Home Blog Page 52

अभिनेते शरद पोंक्षेंचा भाजप नेत्यांना इशारा-भाजपची काँग्रेस करू लागला तर RSS कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो

RSS भाजपसारखे 10 पक्ष उभे करू शकतो:आम्हाला कुणीच हरवू शकत नाही या भ्रमात राहू नका,
नागपूर -भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपने राहू नये, असेही ते यावेळी म्हणाले.

शरद पोंक्षे नागपूर येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 3 दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमुळे आज हिंदू धर्माला चांगले दिवस आले. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर देशाचे वाटोळे झाले असते. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाने देशाचे भले झाले नाही. त्यांच्या कोणत्याही आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. मुळात हा पक्षच ब्रिटिशांनी स्थापन केला आहे.

शरद पोंक्षे यांनी यावेळी मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नसल्याचाही दावा केला. हिंदू धर्मातील प्रत्येक धर्मग्रंथ महान आहेत. हजारो वर्षांपूर्वी आमच्याकडे सर्व शोध लागले. मोठमोठ्या आजारांची माहिती आमच्या धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने आमचा धर्म, संस्कृती व परंपरांचा अभ्यास करू न देता केवळ गुलाम केले. मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली नाही. ती जाळणाऱ्यांनी वाचली नाही. वाचली असती तर ते जाळूच शकले नसते, असे ते म्हणाले.
भारत हिंदू राष्ट्र घोषित करा

स्वातंत्र्याला 79 वर्षे लोटले तरी हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो ही एक मोठी शोकांतिका आहे. हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे व राहील. पण आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा, असेही पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

शरद पोंक्षे यांनी यावेळी संघात भाजपसारखे 10 पक्ष उभे करण्याची ताकद असल्याचेही ठणकावून सांगितले. आज भारतात हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत असे म्हणण्याची ताकद मिळाली आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. 100 वर्षांत अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आहे आहे. पण भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा 10 भाजप संघ उभा करू शकतो. पुन्हा 10-15 वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण कट्टर हिंदूंच्या 10 भाजप उभ्या करण्याची ताकद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे, असे ते म्हणाले.

VIT च्या विद्यार्थ्यांकडून ‘स्पंदन’ उपक्रमांतर्गत सिंहगड गडसंवर्धन व खडकवासला स्वच्छता मोहीम

पुणे-—
विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटी
अंतर्गत टीम स्पंदन तर्फे सिंहगड किल्ल्यावर गड संवर्धन मोहीम तसेच खडकवासला धरण
परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले.
या उपक्रमामध्ये 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी
परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून 25 पेक्षा अधिक पोते म्हणजेच 300+
किलो कचरा संकलित केला, ज्यामुळे ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपण्याचा महत्त्वपूर्ण
संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व सार्थक देशमुख आणि रुचिता बाबर यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध
पद्धतीने किल्ला व धरण परिसर स्वच्छ करत “आपला वारसा जपूया, पर्यावरण वाचवूया”
हा संदेश दिला.
गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे व पराक्रमाचे जिवंत प्रतीक असून
त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ऐतिहासिक वारसा
जपण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम
राबविण्यात आला. किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे हीच महाराजांना खरी
आदरांजली असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या मोहिमेचा उद्देश तरुणांमध्ये

सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि
ऐतिहासिक वारसा जतन करण्याची भावना निर्माण करणे हा होता.
VIT च्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भविष्यातही Team स्पंदन तर्फे अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेष डिजिटल शेती शाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन

पुणे, दि.३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, महिला गट, शेतकरी गट आदींनी शेतीशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देण्याच्या उद्देशाने कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ सुरु आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या पीक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

डिजिटल शेतीशाळांचा दिनांक आणि विषय:
१ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे , आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया.
८ एप्रिल – जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे.
१५ एप्रिल- एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर.
२२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत याविषयांवर शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

सर्व शेतीशाळा संबंधित तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे थेटप्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या युट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारकांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.

मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाला गती,जागा हस्तांतरणासाठी प्रयत्न; तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण होणार

पुणे: मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठेला साजेसं भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाचे नेते व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, उमेश कांबळे, जयदेव रंधवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्य सरकारकडून स्मारकाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्मारक उभारणीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता शक्य तितक्या लवकर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चर्चेनंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त करत, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, मंगळवार पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार आहे. हा लढा पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक सामाजिक चळवळ म्हणून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोप दुर्दैवी असून, स्मारक उभारणी हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली; गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ लादण्याचा डाव.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखालील सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रेला’ दांडगा प्रतिसाद.

मुंबई/तुळजापूर, दि, ३० मार्च

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, यात्रेचे समन्वयक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील, दादासाहेब मुंडे, अमर खानापुरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रशांत पाटील, अग्नीवेश शिंदे, उमेश राजे निंबाळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सकाळी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला. LPG गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी LPG गॅस ठेवलेले ट्रॅक्टर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, महागाई, बेरोजगारी वाढली आहे, LPG सिलेंडर व पेट्रोल,डिझेल मिळत नाही पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून संविधानाची पायमल्ली करून गोलवळकरांच्या ‘बंट ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रधर्माची पायमल्ली करत आहेत. या महाराष्ट्रधर्म बुडव्यांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो व संविधानाला अभिप्रेत भारत घडू दे, असे साकडे घातल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अशोभनीय व किळसवाणे..

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यात प्रतिगामी विचार फोफावत असल्याने खरात सारख्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. अशोक खरात प्रकरणातून जे काही उघड होत आहे ते किळसवाणे असून महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकता येणार नाही, तर यामध्ये जे मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे समोर आले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा छडा लावल्याच्या फुशारक्या मारू नयेत. ८-९ महिन्यांपासून त्यांच्याकडे याची माहिती होती, तर एवढा वेळ ते काय झोपा काढत होते काय? असा प्रश्न विचारून महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुणे, पिंपरी – चिंचवडमध्ये पाऊस; वातावरणात गारवा

पुणे-राज्यात आज पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

…पुणे शहरासह उपनगरांत आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाने हैराण झालेल्या शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. औंध,बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, वडगाव शेरी, विमान नगर, चंदन नगर, कल्याणी नगर या भागात मुसळधार पाऊस झाला.

बाणेर येथे गारांचा जोरदार पाऊस सुरू आहे. तर लोहगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. तर मुंढवा, केशवनगर कोरेगाव पार्क खराडीतही पाऊस झाला. वाघोली, फुरसुंगीतही मुसळधार पाऊस झाला.

पुण्यातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. बी टी कवडे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. तर विमाननगर गंगापूरम चौकात पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे. विमानतळ रस्त्यावर यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे .घोरपडी गावात ही मोठ्या प्रणावर पाणी साचलं असून वाहनचालक साचलेल्या पाण्यातून गाड्या चालवत आहेत.

कधी-कुठे पावसाची शक्यता?

30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार – गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात

हरी मंदिर प्रवेशाला ११७ वर्षे पूर्ण
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ८ एप्रिल १९०९ (चैत्र वद्य षष्ठी) हा हरी मंदिर प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाच्या विश्वस्त व सहचिटणीस नमिता मुजुमदार यांनी दिली.

चैत्रोत्सवानिमित्त शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रविवार, ५ एप्रिल रोजी ब्राह्मो परंपरेतील सहाव्या पिढीतील रेखा शहानी यांची ईश्वरोपासना आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विचारवंत भास्कर मुजुमदार यांची ऑनलाइन ईश्वरोपासना होणार आहे.

 शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग यांची संगीतोपासना रंगणार असून, रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांची ईश्वरोपासना होणार आहे.

चैत्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल


पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या भीषण अपघातात एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोसायटीचे
चेअरमन आणि इतर 11 कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मयत दिनेश सुरंगे हे आपल्या कामासाठी लिफ्टने खाली जात असताना ही दुर्घटना घडली. लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अचानक लिफ्टचा मुख्य रोप (लोखंडी दोरी) तुटला. यामुळे लिफ्ट सातव्या मजल्यावरून प्रचंड वेगाने थेट तळमजल्यावर कोसळली.

या भीषण अपघातात दिनेश सुरंगे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात आणि गृहनिर्माण संस्थेत मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत दिनेश यांच्या भावाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोसायटीच्या कमिटीने लिफ्टच्या नियमित सर्व्हिसिंग आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच माझ्या भावाचा जीव गेला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर 11 सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

0

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात रशियाच्या या निर्णयाने खळबळ उडालीय. रशिया सरकारने अधिकृत घोषणा केलीय की एक एप्रिलपासून गॅसोलिन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे
मध्य पुर्वेत सुरू असलेल्या यु्दधामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. आता यातच रशियाने घेतलेल्या निर्णयाचा फटका रशियावर अवलंबून असलेल्या देशांना बसणार आहे. यात तुर्की, चीन, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतलाय. रशियात पेट्रोलची मागणी वाढली असून सरकारने देशातील नागरीक आणि उद्योगांना पुरेसं इंधन योग्य दरात मिळावं यासाठी निर्यात बंदी घातलीय. इराण अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी रशियाने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातबंदीमुळे देशातील रिफायनरीमधील साठा सुरक्षित राहील आणि महागाई नियंत्रणात ठेवता येईल.

रशियाकडून थेट पेट्रोलची आयात करणाऱ्या देशांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे चीन, तुर्की, ब्राझील, सिंगापूर या देशांवर निर्यात बंदीचा मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय आफ्रिकेतील अनेक देश स्वस्तातल्या रशियन तेलावर अवलंबून आहेत. आता रशियाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे या देशांना इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल. इतर पर्याय या देशांसाठी महागडे ठरणारे आहेत. याचा परिणाम संबंधित देशांमध्ये महागाईवर होऊ शकतो. पेट्रोलच्या किंमतीत वाढही होऊ शकते.

मध्य पुर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे लाल समुद्रातून होणारा व्यापार धोक्यात आला आहे. रशियाने निर्यात बंदी केल्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. जर ही बंदी जास्त काळ राहिली तर जगभरातील शेअरबाजार आणि वाहतूक खर्च यावर नकारात्मक परिणाम होईल.

भारत एकूण कच्च्या तेलापैकी बहुतांश कच्चं तेल रशियाकडून स्वस्तात खरेदी करते. मात्र रशियाने पेट्रोलवर बंदी घातली आहे. कच्च्या तेलावर नाही. त्यामुळे भारताला आवश्यक असलेलं कच्चं तेल मिळण्यात अडचण येणार नाही. कच्चे तेल खरेदी करून भारतात त्याचं रिफायनिंग होऊ शकते. रशियाच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’, ‘जोग’ आदी सायंकालीन व रात्रौकालीन रागांचा आनंद रसिकांना सकाळच्या प्रहरात अनुभवायला मिळाला. कालप्रहराचे बंधन न स्वीकारता झालेले सादरीकरण रसिकांनी सहजतेने स्वीकारत त्यांचा आनंद घेत उपक्रमाला भरभरून दाद दिली.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सव व परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पद्श्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण झाले.

संगीतोत्सवाचे उद्‌घाटन पंडित अरुण कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य : पंडित अरुण कशाळकर…

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित अरुण कशाळकर म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात परंपरा कितीही घट्ट असल्यातरी कालानुरूप त्यात बदल होत असतात. हे बदल होणे म्हणजेच कला जीवंत असण्याचे लक्षण होय. बदलांची प्रक्रिया सातत्याने घडत असते आणि या बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य मिळते. बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून त्या करिता विचारांचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. कलाकार या बदलातून कलेला एक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. हे रुजलेले बदल परंपरा रूपाने पुढे येत जातात.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ ही अभिवन संकल्पना राबविणारे पुणे हे पहिले शहर आहे, याचे कौतुक वाटते.

संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग म्हणून प्रचलित असलेला राग मारवा सादर करून त्यानंतर राग केदारची झलक दर्शविली. सायंकाळी व्याकुळ करणाऱ्या स्वरांची जादू रसिकांना सकाळच्या प्रहरातही मोहित करून गेली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागराज नागेश (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

या नंतर पंडित रोणु मजुमदार यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरात सादर होणारा राग बिहाग अतिशय तरलतेने साकारला. कुठलाही राग कुठल्याही वेळी प्रभाव पाडू शकतो या प्रभाताईंच्या विचाराला समर्पक असे हे सादरीकरण रंगले. यानंतर त्यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवत राग जोगबहार या जोड रागाची झलक ऐकविली. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित रामदास पळसुले (तबला), कल्पेश माचला (बासरी सहवादन) यांनी रंगतदार साथ केली.

पंडित आनंद भाटे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग मालकंस ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यानंतर राग बसंत मल्हारमधील सुमधुर रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), स्वप्नील गायकवाड, ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.

सकाळच्या सत्राची सांगता बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित साजन मिश्रा व त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी जोग रागाचे मनमोहक दर्शन घडवत रसिकांना अनोखा आनंद दिला. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर एक महान चिंतक होत्या, असे सांगून रागप्रहराच्या पलिकडे जाऊन केलेले सादरीकरण हे त्यांच्या संकल्पनेला अनुरूप असल्याचे पंडित साजन मिश्रा म्हणाले. चारूकेशी रागातील गुरूंचे महात्म्य सांगणाऱ्या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. राहुल गोळे (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा राज्यभर यशस्वीपणे संपन्न

0

पुणे, दि. २९ – केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे पार पडली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षात उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा राज्यातील सर्व युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ व बंगाली या नऊ माध्यमांतून घेण्यात आली.

या परीक्षेत निकषानुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. या चाचणीमुळे आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण व कुटुंब कल्याण यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे.

यापूर्वी दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे ५ लाख असाक्षरांनी सहभाग नोंदविला होता. तर यंदा दि. २९ मार्च २०२६ रोजी सुमारे १.२३ लाख असाक्षर व्यक्तींनी नोंदणी केली असून त्यापैकी अंदाजे १ लाख परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनीही परीक्षेसाठी शुभेच्छा देत असाक्षरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा परीक्षा निरीक्षक’ म्हणून शिक्षण संचालनालयातील संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी भेटी देऊन परीक्षेचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य (डायट), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. राज्यातील माध्यम प्रतिनिधींनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली. तसेच शिक्षक संघटना, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सुयोग्य नियोजन करून परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.

या सर्व संबंधितांचे शिक्षण संचालक (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. कृष्णकुमार पाटील यांनी अभिनंदन व आभार मानले आहेत.

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 पेक्षा जास्त ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

आयोजकांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये झालेल्या मागील नो किंग्स आंदोलनाच्या तुलनेत यावेळी सुमारे 10 लाख अधिक लोक सहभागी झाले आणि जवळपास 600 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आंदोलन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, ते ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराज आहेत. त्यांचा राग विशेषतः इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन कारवाई आणि वाढत्या महागाईबद्दल आहे. अनेक ठिकाणी लोकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या विरोधात पोस्टर्स दाखवले आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

व्हाईट हाऊसने या आंदोलनांना ‘थेरपी सेशन’ असे संबोधत म्हटले की, सामान्य लोकांना याचा फारसा फरक पडत नाही. तर ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांचे निर्णय देशाला मजबूत करण्यासाठी आहेत. त्यांनी असेही म्हटले की, ते ‘राजा’ नाहीत आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.फक्त अमेरिकेतच नाही, तर जगाच्या इतर भागांमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात नाराजी दिसून आली आहे. पॅरिस, लंडन आणि लिस्बनसारख्या शहरांमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन

पुणे:
धायरी येथील बेनकरनगर मधील सर्व्ह क्रमांक पाच मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी रस्त्याला वळविण्यात आली आहे. ‌ या अरुंद रस्त्यावर दगड खडी क्रेशंड अशी वाहतूक करणाऱ्या अवजड डंपर, ट्रकमुळे जलवाहिन्या, मैलापाणी वाहिन्या आणि चेंबरची चुराडा झाला आहे. रस्त्यावर मैलापाणी वाहत आहे.त्यामुळे हजारो नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, अपघातही वाढले आहे. वाहतूक विभाग, पालिका
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना कोणी वाली उरला नाही.
पाणी पुरवठा, मैलापाणी चेंबरचा चुराडा करणाऱ्या,
वाहतूक कोंडी, अपघातास जबाबदार असलेल्या सर्व प्रकारच्या ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, बेनकर येथिल मुख्य रस्त्याचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे. अत्यंत अरुंद व दाट लोकवस्त्या , सोसायट्या मोठे जाळे या ठिकाणी आहे. वाहतूक वळविण्यात आली असली तरी अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील मैलापाणी , जलवाहिन्यांची चेंबर तुटून धो धो पाणी वाहत आहे. मैलापाणी घरात शिरत आहे.‌सोसायट्या, घराच्या दारात मैलापाणी, सांडपाण्याची तळी साठली. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने अवजड वाहनांना पर्यायी रस्त्याने ये जा करण्यास बंदी घालण्यात यावी.
स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थी , महिला, जेष्ठ नागरिक आदींना पर्यायी रस्त्याने चालणेही धोकादायक झाले आहे. डंपर ट्रकच्या धडकेत माणसे, मुले जखमी होत आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक आदींना दुकाने उघडपणे धोकादायक झाले आहे.‌ डंपर ट्रक थेट दुकानात शिरत आहे. या पर्यायी अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांमुळे रिक्षा , दुचाकी, मीनी स्कूल बस आदी वाहने अडकुन पडत आहेत. समोरासमोर वाहनांना ये जा करत येत नाही या गंभीर समस्येकडे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर व रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पीडित युवतीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शेखविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा त्याच बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होता. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला.युवतीने त्याचा प्रयत्न हाणून पाडत नकार दिल्यानंतर, आरोपी शेखने तिला स्पर्श करून विनयभंग केला. या प्रकारानंतर युवतीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी बस थांबवली आणि वाहक शेखला पकडले.
प्रवाशांनी युवतीकडे विचारणा केली असता, वाहक शेखने तिचा विनयभंग केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवाशांनी शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखी एका घटनेत, एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून, तो हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहतो. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिलेच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर, आईने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पुणे विमानतळ देशात अव्वल,सेवा गुणवत्तेत प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

देशातील सर्व विमानतळांवर ‘एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५’ (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.’