पुणे, दि. 12: राज्य शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या हंगामी उष्णतेच्या इशाऱ्यानुसार पुढील काही महिन्यांत सामान्यापेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचे अवगत केले आहे, अशा अत्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीत सर्वाधिक कामगार आणि मजूरांना त्रास होतो , उष्णतेच्या लाटेच्या प्रतिकूल परिणामांपासून त्यांच्या संरक्षणाच्यादृष्टीने बहु-क्षेत्रीय उपाययोजना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
कामगार व उद्योग क्षेत्रासाठी : कामगारांचे कामाचे तास पुन्हा नियोजित करणे. विशेषतः दुपारच्या उष्णतेत काम टाळणे. आवश्यकतेनुसार कामाचा वेग कमी करण्याची परवानगी देणे, पुरेसे पिण्याचे पाणी, विश्रांती क्षेत्रे व थंडावा मिळेल अशी व्यवस्था करणे. आपत्कालीन बर्फ,पंखा व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करुन देणे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
कारखाने व खाणी व्यवस्थापनासाठी : कामगारांना सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत विश्रांती देणे. दोन व्यक्तीच्या गटाने काम करण्याची व्यवस्था करणे. इलेक्ट्रोलाइट पूरक पेय उपलब्ध करुन देणे. कामगारांना उष्णतेच्या धोका व उपाययोनांबाबत जागरुक करणे.
विशेष लक्ष देण्याचे गट : बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर व असंघटीत क्षेत्रातील कामगाराच्या जनजागृतीसाठी पोस्टर, बॅनर व श्रमिक चौकांवर मोहिमा आयोजित करणे.
ग्रामसभा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी : उन्हाळ्यात सुरू असलेल्या ग्रामसभा व धार्मिक,सांस्कृतिक मिरवणुका यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्त करुन आवश्यक उपचार साहित्य व उपाययोजना उपलब्ध कराव्यात. प्रक्रिया व कार्यक्रमांचे वेळापत्रक उष्णतेच्या उच्चांक काळात बदलण्याची शक्यता तपासावी. प्रत्येक ठराविक लोकसंख्येच्या गटासाठी थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे अनिवार्यपणे उभारावीत. यात्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करुन घ्यावे. जनजागृतीमध्ये स्थानिक पातळीवर पत्रके व माहिती फलकांचा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करावा.
प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या नागरिकांनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री.डुडी यांनी केले आहे.

