Home Blog Page 49

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन– मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 1 : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बाल्दी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईत स्पोर्ट्स सिटीच्या प्रस्तावित क्षेत्रामध्ये स्टेडियम उभारणीचा पर्यायही विचाराधीन असून, त्या ठिकाणी सुमारे 50 टक्के जमीन आधीच संपादित झालेली आहे. उर्वरित जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मंत्री अँड.शेलार यांनी दिले. स्टेडियमसाठी सुमारे 40 एकर जागा आणि इतर पूरक सुविधांसाठी अतिरिक्त 30 एकर जागेची आवश्यकता भासू शकते, असा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याबरोबरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. मात्र, त्यापूर्वी जागेचे निश्चितीकरण आणि मूलभूत नियोजन पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

दरम्यान, या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत प्राथमिक अहवाल सादर करून त्यानंतर पुनरावलोकन बैठक घेण्यात येणार आहे. स्टेडियम प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

१८०० कोटीचा महसूल बुडवून ३६०० किलोमीटर केबलचे बेकायदा जाळे पुणेकरांच्या डोक्यावर:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले ऍक्शन मोड वर..

अनधिकृत ओव्हरहेड केबल्स विरोधात महापालिकेची आजपासून धडक कारवाई

पुणे, दि. १ : स्वतंत्र पथकांची स्थापना करून शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटविण्याची धडक मोहीम महापालिकेने आजपासून सुरू केली.विशेषतः गायरोप केबल्स आणि विविध टेलिफोन कंपन्यांच्या केबल्स अनियमित पद्धतीने टाकल्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित झाले असून, जीवित हानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही कारवाई करत असून, ती दर आठवड्याला विविध भागात राबविले जाईल अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महानगरपालिकेचा विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून आज पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरातील अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर भिमाले पत्रकारांशी बोलत होते.

विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, कार्यकारी अभियंता योगेश माळी, उप अभियंता जयदीप अडसूळ, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी पोटफोडे, सहाय्यक विभागीय अधिकारी विजय भिलारे, स्टेशन ऑफिसर प्रभाकर उमरकर, समीर शेख, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

भिमाले म्हणाले, “नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महानगरपालिका क्षेत्रात ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी अनधिकृतपणे खांबांवर केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. शहरातील अनेक रस्ते, तसेच चौक आणि इमारतींवर गुंतागुंतीचे अनधिकृत केबलचे जाळे निर्माण झाले असून, त्यामुळे अपघात झाले आहेत. काही कंपन्या गाईडरोपचा वापर करतात. त्यात ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने प्रवाही विजेचा शॉक बसून मनुष्यहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे या अनधिकृत केबल्सवर टप्प्याटप्प्याने धडक कारवाई केली जाणार आहे.

भिमाले पुढे म्हणाले, केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य करण्यात आलेले आहे. विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेऊन भूमिगत केबलच टाकाव्यात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर पुढील काळात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”

विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, “जानेवारीपासूनच काही भागांतील प्राथमिक कारवाईत आतापर्यंत १२३.६ किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.”

“केबल्सवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत केबल्स मुळे धोका वाढला आहे. त्यामुळे अशा सर्व कंपन्यांनी नियमांचे पालन करून भूमिगत केबल टाकण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शहर अधिक सुंदर आणि सुरक्षित होईल.”

श्रीनाथ भिमाले,
स्थायी समिती अध्यक्ष,
पुणे महानगरपालिका

अशोक खरात प्रकरण:कोणाला अटक करायची हे फडणवीसांच्या मर्जीवर, खरात प्रकरणात शरद पवार गटाचा खळबळजनक आरोप

मुंबई-अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालू नये आणि राजकीय हेतू ठेवू नये, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

विकास लवांडे म्हणाले की, खरात प्रकरणी नेमलेली एसआयटी ही संथ गतीने काम करत आहे. त्यांनी केवळ अशोक खरात आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. संस्थेचे बाकी विश्वस्त अजूनही मोकळेच आहेत. ते फरार होऊ शकतात. एसआयटीने अनेकांना या प्रकरणी आरोपी करणे गरजेचे आहे. माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये असे फोन खरातने तटकरेंना केले होते. तटकरे, चाकणकर यांना बोटाला जखम होते हे सगळं रॅकेट आहे. सिन्नरमध्ये हे सर्व सुरू आहे त्याबद्दल माणिकराव कोकाटेंना बरेच काही माहिती असणार आहेत. कोकाटेंनी सर्व माहिती समोर आणली पाहिजे.

रोहित पवारांचे ट्विट गंभीर

विकास लवांडे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी रोहित पवार यांनी केलेले ट्वि्ट पाहिले तर ते अतिशय गंभीर आहे. ते वाचल्यावर मन सुन्न झाले. गॅगस्टर जसे फुली मारत त्यांच्याविरोधातील एका-एका व्यक्तीला संपवत असतो. कर्मकांडाकडे महाराष्ट्र कधी झुकणार नाही. पण काही लोकांची त्यावर श्रद्धा असते. त्या लोकांनी अजित पवार यांच्या बंगल्यासमोरही काही काळ्या भावल्या टाकल्या होत्या. त्यातीलच काही लोकं इथे होते. कारण अशोक खरात यांच्या मंदिरात रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या. त्यांच्यासोबत सुनील तटकरे तिथे वारंवार जात होते. पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा त्याच काळात सुरू होत्या, हे सर्व सुरू असताना तिथे काय सुरू होते हे चाकणकरांना माहिती असेल त्यांना सहआरोपी केल्यानंतरच याबद्दल माहिती पुढे येईल. अजित पवार नको असलेले कोण लोकं तिथे जात होते याचा शोध घेणं गरजेचे आहे.

विकास लवांडे म्हणाले की, रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करावे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांपूर्वीच मेल केला आहे. याचे कारण असे आहे की, चाकणकर या त्या संस्थेच्या विश्चस्त होत्या. अशोक खरात, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी अनेक आर्थिक व्यवहार सुद्धा केलेले आहेत. ज्यांची संपत्ती रायगडपासून अनेक ठिकाणी आहे. हवाला मार्फत काही व्यवहार झाले आहेत, ते पुढे येऊ शकतात. अनेक महिलांचे शोषण झाले आहे हे एकटा अशोक खरात करू शकतो का प्रश्न अनेकांना पडतो. यामागे एक टीम होतीच. काही पत्रकारांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात होता पण रुपाली चाकणकर यांच्यासह तटकरेंची तिथे उठबस असल्याने हे प्रकरण दाबण्यात येत होते, हे मोठे कांड आहे.

विकास लवांडे म्हणाले की, ताराराणीबद्दल वक्तव्य करणाऱ्या मुनींना भगवान महावीरांचे विचार समजलेले दिसत नाहीत. बुआबाबा खूप तयार होत आहे आणि ते काहीही बरळत असतात. महापुरुष हे समाज हितासाठी काम करत होते ते जातीयवादी नव्हते. अनेक जण जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम करत असतात. सर्वच धर्मांत असे लोकं तयार झाले त्यांचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कसा चालवावा हा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे. रोहित पवारांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पुरावे दिले, म्हणून महायुतीच्या लोकांनी रोहित पवारांवर टीका केली. काही लोकांना अजित पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, म्हणून त्यांनी पक्षाची घटना बदलली. आणि सर्व अधिकार कार्यकारी अध्यक्षांना दिले.

महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा

पुणे -पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागेवर आता तरी महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.

ते म्हणाले,’महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका सेवेतून एक अतिरिक्त आयुक्त पदाची नेमणूक करण्याची तरतूद आहे.पुणे महानगरपालिकेमध्ये तीन अतिरिक्त आयुक्त यांच्या जागा आहेत.दोन अतिरिक्त आयुक्त हे राज्य शासनाकडून नेमणुकीला प्रतिनियुक्तीवर येतात.
एक अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून भरला जातो यापूर्वी ज्ञानेश्वर मोळक, सुरेश जगताप हे यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.मागच्या वेळेला पुणे महानगरपालिकेकडून तीन नावे गेली होती परंतु शासनाने ती मान्य केली नाही आणि ओमप्रकाश दिवटे साहेब यांची नियुक्ती केली.कालच अतिरिक्त आयुक्त इस्टेट पृथ्वीराज बी.पी. यांची बदली केली आहे, यामुळे आम्ही आयुक्त आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की आता रिक्त असणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील या पदावर अधिकारी पात्र असतील त्यांची नेमणूक करावी.


शीला फाटक, सीमा पवार यांचा तपस्या पुरस्काराने गौरव

मूल्यहीनतेच्या काळात मातृशक्तीचा गौरव होणे कौतुकास्पद : गिरीश कुलकर्णी

स्वानंदी क्रिएशन, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे सन्मान सोहळा

पुणे : समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी स्वत:चा लोप करून खंबीरपणे उभे राहणाऱ्या, व्यक्ती आणि समाज एकत्र येण्यासाठी, कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी निरलसपणे कार्य करणाऱ्या मातृशक्तीचा तपस्या पुरस्काराने सन्मान होणे ही अत्यंत देखणी गोष्ट वाटते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.

कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त ‘स्वानंदी क्रिएशन’ पुणे आणि ‘केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे’ ‌‘तपस्या पुरस्काराने’ २००९ पासून सन्मानित करण्यात येते. यंदा प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक, आयटी क्षेत्रात असलेल्या योगेश फाटक यांच्या मातोश्री शीला रत्नाकार फाटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून  सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या सुमित आणि अमित पवार यांच्या मातोश्री सीमा सुभाष पवार यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि हिंदीच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे यांच्या हस्ते आज (दि. ३१) झाले. त्या वेळी गिरीश कुलकर्णी बोलत होते. टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंदी क्रिएशन पुणेच्या अपर्णा केळकर, केळकर गंगोत्री डेव्हलपर्सचे मकरंद केळकर मंचावर होते. रोख रक्कम, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सुरुवातीस प्रास्ताविकात अपर्णा केळकर यांनी तपस्या पुरस्कारामागील भूमिका मांडताना हा पुरस्कार म्हणजे एक कृतज्ञता सोहळा असून कलाकार आणि समाजसेवकामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या, त्यांच्या कार्यात प्रेरणा देणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव आहे. या पुरस्कारातून कुटुंब अधिक जवळ येत आहेत याचा विशेष आनंद असून या जाणिवेची ज्योत तेवत ठेवावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, आजच्या सामाजिक काळात मूल्यहीनता जाणवत असताना, माणसे एकटी पडत असताना, शहरे बकाल होत असताना, कुटुंब पातळीवर संवाद कमी होत असताना खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचे कार्य कौतुकास्पद आहे.  

प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे म्हणाल्या, एखाद्या व्यक्तीचे, कुटुंबाचे यश समाजासमोर लखलखीतपणे जाणवते, पण त्या यशामागे घरातील कुणी एक स्त्री शक्ती खंबीरपणे उभी राहिलेली असते. या व्यक्तीला गृहीत धरले जाते. परंतु तपस्या पुरस्काराच्या माध्यमातून अशा स्त्री शक्तीचे कर्तृत्व हेरून सन्मान केला जातो ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

सत्काराला उत्तर देताना शीला फाटक म्हणाल्या, घरामध्ये सांस्कृतिक वातावरण होते; परंतु कुणी कलेच्या क्षेत्रात कार्यरत नव्हते. निखिलचा तबलावादनाकडे असणारा ओढा, कलागुण लक्षात घेऊन त्याला घरातून कायमच प्रोत्साहन दिले. त्याच्या यशात त्याने केलेल्या मेहनतीचा, गुरूंच्या शिकवणुकीचा मोठा वाटा आहे. सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर माझ्या मनात असलेल्या नवनवीन गोष्टी करण्याच्या इच्छा जिद्दीने पूर्ण करून जीवनाचा रसरशीत आनंद उपभोगत आहे. निखिलला मिळालेली शर्वरीची साथ एकमेकांना पूरक असल्यामुळे दोघांची कलेच्या क्षेत्रातील प्रगती उत्तम आहे, याविषयी आनंद आहे.

आईला मिळालेला तपस्या पुरस्कार हा फक्त तिचा वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व कार्यकर्त्यांच्या घरातील स्त्री शक्तीला समर्पित आहे, अशा भावना सीमा पवार यांचे चिरंजीव सुमित पवार यांनी व्यक्त केल्या.

मान्यवरांचे स्वागत अपर्णा केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे होते तर आभार मकरंद केळकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निखिल फाटक आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी ‘लयाकृती’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना अथर्व कुलकर्णी (संवादिनी), आर्या फणसळकर (पढंत) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सन्मान पंडित सत्यशील देशपांडे, पंडिता मनिषा साठे यांनी केला.

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १: राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणकप्रणालीद्वारे अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी विस्तारकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या चार प्रती तयार करण्यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकारने यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

ऑनलाइन प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्याने तसेच अर्जासोबत जोडवा लागणारा ‘जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्य पडताळणी दाखला’ मिळविण्यासाठी लागणारा कालावधी पाहता क्षेत्रीय स्तरावरून शेतकऱ्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन, कृषी विभागाने ही मुदत १५ दिवसांनी वाढवून दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती.

पुरस्कारांसाठी इच्छुक उमेदवारांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in जाऊन ‘कृषी पुरस्कार’ या टॅबवर आपले प्रस्ताव सादर करायचे आहेत. या डिजिटल प्रणालीमुळे मूल्यांकन आणि अहवाल निर्मितीची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होणार आहे. पात्र शेतकरी आणि संस्थांनी या वाढीव संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी:पत्नी फरार, मुलगा ताब्यात…

नाशिक-भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली. मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत तपासाच्या पुढील टप्प्याला वेगळे वळण दिले आहे. त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.

दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एसआयटीचे पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाली. दुसरीकडे, खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपास पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी होती. खरातकडून अधिक माहिती मिळवून फरार पत्नीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची सखोल चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

याचवेळी एसआयटीने तपासाचा फास अधिक घट्ट करत विविध संबंधितांची चौकशी सुरू ठेवली आहे. खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि संभाव्य गैरव्यवहार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांवर कारवाई, वाढत्या तक्रारी आणि आता मिळालेली न्यायालयीन कोठडी यामुळे अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहेत.

भोंदू खरातच्या 3500 व्हिडिओ लिंक्स व्हायरल:पोलिसांनी सर्व लिंक्स सोशल मिडियावरून हटवल्या; पीडितांना घराबाहेर पडणे झाले अवघड

नाशिक-भोंदू अशोक खरातचे महिलांसोबतचे 3500 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या सर्व व्हिडिओच्या लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी राज्यभरात 100 हून अधिक गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमुळे पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. हे सर्वजण सध्या वर्क फ्रॉम होमवर भर देत असल्याची माहिती एका पीडितेच्या नातेवाईकाने दिली आहे.

भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे. पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरात व पीडित महिलांच्या व्हिडिओच्या तब्बल 3500 लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोलिसांनी या सर्व लिंक्स सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. पण त्यात आणखी काही लिंक्सची भर पडत आहे.

पोलिसांनी लिंक्स व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकसह कोपरगाव, बीड, अहिल्यानगर व राज्यातील इतर जिल्ह्यांत गुन्हे दाखल केलेत. हे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये सामान्य नागरिकांसह सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही विशिष्ट युजर्सचा समावेश आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये असे व्हिडिओ असतील त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी ते व्हिडिओ किंवा लिंक्स तत्काळ डिलिट कराव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर अश्लील किंवा गोपनीय व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे पीडित महिलांना त्रास होत आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, अशोक खरातच्या व्हिडिओचा वेगाने होणारा प्रसार केवळ पीडितांच्या कुटुंबीयांना मानसिक आघातच पोहोचवत नाही, तर संभाव्य साक्षीदारांना पुढे येण्यापासून परावृत्तही करत आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियाच नव्हे तर अश्लील संकेतस्थळांवरही पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मार्चच्या निर्देशांनंतर, प्रशासनाने अशा प्रकारच्या सामग्रीविरोधात कडक कारवाई केली आहे. या संदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एसआयटीच्या माहितीनुसार, हे व्हिडिओ 170 संकेतस्थळांवरून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडिओमुळे अनेक महिलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पीडित महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले आहे; परिणामी, संबंधित महिला आणि त्यांचे कुटुंबीय सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) करत आहेत. एका पीडितेच्या नातेवाईकाने ही गोष्ट सांगितली आहे. पीडितेच्या चुलत भावाने या प्रकरणी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, असे काही घडेल, याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. मी गेल्या 7 दिवसांपासून कार्यालयात जाणे टाळले होते. आता जोपर्यंत हे प्रकरण निवळत नाही तोपर्यंत मी ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी मागितली आहे.

( टीप :असे व्हिडीओ माय मराठी ने कधीही प्रसारित केलेले नाही.करत नाही )

पुण्यातील मॉडेल कॉलनीत खरातच्या मुलीच्या नावावर कॅश व्यवहारातून 3 BHK, 1.20 कोटींचा फ्लॅट

नाशिक- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘24 रत्नम’ या उच्चभ्रू सोसायटीतील सातव्या मजल्यावर सुमारे 1055 चौरस फुटांचा 3 बीएचके फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मालमत्तेमुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

या फ्लॅटच्या खरेदीत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे व्यवहाराची पद्धत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारासाठी संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रुपये पूर्णपणे रोख स्वरूपात देण्यात आले. सेल डीडमध्ये कोणत्याही प्रकारच्या चेक किंवा बँक व्यवहाराचा उल्लेख नसल्याने संशय आणखी वाढला आहे. लोकांना घाबरवून किंवा फसवून पैसे उकळून विविध शहरांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही तपासात पुढे येत आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या उत्पन्न आणि संपत्तीमध्ये मोठा तफावत असल्याचंही उघड झालं आहे. तो आयकर विभागाकडे केवळ सुमारे 12 लाखांचे वार्षिक उत्पन्न दाखवत होता, मात्र प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायातून जीएसटी बुडवल्याचा संशयही आयकर विभागाने व्यक्त केला असून मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर खरातविरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढतच आहे. आज त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी संपत आहे. अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आधीच तीन वेळा कोठडी मिळालेल्या खरातसाठी एसआयटी पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून ती फरार झाली आहे, तर मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी

तपासात सहकार्य न केल्यामुळे आता अशोक खरातची चौकशी त्याच्या मुलासमोरच करण्याची तयारी सुरू आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळवून फरार आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून पुढे आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. आज न्यायालयात सादर होणाऱ्या पुराव्यांमुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई:तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड वसूल, 852 वाहने जप्त

0

पुणे-पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात विशेष मोहीम राबवली. या तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेतून ५१.५४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या तपासणी मोहिमेदरम्यान सर्वाधिक कारवाई दुचाकीस्वारांवर करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच तिघांनी प्रवास करणाऱ्या तब्बल १२६५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आणि बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या ३२० वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३४ सायलेन्सर जप्त केले.

केवळ दंड आकारून न थांबता पोलिसांनी कठोर पावले उचलत मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली. या मोहिमेत एकूण ८५२ वाहने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांना वचक बसावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात, यासाठी ही कारवाई निर्णायक ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध भागांत सुमारे ३० ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान १८६ मद्यपी चालकांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही कारवाई महत्त्वाची ठरली.

या तीन दिवसांच्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार काही लाखांचा दंड आकारण्यात आला असला, तरी एकूण वसुलीचा आकडा तब्बल ५१.५४ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावरून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट होते.

पोलिसांच्या या मोहिमेमागे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. विशेषतः मॉडिफाईड सायलेन्सरमुळे होणारा कर्कश आवाज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होता. त्यामुळे अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेटचा वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे, वाहनात कोणतेही बेकायदेशीर बदल न करणे आणि निर्धारित नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले.

स्मिता हाईट्स रस्त्याच्या कामास प्रारंभ तर कॅनॉल रोड परिसरातील लेन नं. ३ मध्ये पाईपलाईन चे काम सुरु

पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी मधील कुलकर्णी हॉस्पिटलनजीक असणाऱ्या स्मिता हाईट्स या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला.तर कॅनॉल रोड परिसरातील लेन नं. ३ या ठिकाणी पिण्याच्या ६ इंची २०० मीटर पाईपलाईन टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला .

कुलकर्णी हॉस्पिटलनजीक असणाऱ्या स्मिता हाईट्स या ठिकाणी रस्त्याची अवस्था दयनीय बनल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या अनुषंगाने नगरसेवक स्वनिल दुधाने यांनी वेळो वेळी पाठपुरावा केला आणि काल या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यानंतर त्वरित कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे असून यामुळे अत्यंत वेगाने सदर काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास नगरसेवक दुधाने यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी . विजय खळदकर, संगीताताई बराटे, निवेदिताताई जोशी, शैलेश जोशी यांच्यासह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने नागरिकांतून संतोष व्यक्त होत आहे . नागरिकांच्या सूचना आणि मार्गदर्शन यांचे सदैव स्वागत असेल, असा शब्द यावेळी नगरसेवक दुधाने यांनी दिला आहे.

तर कॅनॉल रोड परिसरातील लेन नं. ३ या ठिकाणी पिण्याचे पाणी गाळमिश्रित आणि दूषित येत असल्याची तक्रार होती. या ठिकाणी पुणे महापालिकेच्या अधिकार्यांना बोलावून नगसेवक दुधाने यांनी भेट दिली असता पाणी पाईपलाईन खराब झाल्याचे निदर्शनास आले.या अनुषंगाने त्यांनी तेथील पिण्याची पाईपलाईन बदलण्याची मागणी केली आणि वेळोवेळी पाठपुरावा करत ६ इंची २०० मीटर पाईपलाईन उपलब्ध करवून घेतली आज या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी नागरिकांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले.आणि लवकरच नवीन पाईपलाईनमधून नागरिकांना जोडणी देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले यावेळी केदार मारणे आणि अन्य नागरिक यांची उपस्थिती होती.

भारतासह जगभरात इंटरनेटला होऊ शकतो धोका ?

युद्धामुळे होर्मुझमध्ये टाकलेल्या केबल्सना नुकसान होण्याची शक्यता; समुद्रात 97% जागतिक डेटा

नवी दिल्ली-अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ प्रभावित झाल्याने जगभरात ऊर्जा संकटापाठोपाठ आता इंटरनेट ठप्प होण्याचा धोका आहे. याचे कारण असे की, होर्मुझ मार्गातून केवळ जगातील 20% कच्चे तेल आणि 25% LNG जात नाही, तर या मार्गाखाली इंटरनेट केबल्सही टाकलेल्या आहेत.

जर या प्रदेशात तणाव वाढला किंवा केबल्सना नुकसान झाले, तर भारतासह संपूर्ण जगात इंटरनेटचा वेग मंदावू शकतो. तज्ञांचे मत आहे की, हा परिसर केवळ ऊर्जा चोकपॉइंट नाही, तर एक डिजिटल चोकपॉइंट देखील आहे.

अनेकदा लोकांना वाटते की, इंटरनेट उपग्रहाद्वारे चालते, पण सत्य वेगळे आहे. जगातील सुमारे 95 ते 97% डेटा फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे हस्तांतरित होतो.
या केबल्स समुद्राखाली टाकलेल्या असतात.
भारताला युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियाशी जोडणाऱ्या मुख्य केबल्स याच मार्गाजवळून जातात. यात SEA-ME-WE, AAE-1 आणि EIG सारख्या मोठ्या केबल सिस्टिम्सचा समावेश आहे.

भारताची डिजिटल अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी या सागरी मार्गांवर अवलंबून आहे. भारताची बहुतेक आंतरराष्ट्रीय इंटरनेट बँडविड्थ अरबी समुद्र आणि आखाती प्रदेशातून येते.

लेटेंसी वाढेल: केबल्सचे नुकसान झाल्यास, ट्रॅफिकला लांबच्या ‘पॅसिफिक मार्गावर’ वळवावे लागेल. यामुळे लेटेंसी म्हणजेच डेटा प्रवासाचा वेळ वाढेल.
इंटरनेट स्लो होईल: यूट्यूब, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर बफरिंग वाढेल. व्हिडिओ कॉल आणि क्लाउड सेवांमध्ये विलंब होईल.
23.48 लाख कोटींच्या IT क्षेत्रावर परिणाम

भारताचे IT आणि आउटसोर्सिंग क्षेत्र सुमारे 250 अब्ज डॉलर (23.48 लाख कोटी) चे आहे. अमेरिकन आणि युरोपीय क्लायंट्ससोबतची रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी याच कमी-लेटेंसी नेटवर्कवर अवलंबून आहे.

केबल तुटल्यास कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे सेवा करार (SLA) तुटण्याची आणि दंड लागण्याची भीती आहे. याव्यतिरिक्त, आखाती देशांकडून येणारे रेमिटन्स (पैसे पाठवणे) आणि SWIFT सारखे बँकिंग व्यवहार देखील स्लो होऊ शकतात.

इंटरनेटची रचना अशा प्रकारे केली आहे की एक मार्ग बंद झाल्यास ट्रॅफिक दुसऱ्या मार्गावर (री-रूटिंग) वळवले जाते. त्यामुळे ‘टोटल ब्लॅकआउट’ म्हणजे इंटरनेट पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कमी आहे.

तथापि, री-रूटिंगमुळे पर्यायी मार्गांवर भार वाढेल, ज्यामुळे वेग खूप कमी होईल. शेअर बाजार आणि हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगसारख्या क्षेत्रांमध्ये, जिथे मिलीसेकंदांना महत्त्व असते, तिथे मोठा आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो.

नवीन पर्यायांवर भारत गुंतवणूक करत आहे

या धोक्यामुळे, भारतासह अनेक देश आता पर्यायी मार्गांवर गुंतवणूक करत आहेत. एलन मस्क यांच्या स्टारलिंकसारख्या सॅटेलाइट इंटरनेट सेवांना बॅकअप म्हणून पाहिले जात आहे.भविष्यात अशा केबल्स टाकण्याची योजना आहे, ज्या संवेदनशील क्षेत्रांना टाळू शकतील. सध्या, होर्मुझमधील वाढता भू-राजकीय तणाव तेलाच्या किमतींपेक्षा जास्त डिजिटल जगाची चिंता वाढवत आहे.

ट्रम्प ची डरकाळी :-अमेरिका कोणत्याही देशाला मदत करणार नाही:आमच्याकडून तेल खरेदी करा, अन्यथा होर्मुझला जाऊन तेल घेण्याचे धाडस दाखवा

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, अमेरिका यापुढे कोणत्याही देशाला मदत करणार नाही. देशांना आपापली परिस्थिती स्वतःच सांभाळावी लागेल.त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्रिटनसारख्या ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन मिळत नाही, त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावे, कारण अमेरिकेकडे तेलाची कमतरता नाही.ट्रम्प म्हणाले की, जर देशांना हवे असेल, तर त्यांनी धाडस दाखवून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जाऊन स्वतःच तेल मिळवावे. अमेरिका त्यांच्या मदतीला येणार नाही, जसे ते अमेरिकेच्या मदतीला आले नाहीत.

आपल्या निवेदनात त्यांनी असेही म्हटले की, इराण मोठ्या प्रमाणात कमकुवत झाला आहे आणि सर्वात कठीण काम आधीच पूर्ण झाले आहे. आता इतर देश जाऊन स्वतःच आपले तेल मिळवू शकतात.अमेरिकेने इराणमधील इस्फहान शहरातील एका मोठ्या शस्त्रागारावर हवाई हल्ला केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, हा हल्ला सोमवारी रात्री २,००० पौंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करून करण्यात आला.एका अमेरिकी अधिकाऱ्याचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि लष्करी उपकरणे असलेल्या डेपोला लक्ष्य करण्यात आले होते. बंकर-बस्टर बॉम्बचा वापर तटबंदीयुक्त आणि भूमिगत लक्ष्ये नष्ट करण्यासाठी केला जातो.

डेपोमध्ये साठवलेल्या शस्त्रास्त्रांचा स्फोट झाल्याने या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी स्फोट झाले आणि मोठ्या प्रमाणात आग लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या स्फोटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
कतारने स्पष्ट केले आहे की ते सध्या सुरू असलेल्या कोणत्याही मध्यस्थी प्रयत्नांमध्ये सहभागी नाही.
कतारने स्पष्ट केले आहे की, ते सध्या सुरू असलेल्या कोणत्याही मध्यस्थी प्रयत्नांमध्ये सहभागी नाही. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांचे लक्ष सध्या देशाच्या सुरक्षेवर केंद्रित आहे.

तथापि, त्यांनी असेही सांगितले की कतार सर्व पक्षांसोबत चर्चेत आहे. त्यांनी पाकिस्तानच्या प्रयत्नांना पाठिंबा व्यक्त केला आणि आशा व्यक्त केली की यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल.

इटलीने अमेरिकेला लष्करी तळ देण्यास नकार दिला.
इटलीने अमेरिकेला सिसिली बेटावर असलेला आपला सिगोनेला लष्करी तळ वापरण्यापासून रोखले आहे. अमेरिकेला तिथे विमाने उतरवायची होती, पण इटलीने परवानगी नाकारली.वृत्तानुसार, काही अमेरिकी बॉम्बर विमाने या इटालियन तळावर उतरून त्यानंतर मध्य पूर्वेकडे जाणार होती. मात्र, या योजनेबद्दल इटलीला आगाऊ माहिती देण्यात आली नव्हती. अमेरिकेने इटलीची परवानगी मागितली नाही किंवा त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चाही केली नाही.काही दिवसांपूर्वी, स्पेननेही असेच पाऊल उचलले होते. स्पेनने इराण युद्धात सहभागी असलेल्या अमेरिकी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.
ट्रम्प म्हणाले, जर तुम्हाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मिळत नसेल, तर आमच्याकडून विकत घ्या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ब्रिटनसारख्या ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन मिळत नाही, त्यांनी अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे, कारण अमेरिकेकडे पुरेसे तेल आहे.त्यांनी या देशांना धैर्य दाखवून होर्मुझवर जाण्याचे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले.ट्रम्प असेही म्हणाले की, देशांनी आता आपापली लढाई स्वतः लढायला शिकले पाहिजे आणि अमेरिका त्यांच्या मदतीला येणार नाही, जसे ते पूर्वी अमेरिकेच्या मदतीला आले नव्हते.

आपल्या निवेदनात ते म्हणाले की, इराण लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे आणि देशांनी आता स्वतःचे तेल मिळवले पाहिजे.

पुण्यात महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकानिमित्त शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्याचाच एक भाग म्हणून सोमवार पेठ येथील आगारकर स्कूलमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
स्व. धर्मीबाई भवरलालजी संकलेचा व स्व. पारसमलजी भवरलालजी जैन यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, समाजहिताच्या दृष्टीने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले होते .
हे रक्तदान शिबिर दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपच्या कालावधीत हे संपन्न झाले आहे. या शिबिराचे आयोजन अभिनव जैन यंग सर्कल आणि जिनशासन युवा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते .
रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. त्यामुळे गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, देशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

राज्यात ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात, ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे, काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर

एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, लातूर, धाराशिव, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, ठाणे, पालघर, नंदुरबार, सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होते, त्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.