पुण्यातल्या वाढत्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांच्या विरोधात आणि नसरापूर,पर्वती-जनता वसाहत येथील पीडितेला न्याय द्या, या मागणीसाठी आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात कलाकार कट्टा येथे निदर्शने करण्यात आली.
गेले काही दिवस पुण्यातील मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच भारत सरकारचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो रिपोर्ट आला असून त्यामध्ये महिला अत्याचाराच्या प्रकरणाबाबत महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. तर बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत. या अहवालानुसार महाराष्ट्रात रोज आठ बलात्काराच्या घटना घडत आहेत आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणावर ही प्रकरणे पोलिसांकडे तपासासाठी प्रलंबित आहेत.या अहवालानुसार महाराष्ट्रात ७८७२६ प्रकरणे प्रलंबित असून हि देशात सर्वाधिक आहेत तर कोर्टामध्ये तीन लाख एकोणतीस हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.
राज्य सरकारातील मंत्र्यांनी केवळ संताप व्यक्त करून करणे पुरेसे नसून यासाठी व्यवस्थांमध्ये काय बदल करणार आहे याचे उत्तर देण्याची गरज आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी, जलदगती न्यायप्रक्रिया आणि दोषींना खात्रीने व त्वरित शिक्षा यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. महिला व बालकांच्या गुन्ह्यांविषयी शून्य सहनशीलता अपेक्षित आहे. तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळा,पालक प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधत पोलिसांनी काम करण्याची गरज आहे.अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात आम आदमी पार्टी च्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आरती करंजावणे, सुरेखा भोसले, माधुरी गायकवाड, शितल कांडेलकर, राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, उज्वला गायकवाड, मुमताज शेख, अंजना वांजळे, संजय रणधीर, मनोज थोरात, सुभाष करांडे, निरंजन अडागळे , नौशाद अन्सारी, कुमार धोंगडे, सागर झा, उमेश बागडे, मिलिंद सरोदे, नितीन कुटे, किरण कांबळे,रमेश पवार, मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते.

