Home Blog Page 50

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, देशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

राज्यात ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात, ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे, काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर

एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होते, त्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सुरेंद्र पाटीलच्या बंगल्यावर छापा, 7 बंदुकांसह 10 लाखांची शस्त्रे हस्तगत

मुंबई-डोंबिवलीचा कुख्यात गुंड आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला 55 वर्षीय सुरेंद्र पांडुरंग पाटील हा जामिनावर बाहेर येऊन दोन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, जामिनावर मुक्त होताच पुन्हा बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या या हिस्ट्रीशीटरचा खरा चेहरा आता समोर आला आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दावडी येथील सुरेंद्रच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकला असता, झडतीदरम्यान पोलिसांना घराच्या इंटिरिअरशी विसंगत असलेल्या एका शू-रॅक बद्दल संशय आला. पोलिसांनी या कपाटाची कसून तपासणी केली असता, त्यातील एका अत्यंत शिताफीने बनवलेल्या गुप्त कप्प्यात दडवून ठेवलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठा उघड झाला. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडल्याने स्वतः पोलिसही चक्रावून गेले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला असून, यात 7 बंदुका, जिवंत काडतुसे आणि 167 एअर गनच्या गोळ्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये पाच देशी बनावटीची पिस्तूलं व रिव्हॉल्व्हर आणि दोन एअर गन असून, काही पिस्तुलांवर ‘Made in USA’ आणि ‘स्पेशल ऑटो’ असे कोरलेले आढळले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सापडलेली जिवंत काडतुसे पाहता, हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो प्रत्यक्ष गुन्हेगारी वापरासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला आणि सातत्याने ‘भाईगिरी’ची रिल्स पोस्ट करणारा सुरेंद्र पाटील आता हा शस्त्रसाठा केवळ चित्रीकरणासाठी असल्याचा दावा करत आहे. मात्र, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस त्याच्या या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा स्थानिक गुन्हेगारांना पुरवण्यासाठी किंवा इतर कोणत्या गंभीर गुन्ह्यासाठी जमवला होता का, या दिशेने आता पोलिस सखोल तपास करत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने मद्य तस्करी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने आंतर जिल्हा मद्य तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २० लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये छापेमारी करून तस्करीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी गोव्यातील स्वस्त दरातील मद्य मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणत होती. त्यानंतर या मद्याला नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून बाजारात चढ्या दराने विक्री केली जात होती. या प्रकारामुळे शासनाला महसुलाचे मोठे नुकसान होत होते, तसेच ग्राहकांची फसवणूकही केली जात होती.उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला कांदलगाव (ता. इंदापूर) परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. कांदलगाव–शहा रस्त्यावर संशयित मालवाहू वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. काही अंतरापर्यंत पाठलाग करून अधिकाऱ्यांनी वाहन थांबवले. झडतीदरम्यान वाहनातून मद्याने भरलेले २५ प्लास्टिक ड्रम आणि ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीच्या बाटल्यांसाठी वापरली जाणारी सुमारे १,४०० बनावट बुचे जप्त करण्यात आली.

माढा, साताऱ्यात छापा, विदेशी मद्याचा साठा जप्त…

आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत मद्य तस्करीचे जाळे अनेक जिल्ह्यांत पसरल्याचे उघड झाले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आरोपी अक्षय देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत गोव्यातून आणलेल्या विदेशी मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे दोन हजार बनावट बुचे असा सुमारे ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे फरार आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून ‘इम्पेरियल ब्ल्यू’ व्हिस्कीच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात बनावट बुचे जप्त करण्यात आली.

अशोक खरातप्रकरणी सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव,या प्रकरणाने महायुती सरकार पोखरले,

इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणविसांचे विधान दिशाभूल करणारे.

मुंबई, दि. ३१ मार्च २०२६

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी संघटन सृजन अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातून राष्ट्रीय पातळीवरील नेते जिल्ह्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, यासोबतच तालुका, मंडल स्तर तसेच ग्राम स्तरापर्यंतच्या नियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करणार आहे. संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असून हे वर्ष संघटन वर्ष आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजीत कदम, रणजित कांबळे, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. बळवंत वानखेडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष माजी आ. वजाहत मिर्झा यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरु झाले असून महाराष्ट्रात २७ मार्चपासून हे अभियान सुरु झालेले आहे. १ मे पर्यंत या संदर्भातील शिफारशींचा अहवाल पूर्ण होईल व त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जातील. राज्यात ७२ जिल्हाध्यक्ष व ७५० तालुका अध्यक्ष असतील. संघटना गावस्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामशाखा सुरु केल्या जाणार आहेत. याबरोबरच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस. एससी, एसटी, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचीही नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

अशोक खरात प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यातील महायुती सरकार पोखरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ असल्याचे सांगितले जात असेल तरी त्यांची संख्या मोठी आहे. पण गृहविभागाकडून काही सिलेक्टिव्ह व्हिडिओच लिक केले जात आहेत, त्यामागे मोठे षडयंत्र आहे. खरातच्या सीएकडे मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याच्या बातम्या येत आहेत, हा पैसा नेमका कोणाचा असा प्रश्नही हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

इंधन टंचाईबाबत फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे..
देशात पेट्रोल पंपावर व एलपीची गॅस साठी रांगा लागत आहेत, याचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले हे हास्यास्पद आहे. काँग्रेस व राहुल गांधी अफवा पसरवत नाहीत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत भाषण करताना कोरोनासारखी परिस्थिती असल्याचे विधान केले होते, त्यातूनच लोकांमध्ये लॉकडाऊनची भिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मोदी सराकरचे परराष्ट्र धोरण फसलेले आहे, त्यामुळे जनतेला इंधन व एलपीजी टंचाईला सामारो जावे लागत आहे व भाजपा सरकार मात्र आपली जबाबदारी झटकून काँग्रेसवर आरोप करत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुणे महापालिका करणार डिजिटल गणना-स्व-गणना _स्वातंत्र्यानंतरची ८ वी गणना १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत

पुणे-भारताची जनगणना ही जगातली सर्वोत्तम जनगणना पैकी एक असून तिला समृद्ध परंपरा लाभली आहे ती जगातील सर्वात मोठ्या उपक्रमापैकी एक आहे भारतात पहिली जनगणना इसवीसन १८७२ मध्ये करण्यात आली होती ती देशाच्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली होती. सन १९८१ मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली सन १९८९ पासून जनगणना ही दर १० वर्षांनी करण्यात येत असून सन २०२७ ची जनगणना ही या शृंखलेतील १६ वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची ८ वी गणना आहे.
भारताची जनगणना २०२७ चे पुणे महापालिका क्षेत्रातील कामकाज हे दोन टप्प्यात होणार असून घरांची यादी व घरांची गणना हे पहिल्या टप्प्याचे कामकाज दिनांक १ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी https://Se.census.gov.in ह्या स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली असून महाराष्ट्रासाठी ते दिनांक १ मे ते १५ मे २०२६ कालावधी करिता उपलब्ध राहील. नागरिकांना आपली माहिती स्वतः भरता येणार आहे. प्रथम नागरिक रजिस्ट्रेशन करून विचारलेल्या ३४ प्रश्नांची माहिती भरून ती सबमिट केल्यानंतर नागरिकांना Self Enumeration I D (SE ID XXXXXXXXXXX) जनरेट होणार असून तो SMS अथवा Email id व्दारे प्राप्त होईल. सदर SE ID नागरिकांनी जतन करून ठेवावा व दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत येणारे जनगणना अधिकारी/प्रगणक यांना घरांना भेट देतेवेळी उपलब्ध करून देण्यात यावा.
जनगणना २०२७ या गणनेत प्रथमच मोबाईल अॅप व्दारे डिजिटल माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गटातील प्रत्येक घरांना दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत भेट देऊन माहिती संकलित करतील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असेल.
दुसऱ्या फेरीचे कामकाज हे माहे फेब्रुवारी २०२७ मध्ये केले जाईल.
आजच्या डिजिटलच्या युगात भारताच्या जनगणना संचालनालयाकडून नागरिकांना त्यांची पहिल्या टप्प्यातील घरयादी व घराची गणना संबंधित माहिती थेट online माध्यमातून गोपनीयरित्या भरून भारताच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आकडेवारी देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
तरी जास्तीत जास्त पुणेकर नागरिक बंधू भगिनी यांनी स्वगणनेत दिनांक ०१ मे २०२६ ते दिनांक १५ मे २०२६ या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी तसेच अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.

अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त-तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वी बदली

राज्यात 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश आज (३१ मार्च) जारी करण्यात आले असून, यात अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झालेली नियुक्ती सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. तर, आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडे आता ‘आपत्ती व्यवस्थापन’ या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.यांची वसई-विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे .प्रेरणा देशभ्रतार यांची राज्य कर सहआयुक्त पदावरून आता मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१९९५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील त्यांच्या कामाचा अनुभव आणि प्रशासकीय पकड पाहता, मुंबईच्या विकासकामांना गती देण्यासाठी सरकारने त्यांच्यावर हा विश्वास टाकल्याचे म्हटले जाते आहे. मुंबईच्या नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने त्यांची येथील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

२००५ च्या बॅचचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन’ आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तींचे संकट पाहता, अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीच्या अधिकाऱ्याची या पदावर गरज होती. मुंढे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला येणाऱ्या काळात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या नियोजनात मिळेल, असे कारण दिले जाते आहे.

लोकेश चंद्र मुख्यमंत्र्यांचे नवे अप्पर मुख्य सचिव

१९९३ च्या बॅचचे अधिकारी आणि ‘महावितरण’चे (MSEDCL) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती आता मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या जागेवर आता ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाची धुरा सांभाळतील.

विकासचंद्र रस्तोगी (१९९५): अप्पर मुख्य सचिव (कृषी) वरून आता वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली.

विनिता वैद सिंघल (१९९६): प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) वरून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती.

परिमल सिंग (२००४): ‘पोकरा’ प्रकल्पाचे संचालक आता कृषी विभागाचे सचिव असतील.

लाहू माळी: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबईचा चौथा दीक्षांत समारंभ दिमाखात संपन्न

शैक्षणिक गुणवत्ता, परिश्रम आणि यशाचा गौरव

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या (MNLU Mumbai) शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज नोंदवला गेला. प्रभादेवी, मुंबई येथील ऐतिहासिक रवींद्र नाट्यमंदिरात विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या समारंभाला मान्यवर, पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी शिक्षणातील आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गानाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात औपचारिकता, गांभीर्य, राष्ट्रभावना आणि प्रादेशिक अभिमान यांचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर MNLU मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी स्वागतपर भाषणासह विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. आपल्या भाषणात त्यांनी मागील वर्षभरातील विद्यापीठाची शैक्षणिक प्रगती, संशोधन क्षेत्रातील योगदान आणि संस्थात्मक वाढ यांचा सविस्तर आढावा मांडला.

या दीक्षांत समारंभाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा MNLU मुंबईचे कुलपती मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी दीक्षांत भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा. सौ. न्यायमूर्ती भारती डांगरे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. न्यायमूर्ती संदीप मारणे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता मा. डॉ. मिलिंद साठे, इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च (IIULER), गोवा चे कुलगुरू प्रा. (डॉ.) आर. वेंकट राव, प्रा. (डॉ) प्रवीणा खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विभाग, RTM नागपूर, तसेच MNLU मुंबई चे कुलसचिव मा. प्रा. (डॉ.) श्री. प्रकाश चौधरी हेही मान्यवर उपस्थित होते.

समारंभाच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी केली. त्यानंतर दिवसातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या क्षणाला सुरुवात झाली – पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्याच्या सोहळ्याला

२५५ विद्यार्थ्यांना पदवी; विविध अभ्यासक्रमांतील गुणवंतांचा पदकांनी गौरव

पदवी प्रदान सत्रात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण २५५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (PhD) मधील ३ विद्यार्थी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील १३३ विद्यार्थ्यांत एल. एल. एम. एम. ए. मेडिएशन आणि एमबीए या अभ्यासक्रमांचा समावेश होता. तसेच बी. ए. एलएल.बी. (ऑनर्स) या अभ्यासक्रमातील ११९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. याशिवाय सर्व अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदकेही प्रदान करण्यात आली.

अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, कठोर शैक्षणिक अभ्यास, मूट कोर्टमधील सहभाग आणि विधी संशोधनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव पुकारले जाता सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि त्या क्षणाने समारंभाला विशेष भावनिक उंची प्राप्त झाली.

विविध बॅचमधील शैक्षणिकदृष्ट्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यापीठाच्या मूल्यपरंपरेला अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशातून विधी शिक्षणातील उत्कृष्टतेला चालना देण्याच्या MNLU मुंबईच्या बांधिलकीची प्रभावी प्रचिती आली.

दीक्षांत भाषणातून प्रेरणा, मूल्ये आणि जबाबदारीचा संदेश

MNLU मुंबई चे कुलपती मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे, न्यायाधीश, भारताचे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या दीक्षांत भाषणात न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्धरणाचा दाखला देऊन म्हणाले की, संविधानिक नैतिकता ही निसर्ग दत्त नसून तिचे रोपण आणि सिंचन करावे लागते. वकील म्हणून केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसून संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता या मूल्यांनाही तितकेच महत्त्व आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणे ही प्रत्येक विधिज्ञाची मूलभूत बांधिलकी असली पाहिजे, असेही ते म्हणाले, शिक्षण विद्यार्थ्यांना विचारशक्ती आणि तर्कशक्ती प्रदान करते; मात्र बाह्यजगतातील अनुभव त्यांच्या व्यावहारिक समज अधिक सक्षम आणि परिपक्च करतात, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. तसेच MNLU मुंबई चे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेची दृष्टी, मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. MNLU मुंबईतील विविध संशोधन केंद्रांद्वारे राबविण्यात आलेल्या शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच विद्यापीठातील एकूण प्लेसमेंट्समध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) सहकार्याने तयार करण्यात आलेल्या इंटर्नशिप अहवालाच्या प्रकाशनातून त्याचे ठोस प्रतिबिंब दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.

समारोपाच्या सत्रात कुलपतींनी दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रीय गानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अशा रीतीने शैक्षणिक अभिमान, औपचारिकता, प्रेरणा आणि संस्मरणीय क्षणांनी नटलेला हा समारंभ उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल, अशा वातावरणात संपन्न झाला.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन

एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा; ठरले महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) डेटा सायन्स कौन्सिल ऑफ अमेरिका (DASCA) यांचे मानांकन प्राप्त झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मानांकनासह विविध एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी ‘डास्का’ मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान ‘एमआयटी-एडीटी’ला मिळाला आहे.

हे मानांकन ११ पदवी, ३ पदव्युत्तर तसेच पीएच.डी. स्तरावरील संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान या शाखेतील अभ्यासक्रमांना प्रदान करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन आणि इंटेलिजंट सिस्टिम्स या आधुनिक डेटा सायन्स व एआयच्या मूलभूत तंत्रज्ञान क्षेत्रांचा यात समावेश आहे.

‘डास्का’ मानांकन जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगाभिमुखतेशी सुसंगतता सिद्ध करणाऱ्या संस्थांनाच प्रदान केले जाते. हे मानांकन डेटा-आधारित अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शिक्षण देणाऱ्या जागतिक स्तरावरील संस्थांना बहाल केले जाते.

या मानांकनामुळे डास्काच्या ‘वर्ल्ड डेटा सायन्स अँड एआय इनिशिएटिव्ह’ (डब्ल्यूडीएसएआय) अंतर्गत जागतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यापीठाला मिळणार असून, प्राध्यापक प्रशिक्षण, संशोधन सहकार्य आणि सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेस चालना मिळणार आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यापीठाच्या या जागतिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समन्वय साधणारी शिक्षण व्यवस्था उभारण्याचा एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्याधिष्ठित शिक्षण पुरविण्याचा आमचा मानस असून, डास्का मानांकनामुळे त्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी ही कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे प्रतीक असून, मिळालेले हे मानांकन सन्मानासोबतच जबाबदारी वाढविणारे देखील असल्याचे नमूद केले.

या मानांकनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एनईपी, रँकिंग व मानांकन अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. गणेश पाठक, डॉ. श्रद्धा फणसळकर आणि डॉ. राकेश सिद्धेश्वर यांचे विद्यापीठ व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड: 45 वर्षांपासून विश्वासार्ह; पिढ्यां, पिढ्यांसाठी तयार केलेले

स्वर्गीय श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया यांनी 1981 मध्ये स्थापन केलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गौरवशाली प्रवासाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्जची भारतातील पहिली आणि एकमेव बॅकवर्ड-इंटिग्रेटेड उत्पादक म्हणून आज ही कंपनी ओळखली जाते.

पीव्हीसी रेझिनची मागणी आणि पुरवठा यांमधील वाढती तफावत ओळखून,  छाब्रिया यांनी दूरदृष्टीने 1994 मध्ये बॅकवर्ड इंटिग्रेशन पीव्हीसी रेझिन प्लांट आणि भारतातील अशा प्रकारची पहिली ओपन-सी क्रायोजेनिक जेट्टी कार्यान्वित केली. यामुळे रेझिनपासून ते तयार उत्पादनांपर्यंत एका संपूर्ण सर्वसमावेशक  उत्पादन प्रणालीचा पाया घातला गेला, ज्यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता निश्चित झाली आणि एक मजबूत, शाश्वत स्पर्धात्मक फायदा झाला, जो आजही कंपनीच्या मजबूत स्थानाचा आधार आहे.

या भक्कम पायावर उभारलेल्या, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ची आजची उलाढाल ₹4,000 कोटींहून अधिक आहे. विशालता, लवचिकता आणि गुणवत्तेवर असलेला कंपनीचा सातत्यपूर्ण भर अधोरेखित करते. गेल्या साडेचार दशकांमध्ये, या कंपनीने भारतातील पीव्हीसी (PVC) पाईप्स आणि फिटिंग्जच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक म्हणून आपली वाटचाल केली आहे. कंपनीची स्थापित उत्पादन क्षमता वर्षाला सुमारे पाच लाख मेट्रिक टन इतकी आहे आणि तिचे वितरण जाळे अत्यंत व्यापक आहे—ज्यामध्ये 700 हून अधिक विशेष वितरक आणि 35,000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचा समावेश आहे. याच बळावर कंपनीने संपूर्ण भारतभर आपले भक्कम अस्तित्व निर्माण केले आहे. फिनोलेक्सची सुरुवातीची वाढ ही भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेशी जवळून जोडलेली होती—आणि कंपनी आजही शेतकरी समुदायाची मनापासून ऋणी आहे, कारण त्यांच्याच विश्वासाने कंपनीच्या या प्रवासाचा पाया रचला होता—तरीही आज कंपनीच्या उत्पादनांची श्रेणी कृषी क्षेत्रासोबतच प्लंबिंग आणि स्वच्छता क्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. हे विस्तारलेले स्वरूप कंपनीचे एका बहुआयामी आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या संस्थेमध्ये झालेले उत्क्रांती-रूपांतर स्पष्टपणे दर्शवते.

या महत्त्वपूर्ण टप्प्याविषयी कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया म्हणाले:

“गेल्या अनेक वर्षात, आम्ही उद्योगातील विविध चढ-उतारांचा सामना केला आहे; आणि या प्रत्येक अनुभवाने शिस्त तसेच मूलभूत तत्त्वांवरील आमचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आमचा दृष्टिकोन नेहमीच दीर्घकालीन उभारणीचा राहिला आहे, ज्याचा पाया गुणवत्ता आणि विश्वासावर रचलेला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर, मी आमच्या ‘फिनोलेक्स परिवारा’चे, विक्रेत्यांचे, पुरवठादारांचे, ग्राहकांचे, संस्थात्मक भागधारकांचे, बँकिंग भागीदारांचे, समभागधारकांचे, संचालक मंडळाचे, धोरणकर्त्यांचे आणि सरकारी संस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो—आमच्या या प्रवासाला आकार देण्यात या सर्वांनीच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”

व्यवस्थापकीय संचालक उदीप्त अग्रवाल यांनी पुढे सांगितले:

“व्यापक आर्थिक आणि वस्तूंच्या चक्रांशी जवळून जोडलेल्या या क्षेत्रात, लवचिक आणि संयमित राहणे हीच आमची प्राथमिकता आहे. वाढीबाबत शिस्तबद्ध दृष्टिकोन कायम राखत असतानाच, बाजारातील घडामोडींशी सुसंगत असे आमचे निर्णय घेणे आम्ही सुरूच ठेवू.”

केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता, फिनोलेक्स सुरुवातीपासूनच समाजात अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे. भारतात ‘कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी’ ही कायदेशीर आवश्यकता बनण्यापूर्वीच, या कंपनीने समुदाय विकासात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती; शिक्षणाची आणि आरोग्यसेवेची उपलब्धता हे मूलभूत मानवाधिकार आहेत, हा संस्थापकांचा दृढ विश्वास यासाठी त्यांना मार्गदशक ठरला. हीच दूरदृष्टी पुढे नेत, ‘मुकुल माधव फाउंडेशन’—जे 2014 पासून फिनोलेक्सचे CSR भागीदार आहे—भारत सरकारने निश्चित केलेल्या 16 प्रमुख क्षेत्रांपैकी 15 क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तसेच, हे फाउंडेशन संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या सर्व 17 उद्दिष्टांमध्ये योगदान देत असून, त्याचा देशभरातील विविध समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडतो आहे.


“प्रवर्तक कुटुंबाच्या पुढील पिढीचेज्यांचे नेतृत्व श्रीमती गायत्री प्रकाश छाब्रिया करत आहेतहा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतयात जागतिक दर्जाची उत्पादने पुरवणेभारताची पायाभूत सुविधा बळकट करणे आणि शाश्वत तसेच सामाजिक विकासासाठी भागीदारी करणे यांचा समावेश आहे. एकत्रितपणे45 वर्षांच्या विश्वासावर आधारित ही वाटचाल आम्ही भावी पिढ्यांसाठीही अविरतपणे पुढे नेत राहू.”

भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…. जय बोलो महावीर की, जय  बोलो महावीर की’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ असा जयघोष करीत श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. ३१) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.

श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्र्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्र्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, कार्याध्यक्ष प्रकाश धारीवाल, महावीर कटारिया, सुधीर शहा, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, कोषाध्यक्ष समीर जैन, सह कोषाध्यक्ष अल्पेश गोगरी, प्रचार प्रमुख नितीन जैन, सल्लागार सुनिल कटारिया, हरेश शहा, विजयकांत कोठारी, सुधीर शहा, अल्पेश गोगरी, भरत सुराणा, जिनेंद्र कावेडिया, विनोद सोलंकी, संजय ओस्तवाल, प्रमोद छाजेड, अनिल नहार, प्रविण सोलंकी, सत्यजीत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत शोभायात्रेला सुरुवात झाली. आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. शोभा यात्रेत पुण्यातील जैन मंदिरांचे एकूण २० रथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित विविध आकर्षक देखावे मांडण्यात आले होते. भगवान महावीर यांनी दर्शविलेली जीवनसूत्रे, सिद्धांत जीवंत देखाव्यांद्वारे सादर करण्यात आले. श्री क्षत्रिय घाँची समाज ट्रस्टच्या सदस्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरत भगवान महावीर यांच्या नावाचा जयघोष केला. आत्मसंरक्षणाचे धडे देणारे लाठ्या-काठ्या, दाणपट्टा याची प्रात्यक्षिके लहान मुलांनी सादर केली. या शोभायात्रेत पारंपरिक सनई-चौघड्याचे वादन तसेच ढोलताशा पथकांचाही सहभाग होता.

जैन बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हन लव्हज्‌‍ चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले जैन साधू-साध्वींचे दर्शन आमदार हेमंत रासने, रमेश बागवे, प्रवीण चोरबेले, ॲड. अभय छाजेड, अजय खेडेकर यांच्यासह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी घेतले.

भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त दरवर्षी युवकांची दुचाकी रॅली काढण्यात येते. परंतु या वर्षी पेट्रोल टंचाई सदृश्य स्थिती बघता दुचाकी रॅली रद्द करून सामाजिक भान जपल्याचे सांगण्यात आले.

७१ टक्के भारतीयांची घरातील लिव्हिंग रुमला सर्वाधिक पसंती

 इंटेरियो बाय गोदरेजच्या मोमेंट्स दॅट मॅटर हा अहवाल प्रसिद्ध

~दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई आणि अहमदाबाद या आठ प्रमुख शहरांतील ग्राहकांचे आपल्या घरातील प्रत्येक भागाबद्दलचे मत ‘मोंमेंट्स दॅट मॅटर’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पुणे-: गोदरेज एंटरप्रायझेस समूहातील एक अग्रगण्य फर्निचर ब्रँडइंटेरियो बाय गोदरेजने आज भारतीय ग्राहकांचे घरातील तसेच कार्यालयातील मानसिक आरोग्यपरस्पर संबंध आणि आरामदायी जीवनशैली या तीन प्रमुख मुद्द्यांवर आधारित मोमेंट्स दॅट मॅटर नावाचा विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. रोजच्या दिनश्चर्येचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या जागांवर भारतीयांच्या झोपेच्या सवयीस्वयंपाक करणे, स्वतःला दिला जाणारा अमूल्य वेळ या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मोमेंट्स दॅट मॅटर या अहवालाबाबत इंटेरियो बाय गोदरेजच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख डॉ. देव नारायण यांनी माहिती दिली. ते म्हणाले,” ‘मोमेंट्स दॅट मॅटर हा केवळ संशोधनात्मक अहवाल नसूनया अभ्यासात भारतीय ग्राहकांचा आपल्या घराच्या आणि कामाच्या ठिकाणाच्या रचनेचा दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. ते या जागा भविष्यात कसे पाहतातयाची माहिती देण्यात आली आहे. आजच्या धावत्या जगातघरे आणि कार्यालये केवळ भौतिक वास्तू म्हणून मर्यादित राहिलेली नाहीत. ही ठिकाणे उत्तम आरोग्यपरस्पर संबंध आणि स्वतःला व्य्क्त करण्याची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. या अभ्यासातून आम्ही भारतीयांचे त्यांच्या राहणीमानाशी बदलत जाणारे नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमची ही वचनबद्धता या अभ्यासातून अधोरेखित होते. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन अनुभवामध्ये आमच्या फर्निचरची मोलाची साथ मिळेल. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण अधिक समृद्ध होतील. आमच्या ग्राहकांच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडवणून आणणे हे आमचे ध्येय आहे.

आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त जीवनशैलीत भारतीय ग्राहकांसाठी आपले घर भावनिक आधारस्तंभ असते. अनेकांना घरातून आपलेपणा मिळतो. धावत्या जीवनशैलीतही संतुलन राखता येतेअसा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आला आहे. घरातील बेडरुम हा प्रत्येकासाठी भावनिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा कोपरा असतो. अहवालातील ९० टक्के माणसांनी बेडरुम हे आराम आणि विश्रांतीसाठी तसेच ताजेतवाने होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. स्वतःच्या बेडवर झोपणे हे घरात व्यतीत केलेल्या आनंदाच्या क्षणांपैकी मौल्यवान क्षण असल्याचे मत ५४ टक्के लोकांनी व्यक्त केले.

घरातील स्वयंपाकघराविषयीही अनेकांनी मते मांडली. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसूनभावनिक आधार देणारी जागा असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. घरात एकट्याने किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत स्वयंपाक करणे हे मानसिक शांतता देण्यासहपरस्परांशी जवळीक साधण्यात मदत करतेअसे ९७ टक्के लोकांनी सांगितले. अनेकांच्या मतेलिव्हिंग रुमडायनिंग रुम हे घरातील सामाजिक केंद्र असूनयेथे गप्पागोष्टी आणि हास्यविनोद घडतात. या भागांत कुटुंबातील सदस्ये एकमेकांशी जोडले जातात.

शहरांतील घरांमध्ये बाल्कनी आता केवळ मोकळ्या जागेपुरती मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. अनेकांना बाल्कनीमध्ये शांतता लाभते, असा मुद्दा या अभ्यासातून मांडण्यात आला आहे. शहरातील धावत्या जीवनशैलीतून निवांत विरंगुळा हवा असल्यास बाल्कनी कामी येते, असे चारपैकी ३ सदस्यांचे मत आहे. ही जागा मनःशांती आणि जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देते. ५३ टक्के लोकांच्या मते, बाल्कनीतील सकाळचे क्षण शांततेने दिवसाची सुरुवात करण्यासाठी मदत करतात. या ठिकाणी सकाळी वेळ व्यतीत केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते.

राज्यात मेघगर्जना , वीजांचा कडकडाट ,वादळी वारे , गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता

🌦️ कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्य
कालावधी: 31 मार्च ते 3 एप्रिल 2026
आधारित स्रोत: IMD प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व नागपूर
हवामान सारांश
राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना ⛈️, वीजांचा कडकडाट 🌩️, वादळी वारे 🌪️, गारपीट 🌨️ व हलका ते मध्यम पाऊस🌧️होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे.

📅 31 मार्च
(⚠️ अलर्ट: ऑरेंज अलर्ट🟠)
⛈️🌨️गारपीट + मेघगर्जना + 🌩️ वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
⛈️मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 १ एप्रिल
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
⛈️ मेघगर्जना + 🌩️वीजांचा कडकडाट + 🌪️वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 2 एप्रिल
(⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
🌧️मेघगर्जनेसह पावसाची शक्यता+ जोरदार वारे🌪️
• सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली.
• उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

📅 3 एप्रिल (⚠️ अलर्ट: यलो अलर्ट 🟡)
🌧️ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता + जोरदार वारे
• जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

📢 सामान्य सल्ला
• मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे.
• शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे.
• वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत.
• शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात.

🌾 रबी पिके (काढणी अवस्था)
सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.
• काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे.
• पुढील २४ तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
• शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे.
• ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

🍇 द्राक्ष
• ज्या बागांमध्ये द्राक्ष काढणीच्या अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. अशा मण्यांमध्ये पुढे बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. पाऊस पडल्यानंतर दुपारच्या वेळेस चांगले ऊन पडून बागेत बऱ्यापैकी वारे वाहत असल्यास क्रॅकिंगचा धोका राहत नाही. काहीही करण्याची गरज नाही. क्रॅकिंगचा धोका जास्त वाटल्यास घडांवर कायटोसॅन ३ मि.ली. अधिक ट्रायकोडर्मा २.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारावे.
• बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्यास द्राक्ष वेलींची वाढ मंदावते. त्यामुळे बागेत पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
• द्राक्ष घडांचे गारापासून संरक्षणासाठी शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.
• पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास बेदाणे पावसाच्या पाण्याने भिजू शकतात व त्यामुळे त्यांची प्रत खराब होऊन नुकसान होऊ शकते. द्राक्षांपासून बेदाणे तयार करणाऱ्या शेड मध्ये पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून शेड झाकून घ्यावे. पावसाचे पाणी बेदाणे शेड मध्ये आल्यास त्वरित बाहेर काढावे जेणे करून शेडमधील आर्द्रता वाढणार नाही.

🥭 आंबा
• केऱ्या तसेच पक्व होत असलेल्या आंबा फळांना इजा होऊन फळे खराब होऊ शकतात त्यांची प्रत खालावू शकते. पावसापासून बचावासाठी पक्व झालेल्या आंबा फळांची त्वरित काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
• आंब्याच्या आकाराच्या फळांना फक्त माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळगळ झालेली असल्यास पहिली फळे गोळा करून नष्ट करावीत व दररोज फळ माशी सापळे @ २ प्रति एकर या प्रमाणात लावावेत. आकर्षणासाठी हायड्रोलायझेट प्रोटीनचा वापर करावा.

🍌केळी
• जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने केळी झाडे उन्मळून पडू नये म्हणून केळी झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.
• गारांची शक्यता असल्याने शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.

🥬भाजीपाला पिके
• गारपीट आणि पावसाची व जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्याने, वेलवर्गीय भाज्यांना आधार द्यावा जेणेकरून वारा आणि पावसामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. शक्य असल्यास उघड्यावर असलेली रोपवाटिका प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावी. शक्य असल्यास हेलनेटचा वापर करावा.

🐄 पशुधन
• वीजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरे झाडाखाली किंवा धातूच्या कुंपणाजवळ बांधू नयेत.
• जनावरे शक्यतो बाहेर चरावयास नेऊ नयेत.

🌩️शेतात असताना जर मेघ गर्जना होत असेल तर काय करावे काय करू नये
काय करावे
➤ मेघगर्जना व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने फळबागांना व भाजी पाला पिकाला आधार द्यावा.
➤ जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परिसरातील सर्वात उंच वस्तू टाळून जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दड घालून बसावे (आपले पाय पोटाशी धरून बसावे).
➤ मेघ गर्जना होत असल्यास झाडाखाली उभे राहू नये.
➤ प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा विहिरीपासून दूर ठेवावे.
➤ प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूच्या शेतीच्या उपकरणापासून दूर ठेवावे
➤ शेतातील उभ्या पिकामधून अतिरिक्त पावसाचे पाणी काढून टाकावे.
➤ जर शेतातील पिक / उत्पादन शेतात राहिले असल्यास पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे.

हे करू नका
➤ विद्युत उपकरण किंवा वायर/केबल यांचा संपर्क टाळा.
➤ कोणत्याही धातू ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुकाचीचा संपर्क दूर ठेवा जे धातू वा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत.
➤ आपल्या प्राण्यांना झाडाखाली जाऊ देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

📩 संदेश
दिनांक 31 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे गारपीट व वादळी पावसाचा धोका जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत व पिकांचे संरक्षण करावे.

ना.दे.कृ.सं.प्र., मुंबई

कौशल्य विकासाचे नवीन युग: मंत्री  चंद्रकांतदादा पाटील

फ्युएल-एनएसई बेल रिंगिंग सोहळ्यात ‘कमवा आणि शिका’ मुलींसाठी विद्यावेतन जाहीर करण्याचा विचार

पुणे: नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE), मुंबई येथे फ्युएल’ (Friends Union for Energising Lives) संस्थेचा  सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) प्लॅटफॉर्मवरील सूचीकरणाचा (Listing) ‘बेल रिंगिंग’ सोहळा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा  पाटील व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान, फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे आणि कॅपजेमिनीचे अनुराग प्रताप उपस्थित होते.

या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  ४० मुलींसाठी फ्यूल च्या ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून शासनातर्फे महाराष्टातील विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल यांच्यातील ही भागीदारी महाराष्ट्रातील गरजू मुलींसाठी मोफत शिक्षणाची दारे उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा मिळाल्यावर  ते स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करतात. आम्ही कौशल्य आणि शिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यात फ्यूल स्किल टेक यूनिवर्सिटीच्या सहाय्याने हजारो कोशल्याने परिपूर्ण विद्यार्थी तयार होतील.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फ्युएलचे कौतुक करताना सांगितले की कौशल्य विकास आणि शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील मार्गदर्शक म्हणून फ्युएल स्किल्स टेक यूनिवर्सिटी नावारूपाला येईल. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फ्यूल आता स्किल टेक यूनिवर्सिटी म्हणून सुरू होईल. आजच्या एनएसई लिस्टिंगमुळे मुलीच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

आशिष कुमार चौहान यांनी सांगितले की, फ्युएलने एसएसई प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे ९९ लाख रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. सामाजिक गुंतवणुकीच्या लोकशाहीकरणावर भर देताना त्यांनी नमूद केले की, या निधीपैकी ३७% वाटा किरकोळ देणगीदारांचा (Retail Donors) आहे. एनएसई प्लॅटफॉर्म आता देशातील ९९.८५% पिन कोडपर्यंत पोहोचला असून सामान्य नागरिकांनाही सामाजिक बदलात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या फ्युएलच्या प्रवासापासून ते आता स्किल टेक युनिव्हर्सिटी होण्यापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण आणि रोजगार यातील दरी कमी करण्यासाठी सेंजेटटा आणि Global Capability Centers (GCC) सोबत नवीन धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. भविष्यात शंभर कोटी चा इशू आणणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचे ध्येय आहे.

मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली-

कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन आणि बांधणी केलेल्या अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी आठ जहाजांपैकी, चौथ्या जहाजाचे आज नौदलाकडे हस्तांतरण केले. जीआरएसई, कोलकाताने अशा प्रकारच्या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी जहाजांची ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ (IRS) च्या नियमांनुसार रचना आणि बांधणी केली असून यामधून ज्यामधून स्वदेशी संरक्षण जहाजबांधणीचे यश अधोरेखित होत आहे.77 मीटर लांबीच्या या युद्धनौका भारतीय नौदलातील वॉटरजेट तंत्रज्ञानाने संचार करणाऱ्या सर्वात मोठ्या युद्धनौका आहेत. वजनाने हलके असलेले अत्याधुनिक पाणतीर(टॉर्पेडो), स्वदेशी बनावटीचे रॉकेट लॉन्चर्स आणि उथळ पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेणारी सोनार यंत्रणा यांनी त्या सुसज्ज आहेत. यामुळे पाण्याखालील पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा वेध घेऊन या धोक्यापासून प्रभावी पद्धतीने संरक्षण करणे शक्य होणार आहे. या युद्धनौकांच्या  समावेशामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी आणि पाणसुरुंग आधारित युद्धक्षमतांमध्ये, तसेच किनारपट्टीवरील टेहळणीच्या क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.  

ही युद्धनौका म्हणजे पूर्वीच्या 1241 पीई श्रेणीतील आयएनएस अग्रय गस्ती नौकेची सुधारित आवृत्ती आहे, जी नौका 2017 मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. यामुळे आपल्या उल्लेखनीय युद्धनौकांच्या नावांचा वारसा जपण्याची नौदलाची परंपरा पुढे सुरू राहिली आहे.  

अग्रयचा मिळालेला ताबा हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार, यामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज देशांतर्गत संरक्षण उत्पादन व्यवस्थेची वाढती ताकद आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा दाखला आहे.

जगातील सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा एक एप्रिल 2026 पासून होणार सुरू

देशभरातील जनगणतेत 30 लाखांहून अधिक जनगणना कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी असतील

नवी दिल्‍ली-

भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज नवी दिल्ली इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘जनगणना-2027’ संदर्भात माहिती दिली. जगातील ही सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यांत होणार असून याचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. ही जनगणना पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. तसेच नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याचा पर्यायही प्रथमच उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, एनडीएमसी आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोरम, ओडिशा आणि सिक्कीम या ठिकाणी एक  ते 15 एप्रिल या कालावधीत ‘स्व-नोंदणी’ आणि 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीत ‘घर-यादी आणि गृहगणना’ केली जाईल. महाराष्ट्रात स्व-गणनेचा पहिला टप्पा एक ते 15 मे आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान होणार आहे.भारताची जनगणना ‘जनगणना अधिनियम, 1948’ आणि ‘जनगणना नियम, 1990’ (ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत) यांच्या तरतुदींनुसार घेतली जाते. भारताची शेवटची जनगणना 2011 मध्ये पार पडली होती. जनगणना 2027 ही या मालिकेतील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असेल.

2027 ची जनगणना घेण्याचा शासनाचा उद्देश 16 जून 2025 रोजी ‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये अधिसूचित करण्यात आला आहे. 2027 च्या जनगणनेची संदर्भ तारीख 1 मार्च 2027 रोजी 00:00 वाजता आहे, (लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी तसेच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील व उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बर्फाच्छादित व विषमकालिक अशा क्षेत्रांसाठी ही संदर्भ तारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी 00:00 वाजता असेल).

जनगणना 2027 ही दोन टप्प्यांत पार पडेल;  त्यापैकी पहिला टप्पा म्हणजे ‘घर-यादी आणि गृहगणना’ —जो सर्वसाधारणपणे ‘एच एल ओ’ म्हणूनही ओळखला जातो. हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या सोयीनुसार 30 दिवसांच्या कालावधीत राबवला जाईल. यासोबतच, घरोघरी जाऊन यादी करण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीच्या अगदी आधी 15 दिवसांचा ‘स्वयं-गणना’ करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. या टप्प्यामध्ये घरांची स्थिती, कुटुंबाला उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेविषयीची माहिती संकलित केली जाईल. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्न जानेवारी 2026 मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

या मोहिमेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरु होईल, त्यावेळी, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (पीई) करण्यात येईल (केंद्रशासित प्रदेश लडाख तसेच जम्मू आणि काश्मीरची बर्फाच्छादित विषमकालिक क्षेत्रे तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा सप्टेंबर 2026 मध्ये राबवला जाईल.) सीसीपीएच्या निर्णयानुसार, जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातींची देखील मोजणी करण्यात येईल. या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक, स्थलांतरसंबंधी, प्रजननसंबंधी, इत्यादी घटकांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीकडून माहिती संकलित केली जाईल. या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या नक्की तारखा तसेच विचारण्यात येणारे प्रश्न याविषयी येत्या काळात सूचित करण्यात येईल.  

जनगणना अधिकाऱ्यांचे मानधन तसेच त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स पाठबळ इत्यादी पुरवण्याच्या दृष्टीने पुरेशी तरतूद व्हावी म्हणून केंद्र सरकारने जनगणना 2027 साठी 11,718.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

डिजिटल मार्गांच्या माध्यमातून जनगणना 2027 मोहिम राबवली जाणार आहे. संकलन कर्मचारी  त्याचा/तिचा स्वतःचा मोबाईल फोन वापरून, मोबाईल अॅपच्या माध्यमातून थेटपणे माहिती संकलित करून सादर करेल. याशिवाय, दोन्ही टप्प्यांमध्ये स्वयं-गणनेसाठी ऑनलाईन तरतूद करण्यात आलेली आहे. हे मोबाईल अॅप तसेच स्वयं-गणना पोर्टल, हिंदी तसेच इंग्रजीसह 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल. जनगणनेशी संबंधित विविध क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच निरीक्षणासाठी एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. माहितीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  

स्वयं-गणनेसाठी, लोक त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर मुलभूत तपशील वापरून एसई पोर्टलमध्ये लॉगिन करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार जणगणनेचे वेळापत्रक पूर्ण करू शकतात. माहिती यशस्वीपणे जमा केल्यानंतर, एक विशेष स्वयं-गणना ओळख क्रमांक (एसई आयडी) मिळेल जो क्षेत्र-भेटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागेल. स्वयं-गणनेमुळे नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या भेटीपूर्वीच स्वतःच्या सोयीनुसार माहिती भरण्याची सुविधा असेल. यापूर्वीच्या जनगणनेप्रमाणेच संकलक त्यांना नेमून दिलेल्या विभागांमध्ये घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करणे सुरूच ठेवतील, त्याचबरोबर स्वयं-गणना ही नागरिकांना यावेळी देण्यात आलेली अतिरिक्त सुविधा असेल.

दिनांक 01 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी इतर सर्व प्रशासकीय कामे गोठवण्यात आली आहेत. दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी उपलब्ध माहितीनुसार देशातील 36 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश, 7,092 उपजिल्हे, 5,128 वैधानिक शहरे, 4,580 गणना नगरे तसेच सुमारे 6,39,902 गावांमध्ये जनगणना 2027 मोहिम  राबवण्यात येईल.  

गणना अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या विषय तज्ञांनी सुमारे 2000 मास्टर प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांच्याकडून 1000 राष्ट्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात करण्यात आले आहे. हे मास्टर प्रशिक्षक 45000 क्षेत्र प्रशिक्षकांना प्रशिक्षण देत असून हे क्षेत्र प्रशिक्षक 31 लाख प्रगणक तसेच पर्यवेक्षकांनासुमारे 80 हजार तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देत आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणाऱ्या आपल्या क्षेत्रसैनिकांना, प्रगणकांना आणि पर्यवेक्षकांना कालबद्ध पद्धतीने गुणवत्तापूर्ण माहिती संकलित करण्यात कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सर्व संभाव्य प्रशिक्षण साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.