Home Blog Page 51

वापरून झालेल्या बॅटरी साहित्याचा पुनर्वापर करण्यात शास्त्रज्ञांना यश

नवी दिल्‍ली-

वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून मिळवलेल्या स्पेंट ग्रॅफाईटच्या पुनर्वापरासाठी नवे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे इंधन सेलची कार्यक्षमता सुधारणाऱ्या उच्च-मूल्याच्या कार्यकारी साहित्यात रुपांतर करणे शक्य झाले आहे.

लिथियम-आयन बॅटऱ्या आणि इंधन सेल तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे बॅटरीपासून निर्माण होणाऱ्या टाकाऊ साहित्याचे व्यवस्थापन तसेच किफायतशीर दरातील, टिकाऊ इंधन सेल उत्प्रेरकांची गरज ही गंभीर आव्हाने बनली आहेत.

इंधन सेल्सच्या महत्त्वाच्या कार्यावरील मर्यादांवर मात करण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या बॅटरी साहित्याचा उपयोग करता येऊ शकेल का याचा शोध शास्त्रज्ञांतर्फे घेण्यात येत होता आणि आता त्यांनी प्लाटिनम-आधारित ऑक्सिजन रिडक्शन रिअॅक्शन (ओआरआर)  इलेक्ट्रोकॅटलिस्ट असलेल्या ग्रॅफाईटवर लक्ष केंद्रित केले आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या पावडर मेटॅलर्जी आणि न्यू मटेरियल्स वरील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रातील (एआरसीआय) संशोधकांनी वापरानंतर क्षमता संपलेल्या लिथियम-आयन बॅटऱ्यांपासून ग्रॅफाईट मिळवले आणि त्याचे पृष्ठभाग क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच एज कार्यकारी गटांची संख्या वाढवण्यासाठी रासायनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली.

यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये केवळ आम्लारीधर्मी माध्यमे अथवा बॅटरीच्या पुनर्वापरावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते त्याऐवजी आता या पद्धतीमध्ये पुनर्नवीकरणीय ग्रॅफाईटचा वापर करून आम्लधर्मी माध्यमामध्ये मिथेनॉल-टॉलरंट ओआरआर ची प्रक्रिया केलेली दिसते.

यामुळे लिथियम-आयन बॅटऱ्यांच्या शाश्वत पुनर्वापराला चालना मिळण्यास मदत होईल, महागड्या उत्प्रेरक साहित्यावरील अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ उर्जा तंत्रज्ञानांचा वापर वाढेल.

‘सदर्न कमांड’च्या लष्करी कमांडरांनी पुणे येथे ऐतिहासिक वास्तू आणि प्रगत प्रशिक्षण सुविधेचे केले उद्घाटन

पुणे-

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम) यांनी आज पुण्यात दोन कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषवले. सेठ यांनी पुणे लष्करी तळावर ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले; तसेच ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’ इथे त्यांनी एका अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यत मार्गाचे‌ उद्घाटनही  केले.सुदर्शन आणि कोणार्क चौकांचे उद्घाटन: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ‘दक्षिण विभागाच्या पराक्रमी तुकड्या—’सुदर्शन चक्र काॅर्प्स’ आणि ‘कोणार्क काॅर्प्स’—यांचे शौर्य, उत्कृष्ट सेवा आणि लढाऊ वृत्तीला आदरांजली म्हणून ‘सुदर्शन चौक’ आणि ‘कोणार्क चौक’ यांचे उद्घाटन केले. पुणे लष्करी स्टेशनच्या प्रतिष्ठित परिसरात वसलेल्या या दोन्ही वास्तू देशातील सर्वात जुन्या लष्करी ठाण्यांपैकी एक असलेल्या पुण्याच्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासात लष्करी कर्तृत्वाची भर घालणाऱ्या ठरल्या आहेत.

दक्षिण विभागाच्या लष्करी कर्तृत्वाच्या वारशा मोठे योगदान देणाऱ्या या दोन्ही वास्तू, दलांच्या जिवंत मूल्यांचेही प्रतिनिधित्व करतात. त्यांची स्थापना, पराक्रमाच्या स्मृती जतन करणे, अभिमान जागृत करणे आणि तिच्या युद्ध-अनुभवी दलांच्या वारशात कमांडची विद्यमान ओळख दृश्यरूपात स्थापित करणे या जाणीवपूर्वक केलेल्या संस्थात्मक प्रयत्नांचे द्योतक आहे.

लष्कराच्या शारीरिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन : लष्कर कमांडरांनी अत्याधुनिक कृत्रिम लष्करी अडथळा शर्यतमार्गाचे उद्घाटन केले. अधिक तंदुरुस्त, कणखर आणि युद्धसज्ज सैन्यदल तयार करण्याच्या सदर्न कमांडच्या निरंतर प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

बारमाही काळात सुरू राहणाऱ्या  या अडथळा शर्यतमार्गावर विविध परिस्थितींमध्ये वास्तववादी, उच्च-तीव्रतेचे आणि दीर्घकाळ टिकणारे शारीरिक प्रशिक्षण सुलभ व्हावे, यादृष्टीने काळजीपूर्वक केलेले अडथळे आणि रात्रीच्या प्रशिक्षणाची क्षमता यांचा समावेश आहे.युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे शारीरिकदृष्ट्या कणखर, मानसिकदृष्ट्या चपळ आणि कारवाईत जुळवून घेणाऱ्या सैनिकांची आवश्यकता आहे, यावर सेठ यांनी आपल्या भाषणात भर दिला. अशा प्रकारच्या विशेष प्रशिक्षण पायाभूत सुविधा एक कणखर, चपळ आणि भविष्यासाठी सज्ज सैन्यदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.  या कार्यक्रमांतून लष्करी वारसा जतन करण्याप्रती आणि भविष्यातील युद्धसज्जता वाढवण्याप्रती दक्षिण विभागाची कटिबद्धता अधोरेखित झाली. 

५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० टनांच्या दोन स्वतंत्र निविदा काढा – विरोधीपक्षनेते निलेश निकम

पुणे- ५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २५० टनांच्या दोन स्वतंत्र निविदा काढा अशी मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे विरोधीपक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.

ते म्हणाले,’पुणे महानगरपालिकेद्वारे शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी ५०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, शहराच्या भविष्यातील गरजा आणि तांत्रिक सुरक्षितता विचारात घेता आणि निविदेत पुरेशी स्पर्धा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक वाटते.
या प्रस्तावाबाबत खालील काही तांत्रिक व व्यावहारिक मुद्दे विचारात घ्यावेत अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे पहा कोणते मुद्दे :
तांत्रिक जोखीम (Technical Risk): जर आपण ५०० टनांचा एकच प्रकल्प कार्यान्वित केला आणि काही तांत्रिक कारणास्तव तो बंद पडला, तर संपूर्ण ५०० टन कचऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन शहरात कचरा साठण्याची शक्यता असते.
विकेंद्रीकरण आणि सातत्य: ५०० टनांऐवजी २५० टनांचे दोन स्वतंत्र प्रकल्प असल्यास, एका प्लांटमध्ये बिघाड झाला तरी दुसऱ्या प्लांटमध्ये प्रक्रिया सुरू राहील. यामुळे कचरा व्यवस्थापनात खंड पडणार नाही.
कार्यक्षमता आणि स्पर्धा: दोन वेगवेगळे ठेकेदार किंवा दोन स्वतंत्र प्लांट असल्यास कामात स्पर्धा राहील आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. तसेच, शहरातील वेगवेगळ्या भागात हे प्रकल्प उभारल्यास वाहतुकीचा खर्चही कमी होऊ शकतो.
निलेश निकम यांची मागणी:
पुणे शहराची स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राखण्यासाठी, कृपया ५०० टनांची एक निविदा काढण्याऐवजी, २५० टनांच्या दोन निविदा मागवण्यात याव्यात. यामुळे शहराच्या कचरा प्रश्नावर एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल.
या विषयावर सकारात्मक विचार होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे.


अवकाळी पावसाने निर्माण झालेल्या समस्या आपत्ती विभागाने तातडीने दूर कराव्यात: महापौर

पुणे

अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. महापौर मंजुषा दीपक नागपूरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांच्या निर्देशानुसार शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक :
📞 02025506800
📞 02025501269

तुळशीबाग–मंडई परिसरात भगवान महावीर स्वामींच्या २६२५व्या जन्मकल्याणका निमित्त भव्य उत्सव

दिवसभर दर्शन; सायंकाळी महाआरती व दिमाखदार वरघोडा
पुणे, :
पुण्यातील तुळशीबाग–मंडई परिसर जैन संघाच्या वतीने भगवान महावीर स्वामींच्या २६२५व्या जन्मकल्याणकानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रभूंच्या दर्शनी मूर्तीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या निमित्ताने भगवान महावीर स्वामींची आकर्षक व दर्शनीय मूर्ती तयार करून ती दिवसभर मंडई परिसरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जैन समाजाबरोबरच इतर नागरिकांनाही प्रभूंचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सायंकाळी प्रभूंची भव्य महाआरती आयोजित करण्यात येणार असून “कौन बनेगा भाग्यशाली” या लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच लक्ष्मी रोडवरून दिमाखदार वरघोडा काढण्यात येणार असून, मागील २५ वर्षांपासून पुणे सकल संघाच्या वरघोड्यात या मंडळाचा बक्षीसपात्र सहभाग राहिला आहे.
उत्सवाबाबत माहिती देताना मोहन साखरिया यांनी सांगितले की, तुळशीबाग–मंडई परिसर जैन संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रभूंच्या दर्शनी मूर्तीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा उत्सव जैन समाजाच्या श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहून दर्शन, आरती व वरघोड्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिका देऊ शकत नसेल तेव्हा, ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच-अनिरुद्ध पावसकर

पुणे-समाविष्ट ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच आहे. तसे हमीपत्र देखील बिल्डर देतात. मात्र प्रत्यक्षांत पाणीपुरवठा करत नाहीत. त्यामुळे मुबलक पाणी देण्याबाबत बिल्डरला खरेदी करारनाम्यात ही बाब नमूद करावी लागणार आहे. तसेच मान्य प्रस्तावांची यादी महापालिका वेबसाईट वर टाकण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जारी केले आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नविन ११ गावे (उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून ९ गावे) व २३ गावे असे एकूण ३२ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. नव्याने समाविष्ठ गावांकरीता पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत संपूर्ण पाणीपुरवठा योजना विकसित करण्याची कामे प्रगती पथावर आहेत. नव्याने समाविष्ठ ३२ गावांमधील प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांमध्ये विकासकामार्फत संबंधित प्रकल्पाचे विकसन पूर्ण झाले नंतर निवासी/व्यापारी वापरासाठी पुणे मनपामार्फत पुरेसा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने उपलब्ध होईल तोपर्यंत विकसकामार्फत मुबलक पाणीपुरवठा सदर प्रकल्पास करणार असे हमीपत्र विकसक पुणे महानगरपालिकेस सादर करतात.

हमीपत्रानुसार पुणे मनपामार्फत कोणताही पाणीपुरवठा न झाल्यास किंवा अपुरा पाणीपुरवठा झाल्यास सदर प्रकल्पातील सदनिका धारकांना सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये पाणीपुरवठ्याबाबत वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती विशेष बाब महणून नमूद करून घेण्याची जबाबदारी विकासकाची आहे. तसेच ३२ गावांमधील पुणे मनपास हमीपत्र सादर करून विकासकामार्फत प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांना देण्यात आलेल्या मान्य प्रस्तावांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून वेळोवेळी सदर यादी अद्ययावत करण्यात येणार आहे. शहर अभियंता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

हिंगणेमळ्यात नशेड्यांचा उपद्रव: श्री काळभैरवनाथ मंदिरात PI मानसिंग पाटलांनी दिली महिलांना ग्वाही,म्हणाले त्यांची आता खैर नाही…

पुणे:हडपसर- हिंगणेमळा येथील कॅनाल च्या भरावावावरील निर्जन रस्त्यावर व कॅाक्रिट च्या भिंती वर रोज रात्री काही समाजकंटक रोज दारु पिऊन नशा करतात तसेच येणा-या जाणाऱ्या नागरिकांना महिलांना अश्लील शिवीगाळ करतात. या विरोधात या पुर्वी नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशन ला माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन गाऱ्हाणी मांडली त्यावेळी त्या प्रकारात थोडासा फरक पडला होता , परंतु हल्ली हा त्रास भयंकर वाढला आहे त्या मुळे पुन्हा एकदा योगेश बापू ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काळेपडळ पोलीस स्टेशन चे पोलीस इन्पेक्टर मानसिंग पाटील यांनी हिंगणेमळ्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता हिंगणे मळा येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात लोकअदालत घेतली.या लोकअदालतीमध्ये परिसरातील असंख्य महीला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
त्या वेळी काळेपडळ पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी महीलांना सायबर क्राईम , ११२ नंबर वरील कॅाल , बीट मार्शल बाबत माहिती, अर्थिक गुन्हे तसेच सोशलमेडीया वरील गुन्हे इं बाबत माहिती अवगत करून दिली तसेच सर्व नागरिकांना आश्वस्त केले की अशा नशेड्यांची ज्ञ आता पोलीस करणार नाही. कायदा सुव्यवस्था बाबत कधीही तक्रार करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
तसेच सर्वांना स्वतःचा मोबाईल क्रमांक त्यांनी यावेळी दिला
या वेळी सौ. अनिता हिंगणे, सुचिता हिंगणे,रुपाली हिंगणे,एैश्वर्या हिंगणे ,सुरेखा हिंगणे, लक्ष्मी हिंगणे, मंदाबाई हिंगणे,जयश्री हिंगणे, शोभा हिंगणे, सुलभा हिंगणे, अर्चना हिंगणे,कुसुम हिंगणे ,स्वप्नाली हिंगणे तसेच सर्वश्री ज्ञानेश्वर हिंगणे, सतीश हिंगणे,राजेंद हिंगणे,संदीप हिंगणे,आण्णा वाडकर ,शुभम हिंगणे,विनोद ससाणे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन योगेश हिंगणे यांनी केले व मानसिंग पाटील तसेच योगेश बापू ससाणे यांचे श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर

  • प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित; शेतजमिनींचे संरक्षण करण्याची मागणी

पुणे: देशातील कृषी क्षेत्र झपाट्याने अकृषी क्षेत्रात रूपांतरित होत असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी होणे चिंताजनक आहे. १४० कोटी नागरिकांच्या अन्नसुरक्षेसाठी भारताला सक्षम बनवायचे असेल, तर शेतजमिनींचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत शून्य प्रहरात बोलताना मांडले. 

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “देशातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये शेतीजमिनींची प्लॉटिंग करून निवासी प्रकल्प उभारले जात आहेत. यामुळे पेरणीयोग्य क्षेत्रात सतत घट होत आहे. पंजाबमध्ये मागील काही वर्षांत एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन अकृषिक घोषित करण्यात आली. सध्या भारतात केवळ सुमारे ४५ टक्के जमीनच शेतीखाली असून, त्यात सुमारे ९ टक्क्यांची घट झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास अन्नसुरक्षा, शेतकऱ्यांची उपजीविका, जीएसटी उत्पन्न आणि पर्यावरणीय संतुलन यावर परिणाम होऊ शकतो.” एका अभ्यासानुसार लोकसंख्येत एक टक्क्याने वाढ झाली, तर शेती क्षेत्र ०.४५ टक्क्यांनी कमी होते, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन जपून ठेवत पुढील पिढीसाठी ती सुरक्षित करावी. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण बियाणे, सूक्ष्म सिंचन आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. शेतजमिनीचे अकृषी क्षेत्रात रूपांतर केवळ व्यापक जनहिताच्या पायाभूत प्रकल्पांसाठीच मर्यादित असावे. उपजाऊ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे लागू करावेत, तसेच जमिनींच्या वापरातील बदलांवर सॅटेलाइट व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे कुलकर्णी यांनी केली. 

तसेच शेतजमीन शेतीसाठीच वापरली जावी. त्यातूनही शेतकऱ्यांना जमीन विकावी लागल्यास सरकारने योग्य मोबदला देऊन ती खरेदी करून शेतीसाठीच वापर सुनिश्चित करावा, असेही त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्र हे भविष्यातील महत्त्वाचे उद्योग ठरणार असल्याने त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा

मुंबई -अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी घोषणा करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिका-यांना रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. चव्हाण यांनी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह कमर्चारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.
यावेळी श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन समन्वयातून सर्वांनी मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय आम्ही करणार नाही या भूमिकेतून काम करण्याची पद्धत अवलंबत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीमध्ये संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची तर सचिव म्हणून प्रभुदास भोईर, मुखांश नाईक, गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषीत झाली त्यात रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले, दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे, वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि वरळी विधानसभा सरचिटणीस पदी समीर शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

“पुणे तिथे काय उणे, नीलम गोऱ्हे यांनी ओळखले; आता पुढचा मुक्काम ठाणे!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र विधानपरिषद अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६: संसदीय लोकशाहीचे संवर्धन आणि जनहिताचे ठोस निर्णय
— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा

पुणे | दिनांक: ३० मार्च २०२६

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात यशस्वीपणे संपन्न झाले. या अधिवेशनात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि संतुलित भूमिका बजावत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडले. अनेक प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांना दिशा देत त्यांनी संसदीय लोकशाही अधिक बळकट केली. अधिवेशनाच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

​मुंबई येथे संपन्न झालेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ निमित्त महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि २५ लाख महिलांना ‘लखपती दिदी’ बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ७.५ HP पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज आणि पीक कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे राज्याच्या शाश्वत विकासाला गती मिळणार असून, हे अधिवेशन खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या हिताचे साध्य करणारे ठरले असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या सन २०२६–२७ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना डॉ. गोऱ्हे यांनी तो ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक असल्याचे नमूद केले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू असलेल्या योजनांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेतील तरतूद, तसेच थकीत वीज बिलांवरील व्याज सवलत या उपाययोजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तरतुदींनाही त्यांनी विशेष महत्त्व दिले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्याचा संकल्प, तसेच ‘एचपीव्ही लसीकरण’ मोहिमेसाठी करण्यात आलेली तरतूद ही महिला आरोग्याच्या दृष्टीने क्रांतीकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसह युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत तरुणांना विद्यावेतन देण्याचा निर्णय हा रोजगारक्षमतेला चालना देणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

या अधिवेशनात राज्याच्या हिताची अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. त्यामध्ये ‘भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६’ हे विशेष ठरले असून, डिजिटल माध्यमांतून महिलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा विधेयकामुळे शहरी विकासात सुसूत्रता येणार आहे, तर शेतकरी संरक्षण विधेयकामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण होणार आहे.

अधिवेशनाच्या निरोप प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य केले. “एका नेतृत्वाखालून मोठ्या प्रमाणावर सहकारी बाहेर पडत असतील, तर त्या प्रक्रियेचे आत्मपरीक्षण आवश्यक असते,” असे त्या म्हणाल्या. सत्य मांडल्यामुळे टीका होऊ शकते, मात्र जनहितासाठी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. बदलापूर परिसरातील महिलांचे शोषण करून बीजांड विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटची गंभीर दखल घेत त्यांनी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचे निर्देश दिले. दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई, परवाने रद्द करणे आणि IVF केंद्रांसाठी कडक SOP तयार करण्यावर त्यांनी भर दिला.

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘उभारी’ प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने समृद्धी महामार्गावरील सुविधांची पडताळणी प्रत्यक्ष व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे करण्याचे निर्देश देत त्यांनी उत्तरदायित्वाची नवी पद्धत रुजवली.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन, महिला सुरक्षा आणि शहीद कुटुंबीयांच्या प्रश्नांवरही डॉ. गोऱ्हे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शनिवारवाडा, लोहगड किल्ला आणि आगाखान पॅलेस यांसारख्या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्याची मागणी केली. या स्थळांच्या देखभालीसह मूलभूत सुविधा उभारून पर्यटनाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणीकंद येथील हुंडाबळी प्रकरणात मृत विवाहिता वैष्णवी लाटे हिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेत तपासात फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांचीही त्यांनी दखल घेतली. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. शासनाची शहीद कुटुंबीयांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारे हे कार्य ठरले.

डॉ. गोऱ्हे यांच्या संसदीय भाषणांना आणि सामाजिक भूमिकांना मोठा जनसमर्थन लाभला. “दुःख एका पक्षाचे नसते” हे त्यांचे विधान व्यापक चर्चेचा विषय ठरले. ‘माय मराठी कलासंगम’ सारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी तरुण पिढीला भाषा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

वृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. तसेच आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये “लिंगसमानता हा लोकशाहीचा पाया आहे” हा ठाम संदेश त्यांनी दिला.

या संपूर्ण अधिवेशनाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संसदीय कौशल्याचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना “सभागृहाचे शक्तिस्थान” असे संबोधून गौरव केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत विशेष उल्लेख केला.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपली ही धडपड भविष्यातही कायम राहील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

मी खरातला भेटल्याच्या बातम्या खोट्या – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.असे स्पष्टीकरण विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पुढे असे म्हटले आहे कि,’ गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत.माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲड. श्रीपाद देशपांडे आणि माझी आई लतिकाताई गोऱ्हे व शास्त्रज्ञ वडील डॅा. दिवाकर गोर्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, त्याचे मी काटेकोरपणे पालन करत आले आहे. “कोणत्याही ढोंगी, ‘गुरूचा’ अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही,” हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थ , साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्री दत्त महाराजांवर आहे.
महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले .मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते . राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक ‘गुरू’ची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही.

नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.

माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.

ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे.याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे.

​सत्याच्या बाजूने उभे राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील.असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या एअर ॲम्ब्युलन्स सेवेचे आधुनिकीकरण

अधिक सक्षम सेवेमुळे देशविदेशातील रुग्णांना मिळणार वेगवान उपचार

अनेक एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरसोबत सामंजस्य कराररुग्णांची नेआण अधिक सुलभ करण्यासाठीउत्तम समन्वय राखण्यासाठी आणि हस्तांतरणाचा खर्च कमी करण्यासाठी विविध एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार करण्यात आले आहेत.

१०६६ EMS – एकच संपर्क केंद्रसहयोगी कंपन्यांच्या मदतीने पुरवल्या जाणाऱ्या सर्व एअर ॲम्ब्युलन्स सेवांसाठी १०६६ EMS’ हे एकमेव समन्वयाचे केंद्र (Single Access Point) म्हणून काम करेल

पुणे-: अपोलो हॉस्पिटल्सने रुग्ण वाहतूक सुविधेबाबत‘ एक विशेष उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली आहेभारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भागीदारांसोबत समन्वय साधून हवाई वैद्यकीय वाहतुकीद्वारे गंभीर स्थितीतील रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यातहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेगेल्या काही महिन्यांतअपोलो हॉस्पिटल्सने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एअर ॲम्ब्युलन्स कंपन्यांसोबत करार केले आहेतयामुळे तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आता अधिक सोपे आणि सुरक्षित होईलही सर्व सेवा अपोलोच्या १०६६ इमर्जन्सी रिस्पॉन्स नेटवर्क‘ द्वारे चालवली जाईलया अंतर्गत सर्व सेवा पुरवठादारांना एकत्र आणून रुग्णांची वाहतूक वेगाने आणि सुव्यवस्थित पद्धतीने करणे शक्य होईलअपोलो हॉस्पिटल्सच्या या नवीन भागीदारीमुळे आपत्कालीन वैद्यकीय प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेतदुर्गम किंवा लांबच्या ठिकाणाहून रुग्णांना आणताना होणारा विलंबजास्त खर्च आणि मध्यस्थांची गरज आता कमी होईलया नव्या उपक्रमामुळे रुग्णांची हवाई वाहतूक सेवा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे.

एअर ॲम्ब्युलन्स सेवा आता अधिक प्रगत आणि अधिक विस्तृत केल्याबाबतअपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्ष डॉप्रीता रेड्डी म्हणाल्यागंभीर परिस्थितीतील रुग्णालायोग्य वेळी योग्य रुग्णालयात पोहोचवणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरतेनामवंत एअर ॲम्ब्युलन्स पुरवठादारांशी केलेल्या हातमिळवणीमुळेआता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना प्रगत उपचार मिळवणे अधिक सोपे झाले आहेही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध असेलआमच्या १०६६‘ रिस्पॉन्स नेटवर्कच्या मदतीने रुग्णांना उपचारांचे उत्तम नियोजन आणि रुग्णालयाची पूर्वतयारी अशा दोन्ही सुविधा मिळतीलयामुळे रुग्णांना हव्या त्या वेळी आवश्यक उपचार मिळण्यासाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग तयार झाला आहे.”

पहिल्या टप्प्यातअपोलो हॉस्पिटल्सने देशविदेशातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार केले आहेतयामध्ये ब्ल्युडॉट चार्टर्स अँड एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस (युएई)एरोमेड इंटरनॅशनल रेस्क्यू सर्व्हिसेस प्रालि.झंकार एव्हिएशन प्रालि., iCATT हेल्थ सोल्युशन्स प्रालि.एअर रेस्क्युअर्स वर्ल्ड वाइड प्रालि.वेदांत एअर रेस्क्यू प्रालि.एरोकेअर एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसआयुसेवा एअर अँड ट्रेन ॲम्ब्युलन्सएअर मेडिकल 24X7 प्रालिआणि फ्लॅप्स एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहेगंभीर स्थितीतील रुग्णाला तातडीने प्रगत उपचार केंद्रांमध्ये हलवणे आवश्यक असतेअशा वेळी सहयोगी कंपन्यांसोबत समन्वय साधून हवाई रुग्णवाहिका सेवा सहज उपलब्ध करून देणेहा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या इमर्जन्सी विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर डॉधवपलानी अलागप्पन म्हणालेएअर ॲम्ब्युलन्समध्ये लाइफसपोर्ट सिस्टमव्हेंटिलेटरडिफिब्रिलेटर आणि इतर प्रगत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतातयामुळे अतिशय गंभीर रुग्णांना प्रवासादरम्यानही आयसीयू‘ सारख्याच सखोल देखभालीचा आधार मिळतोसंपूर्ण प्रवासातप्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि प्रमाणित डॉक्टरांद्वारे रुग्णांचे सतत निरीक्षण केले जातेहे डॉक्टर रुग्णांना औषधे देऊ शकतात आणि त्यांना स्थिर ठेवण्यासाठीआराम मिळवून देण्यासाठी आवश्यक ते उपचारही करू शकतातक्रिटिकल केअर युनिटमध्ये मिळणारे वैद्यकीय उपचार प्रवासादरम्यानही कायम मिळत राहणे अत्यंत आवश्यक असते आणि ते मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.”

अपोलो हॉस्पिटल्सच्या हेल्थकेअर लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉरामकृष्ण विजय वर्मा म्हणाले: “अपोलोच्या १०६६‘ या आपत्कालीन हेल्पलाइनवर विनंती आली कीतातडीने आमचे इमर्जन्सी रिस्पॉन्स पथक रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतेत्यानंतर प्रवासासाठी सर्वात योग्य मार्ग निश्चित केला जातो आणि आमच्या सहयोगी एअर ऑपरेटरच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन केले जातेविमान वाहतुकीशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचे (लॉजिस्टिक्सव्यवस्थापन एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरद्वारे केले जातेया सेवेचा दर आधीच निश्चित असल्याने आणि यामध्ये मध्यस्थांना कोणताही वाव नसल्यामुळेअलीकडे या सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली आहे.”

हा उपक्रम अपोलोच्या सध्याच्या आपत्कालीन पायाभूत सुविधांना देशभरातील १०६६‘ नेटवर्कशी जोडतोयामध्ये अपोलोची आपत्कालीन समन्वय क्षमताजमिनीवरील रुग्णवाहिका सेवाविमानतळ ते रुग्णालय कनेक्टिव्हिटी आणि भागीदारांमार्फत चालवली जाणारी हवाई वाहतूक यांचा समावेश आहेयामुळे रुग्णांना एका बेडवरून दुसऱ्या बेडपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य मिळेल आणि प्रतिसादाची कार्यक्षमता सुधारेलपरिणामीदुर्गम भागटियर आणि टियर शहरे तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रगत उपचार मिळणे शक्य होईल.

हा उपक्रम सुरु करूनअपोलो हॉस्पिटल्स आपली आपत्कालीन रुग्ण वाहतूक सेवा आणि रुग्णांना मिळणारे उपचार अधिक सुलभ करण्यावर अधिक भर देत आहेप्रगत उपचारांसाठी वेळेला खूप जास्त महत्त्व असतेत्यामुळे शहरांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वाहतुकीसाठी अपोलोने एक अधिक संघटितसुव्यवस्थितसक्षम चौकट तयार केली आहे.

पल्स वैद्यकीय परिषद 2026 यशस्वी; आरोग्य क्षेत्रास परिवर्तनाची नवी दिशा: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

15 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई, दि. 28 : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद 2026 महत्त्वपूर्ण ठरली असून, या परिषदेतून नवोन्मेष, गुंतवणूक आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

समारोप सत्रास संबोधताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले की, बल्क ड्रग पार्क आणि औषधनिर्मिती क्षेत्रावरील चर्चांमुळे स्वावलंबनाला चालना मिळणार असून, स्टार्टअप्सच्या सहभागामुळे नव्या व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. या उपक्रमाचा सुमारे चार हजार विद्यार्थी, आरोग्य व्यावसायिक, संशोधक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना—थेट लाभ होणार आहे.

दोन दिवसीय परिषदेचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘महाराष्ट्र घोषणापत्र’मुळे सहकार्य, पायलट प्रकल्प आणि व्यापक उपाययोजनांसाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे. यामुळे परिषद केवळ चर्चांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिणाम देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पल्स वैद्यकीय परिषद 2026 मध्ये शासन, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र आल्यास आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन शक्य असल्याचे स्पष्ट झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल नवकल्पना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य या क्षेत्रांमध्ये सखोल चर्चा झाली. परिषदेत उच्चस्तरीय राऊंड टेबल बैठका, विविध सत्रे आणि प्रदर्शने यांमधून तंत्रज्ञानाधारित आणि रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित झाली. तसेच शिक्षण, संशोधन आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रात 15 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य सीमांच्या पलीकडे जाऊन होणे आवश्यक आहे. परिषदेत मांडलेल्या कल्पनांना कृतीत उतरवून अधिक सुलभ, परवडणारी आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्था उभारण्याची वेळ आली आहे, असेही आवाहन करत मत्री मुश्रीफ यांनी केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 30 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत आहे.

सन २०२५-२६ मधील गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी www.mahaamrut.org.in⁠ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी रु. १०,००० तर मुलाखतीच्या तयारीसाठी रु. ५,००० इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. योजनेविषयीची सर्व माहिती अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२६ असा आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन अमृतचे व्यवपकीय संचालक यांनी केले आहे.
0000

स्पेनने म्हटले- इराणविरोधातील युद्ध आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात,अमेरिकेसाठी हवाई हद्द बंद केली:लष्करी तळाच्या वापरावरही बंदी घातली

वॉशिंग्टन डीसी-स्पेनने इराणविरुद्धच्या युद्धात सहभागी असलेल्या अमेरिकी लष्करी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. लष्करी तळांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारीटा रोब्लेस यांनी सांगितले की, इराणशी संबंधित कोणत्याही लष्करी कारवाईसाठी देश आपली हवाई हद्द आणि लष्करी तळ वापरू देणार नाही. या निर्णयानंतर, अमेरिकी विमानांना आपले मार्ग बदलावे लागतील, मात्र मानवतावादी आणि आपत्कालीन उड्डाणांना यातून वगळण्यात आले आहे.

स्पेनचे अर्थमंत्री कार्लोस कुएर्पो यांनी सांगितले की, एकतर्फी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असलेल्या युद्धाला पाठिंबा न देण्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी यापूर्वीच अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईवर टीका केली आहे. या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारविषयक कारवाईची धमकी दिली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि स्पेन यांच्यातील राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायलचा तेहरानमधील विद्यापीठावर हल्ला
इस्रायली लष्कराने इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठावर हवाई हल्ला केल्याचे म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संस्थेचा वापर लष्करी तळ म्हणून केला जात होता, त्यामुळेच तिला लक्ष्य करण्यात आले.

मात्र, इस्रायलने या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही. इराणने अद्याप या हल्ल्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. झालेल्या नुकसानीचे प्रमाण अज्ञात आहे.

इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना नष्ट करण्याची ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही आणि करार झाला नाही, तर अमेरिका त्यांचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करेल.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खार्ग बेट पूर्णपणे नष्ट केले जातील. गरज पडल्यास खारपाणी शुद्धीकरण प्रकल्पांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका एका नवीन आणि अधिक समंजस शासनासोबत वाटाघाटी करत आहे आणि त्यात प्रगती होत आहे. तथापि, लवकरच करार न झाल्यास लष्करी कारवाई तीव्र केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकन सैनिक आणि इतरांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले. ज्यासाठी त्यांनी इराणला जबाबदार धरले.