काही पाश्चात्त्य देशांनी भारतावर अनेक आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले होते.

पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा;गॅस्ट्रो आणि टायफॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ

0

पुणे-पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने शहरात गॅस्ट्रो (जठरांत्र दाह), टायफॉइड, अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अति उष्णतेमुळे अन्न आणि पाण्यातील बॅक्टेरियांची (जीवाणू) वाढ वेगाने होत असून, त्यामुळे पोटाचे विकार आणि डिहायड्रेशनचा (निर्जलीकरण) धोका वाढल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

पुण्यातील प्रमुख रुग्णालयांच्या तज्ज्ञांनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीपासून उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक संसर्ग होत आहे.
बॅक्टेरियांची वेगाने वाढ

पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये साधारणपणे ३० टक्के वाढ झाली आहे. उष्णतेमुळे बाहेर ठेवलेले अन्न लवकर खराब होते. शिजवलेले अन्न ४ ते ५ तासांच्या आत खावे किंवा ते ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात फ्रिजमध्ये ठेवावे. दीर्घकाळ बाहेर राहिलेले अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा धोका वाढतो.”

बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातील प्राध्यापक म्हणाले, “गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा टायफॉइड आणि जलजन्य आजारांमध्ये १० ते २० टक्के वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे साल्मोनेला आणि ई-कोलाय सारख्या बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते, विशेषतः रस्त्यावरील कापलेली फळे, ज्यूस आणि उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे संसर्ग पसरत आहे.”
लक्षणे आणि धोक्याचे इशारे

मळमळ आणि उलट्या होणे
पोटात पेटके येणे किंवा तीव्र वेदना
ताप आणि अशक्तपणा जाणवणे
वारंवार जुलाब होणे
लघवीचा रंग गडद होणे (डिहायड्रेशनचे लक्षण)

डॉक्टरांचा सल्ला

पाणी: उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या. सोबत स्वतःची पाण्याची बाटली ठेवा.
अन्न: ताजे आणि घरी शिजवलेले अन्न खा. उघड्यावरील किंवा रस्त्यावरील अन्न टाळा.
वेळ: सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.
पेये: स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी शहाळे पाणी, ताक आणि लिंबू सरबत घ्या.
धोका: डिहायड्रेशनकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडावर ताण येऊन किडनी निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा.

राज्यातील उष्माघाताची स्थिती (आकडेवारी)
राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मार्च २०२६ पासून महाराष्ट्रात उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत:
अकोला: ११ रुग्ण
गडचिरोली, रायगड, सातारा: प्रत्येकी २ रुग्ण
पुणे, नाशिक, जळगाव: प्रत्येकी १ रुग्ण

येरवडा–गांधीनगर परिसरातील स्वच्छता प्रश्नांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

सार्वजनिक शौचालये, कचरा व्यवस्थापन व नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

मुंबई, दि. ११ मे : पुणे महानगरपालिका हद्दीतील येरवडा–गांधीनगर परिसरातील स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था तसेच कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांकडे शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शिवसेना पुणे शहर संघटक श्री. आनंद गोयल यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी या संदर्भात निवेदन सादर करून परिसरातील वाढत्या कचरा समस्यांबाबत तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी व वीज सुविधांच्या अभावाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचत असून सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत अस्वच्छ झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी व वीज सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाकडे येरवडा–गांधीनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती करून तेथे २४ तास पाणी व वीज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

तसेच परिसरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात कचरा कंटेनर उपलब्ध करून नियमित कचरा उचल व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यावसायिकांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून हलगर्जीपणा आढळल्यास आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यासोबतच परिसरातील स्वच्छता व आरोग्यविषयक समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित पाहणी करून अहवाल सादर करण्यात यावेत, असे निर्देश देण्याची विनंतीही डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला केली आहे.

तसेच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या विषयात लक्ष घालून पुणे महानगरपालिका प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती केली आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी व स्वच्छतेशी संबंधित हा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सोमनाथ मंदिर : कल्पना सरदार पटेल यांची, कृती मुन्शी-गाडगीळांची, आशीर्वाद प्रसादांचा ! यात मोदीजी येतातच कुठे ?

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा खोचक सवाल

पुणे- सोमवार दि. ११ मे रोजी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार / पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.७५ वर्षांपूर्वी, गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. अधिवेशनादरम्यान एका सायंकाळी वेरावळ येथील कार्यक्रमात सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या अतिक्रमणाचा उल्लेख करत सदर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा मानस सरदार पटेल त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर पुनर्बांधणीची जबाबदारी गुजरातचे तत्कालीन ज्येष्ठ नेते कन्हैयालाल मुन्शी व तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ या दोघांवर आपण सोपवत असल्याचे सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांशी चर्चा करून घोषित ही केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनीं उदघाटनही केले होते.

हा सर्व इतिहास विसरत, पंतप्रधान व काही मुख्यमंत्री लेख व कार्यक्रमाद्वारे आपणच जणू मंदिराचे निर्माते आहोत असे गेल्या काही दिवसापासून भासवत आहेत. काँग्रेस हा अल्पसंख्यांकांचा लांगुनचालन करणारा पक्ष अशी सात्यत्याने टीका करणाऱ्या भा. ज. प. ला, याच काँग्रेसने हिंदूंचे मंदिर उभारल्याच्या इतिहासाचा विसर पडावा याचे आश्चर्य वाटते.

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी संबन्धित सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित करीत आहोत असा निरोप मंदिर व्यवस्थापनाकडून काकासाहेब गाडगीळ यांचे नातू माजी आमदार अनंत गाडगीळ यांना १५ दिवसापूर्वी देण्यातही आला होता.
इतकेच नव्हे तर अनंत गाडगीळ यांचा पत्ता, फोन नंबर इ सर्व तपशील गुजरात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता. मात्र आजच्या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही आपणास देण्यात आले नसल्याचे गाडगीळ यांनी उघड केले आहे’

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीशी काडीमात्र संबंध नसणाऱ्यांकडून मात्र आजचा कार्यक्रम उरकण्यात येत आहे अशी उपरोधक टीकाही गाडगीळ यांनी केली आहे