Home Blog Page 1132

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो बांधकाम काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द करून गणेशखिंड रोड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) यांनी प्रायोगित तत्वावर तात्पुरते आदेश जारी केले आहेत.

पुणे विद्यापीठ चौकामधुन गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून सेनापती बापट रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून पर्यायी मार्गाने जावे.

शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्यावर येणाऱ्या रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेंज हिल्स् कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून रेंज हिल्स् कॉर्नर येथून डावीकडे वळण घेवून रेंज हिल्सकडे पर्यायी मार्गाने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून औंध, सांगवी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औंध रोडवरून प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकामधून बाणेर रस्त्याने जावे व राजभवनच्या पाठीमागील बाजुस यु-टर्न घेवून पुणे विद्यापीठ चौकामध्ये यावे व डावीकडे वळण घेवून औंध रोडने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाणेर रोडवरून प्रवेश बंद राहणार असून वाहनचांलकांनी पुणे विद्यापीठ चौकातून डावीकडे वळणे घेवून पाषाण रोडने अभिमानश्री जंक्शन येथून उजवीकडे वळण घेवून बाणेर रस्त्याला येवून बाणेरकडे जावे. बाणेर व औंध रस्त्यावरून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या वाहतुकीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स, कंटेनर्स यांच्यासाठी २४ तास प्रवेश बंद
गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते पुणे विद्यापीठ चौक, औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक व सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीएट हॉटेल चौक ते पुणे विद्यापीठ चौजक या मार्गावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स व कंटेनर्स यांना २४ तास प्रवेश बंदी राहील.

भाजीपाला वाहतूक करणारे तीनचाकी पिकअप, तीनचाकी, चारचाकी मालवाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने तसेच डंपर, मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर कमी वेगाने चालणारी वाहने व इतर वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान वा. दरम्यान प्रवेश बंद राहील, असेही पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

पुणे, दि. २२: पुणे शहरातून सोलापूर रस्ता, अहमदनगर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई रस्ता, नाशिक रस्ता, सासवड रस्ता, पौड रस्ता, आळंदी रस्ता व इतर रस्त्यांवरून शहरात मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्च पासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले व रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश असणारे मार्ग
अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद राहील. वाहनचालक शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालक लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील.

अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद राहील. वाहनचालक शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्यावरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचौक, कात्रजचौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंद या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद
पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर २४ तास प्रवेश बंद राहील. सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक
संचेती चौकावरील जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड, पौड फाटा चौकवर कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड, राजाराम पुलावरून डी. पी. रोडकडे जाणारी, दांडेकर पुल-शास्त्री रोडकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे, पॉवर हाऊस चौक-मालधक्का चौकाकडे, पोल्ट्री फार्मचौक-आर.टी.ओ. चौकाकडे, पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे, खाणे मारूती चौक-इस्ट स्ट्रीटकडे, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे, ब्रेमेन चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री पाषाण चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे, सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, वल्फर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगाव पार्क रोड-नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.

अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

साप्ताहिक अयोध्या सुपरफास्ट ट्रेन रोज चालवण्याची मागणी

मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेकडे केली मागणी

मुंबई दिनांक २२ मार्च २०२४
अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्या धामकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठी प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे क्रमांक 22103 अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी नियमितपणे रोज चालवावी अशी मागणी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राम करण यादव यांना पत्राद्वारे केली आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

मुंबईतून अयोध्येसाठी रोज गाडी सुरू झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी/स्लिपर कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. यावेळी डॉ. रमाशंकर भारतीय, आर.डी. यादव, सुरेश पाल, दीपनारायण मिश्रा, अभय झा, दयाशंकर यादव, कृपाशंकर दुबे, ब्रिजेश पाल आदी उपस्थित होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

मर्जीतील निवडणूक आयुक्त,विरोधकांची बेकायदा कोंडी तरीही चित्र तेच,’ आत्मविश्वास गमावलेले मोदी’

पुणे : कर चुकवेगिरीच्या प्रकरणाचा त्वरीत निकाल लावावा ही आमची मागणी नाकारली जात आहे. संबधित यंत्रणेने आमची खाती गोठवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायिक प्रकरणांमध्ये काँग्रेसला अडकवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

काँग्रेस भवनमध्ये चव्हाण यांनी या विषयावर पत्रकारांबरोबर संवाद साधला. पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कर चुकवला म्हणून काँग्रेसवर वेगवेगळ्या खात्यांची कारवाई सुरू आहे. काँग्रेसने याबाबत संबधित प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे, मात्र निकाल न देता त्यांनी काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत.

चव्हाण म्हणाले, यातील एक प्रकरण ९ वर्षांपूर्वीचे तर दुसरे तब्बल ३० वर्षांपूर्वीचे आहे. जमा न केलेला कर भरण्यास काँग्रेस तयार आहे, मात्र ती रक्कम दंड लावून अवाजवी वाढवण्यात आली आहे. आम्ही प्राधिकरणाकडे दाद मागितली, मात्र त्यांनी खाती गोठवण्याची कारवाई केली. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली तर न्यायालयाने प्रथम प्राधिकरणाचा निकाल येऊ द्या, मगच आमच्याकडे या असे सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रकार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर

भारतीय जनता पक्ष त्यांचा जिंकण्याचा आत्मविश्वास हरवून बसला आहे. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर, बेकायदेशीर कारवाया, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना कारवाईची धमकी देऊन पक्षात घेणे असे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही देशभरात निवडणूक लढ‌तो आहोत, अशा स्थितीत खातीच गोठवून ठेवली तर आम्ही करायचे तरी काय असा प्रश्न चव्हाण यांनी केली. साधा १० रूपयांचा धनादेशही आम्ही आज वटवू शकत नाही, उमेदवारांना आर्थिक मदत करणे तर दूरच, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार नाही तर दुसरे काय आहे असे चव्हाण म्हणाले.

निवडणूक रोख्यांचा कायदा करून तिजोरी भरली-

देशाला याची कल्पना यावी यासाठी काँग्रेस देशस्तरावर या विरोधात आवाज उठवत आहे. त्यांना जिंकून येण्याची खात्री नाही, आम्हाला जनतेचे पाठिंबा मिळेल याची भीती आहे, त्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू आहे. आम्हाला निवडणूक लढवताच येऊ नये अशी स्थिती करून ठेवली आहे. स्वत: भाजपने मात्र निवडणूक रोख्यांचा कायदा करून स्वत:ची तिजोरी भरून घेतली आहे. आम्ही या कायद्याला सुरूवातीपासून विरोध केला, मात्र पाशवी बहुमतावर त्यांनी तो मंजूर करून घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने हा कायदाच घटनाबाह्य ठरवला आहे असे चव्हाण यांनी सांगितले.

आम्ही लढाई लढतोच आहे, मात्र प्राधिकरणाचा निकाल, त्यानंतर न्यायालयात दाद या सगळ्यात निवडणुका संपतील. तेच त्यांना अपेक्षित आहे, मात्र आता जनतेनेच आता याविरोधात आवाज उठवावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. ही लोकसभा निवडणूकच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठीची आहे असे समजूनच आम्ही लढतो आहोत, जनतेने पाठिंबा द्यावा असे ते म्हणाले.

बहुतेक अधिकारी नवीन -कामकाजावर परिणाम

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका लागला आहे. राज्य सरकारने परिमंडळाचे उपायुक्त संतोष वारुळे, आशा राऊत आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे यांची बदली केली. महापालिकेत ३१ मार्चपूर्वी कामे संपविण्याची गडबड सुरु असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.एका जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा जास्त नोकरी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आज वारुळे, राऊत आणि केरूरे यांची बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे. सध्या रवींद्र बिनवडे हे जुने अतिरिक्त आयुक्त आहे. आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच महापालिकेचा कार्यभार स्वीकारला असून, सध्या ते विभागनिहाय माहिती घेत आहेत.
३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असताना ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले मंजूर करून पैसे जमा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका भवनात गडबड सुरु आहे. पण प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण त्याचा परिणाम कामकाजावर झाला आहे.राजेंद्र भोसले यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी विभागप्रमुखांनी बैठक घेऊन शहरातील कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील किरकोळ स्वरूपाची माहिती मागितली असता अधिकाऱ्यांना ही सांगता आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करत कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले.

भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू – हर्षवर्धन पाटील

‘ॲग्रीवाईस – २४’ राष्ट्रीय परिषद पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलमध्ये संपन्न;
देशभरातील पाचशे संस्थांमधील एक नऊशे प्रतिनिधींचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २२ मार्च २०२४) भारतात शेती व्यवसाय आजही उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेती धोरणामुळे २०४७ पर्यंत भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू, असा विश्वास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे पब्लिक स्कूल (पीबीएस) च्या वतीने ‘ॲग्री वाईस २४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.यावेळी दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स लि. चे सहयोगी उपाध्यक्ष मनिष गुप्ता, जे. के. सीडसचे व्यवस्थापक किशोर अहिरे, पीबीएसचे प्राचार्य डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते. देशभरातील पाचशे संस्थांमधील नऊशे विद्यार्थी, प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सध्या शेतकरी शेतीमाल उत्पादन करताना रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु याचा विपरित परिणाम पिकांवर होऊन उत्पादन कमी होते. शेतकऱ्यांनी शाश्वत, नैसर्गिक शेती केली आणि एक उद्योग म्हणून याकडे पाहिले तर अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो.‌ त्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असे किशोर अहिरे यांनी सांगितले.
भारतात सरासरी ८७ टक्के पाणी शेतीसाठी, अकरा टक्के पाणी दैनंदिन वापरासाठी तर दोन टक्के पाणी औद्योगिक क्षेत्राला वापरले जाते. म्हणजेच शेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र त्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन होत नाही. पाणी आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. माती परीक्षण करून कोणती पिके घ्यावीत याविषयी माहिती घेतली पाहिजे, असे मनिष गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान सकाळच्या सत्रात पशुसंवर्धन सहआयुक्त शितलकुमार मुकणे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कोरोमंडल इंटरनॅशनल लि. चे सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे, पीआय इंडस्ट्रीज लि.चे उपव्यवस्थापक प्रवीण जाधव, महिको चे राष्ट्रीय विक्री व्यवस्थापक श्रीकांत शिवले यांनी शेती उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, विविध प्रश्न, अडचणी, सुधारित बियाणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. आभार डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी मानले.
चौकट –
साखर उद्योगाची ओळख ऊर्जा उद्योग म्हणून होईल – हर्षवर्धन पाटील

भारतात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होते. ऊसापासून साखर निर्मिती केली जाते. जागतिक पातळीवर साखर उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात खूप संशोधन होत आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगातही फार मोठे बदल होत आहेत. ऊसाच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करून त्याचा वापर जैव इंधन म्हणून तसेच ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. पुढील काळात हे नवीन तंत्रज्ञान भारतात आणून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून पुढील धोरण आखण्यात येत आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळून ऊर्जा उद्योग म्हणून नवी ओळख निर्माण होईल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

कात्रज परिसरात बेफाम अवैध धंद्यांना राजकीय अभय ?

पुणे- तरुणाई व्यसनी कशी होईल, गुन्हेगारीकडे कशी वळेल असा दृष्टीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात सर्रास अवैध धंदे बेफामपणे चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी गावठी दारूसह अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.जागा बळकावणे, अनधिकृत बांधकामे करणे यासह दारूचे धंदे येथे धनाढ्य राजकीय हस्तकांनी चालविल्याने त्यांची दहशत येथे पसरलेली दिसते आहे.
अनधिकृत लॉटरी सेंटर हे सर्रास सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कात्रज-दत्तनगर रस्ता परिसरांसह अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. अनेक वॉईन शॉप बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे.मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कृष्णसागर हॉटेलच्या समोरील बाजूस गावठी दारूचा व्यवसाय चालतो. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांगडेवाडी गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.सर्पोद्यान पासून पुढे गेल्यावर कात्रजच्या प्रमुख चौकापासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट होतो आहे. वर्षानुवर्षे नाल्याच्या कडेला चालणाऱ्या बिअर शॉपी आणि शेजारील रेस्टॉरंट पासून याची सुरुवात झाली अन ती संपूर्ण कात्रज परिसरात पोहोचली कात्रज चौक आणि इतर ठिकाणी दुकानांना पडदे लावून सरकारमान्य गेम आणि ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टे, सोरट, जुगार, अशा प्रकारचे अवैध धंदे बिनधास्त सुरु असतात. त्यामुळे अवैध धंद्यांना राजकीय अभय आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्सास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. संतोषनगर, अंजलीनगर, कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर, साईनगरसह समाविष्ट गावांत हे पदार्थ सहज मिळतात.मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करण्यासारखे प्रकार वाढीस लागले असून कात्रज चौक, मुंबई महामार्ग, राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ रस्त्यावरच मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सशस्त्र टोळक्याने रात्री अपरात्री दहशत माजवण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. नुकताच संतोषनगर परिसरात किरकोळ कारणांवरून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता.

प्रत्येक वेळी जेव्हा कोणी मला विचारले की मी मोठी झाल्यावर मला काय बनायचे आहे, तेव्हा माझे एकच उत्तर होते – मला एक्टर व्हायचे आहे! – शरवरी

बरं, हे पूर्ण करण्यापेक्षा सांगणं सोपं आहे… अनेक वर्षांचा संयम, कलाकुसरीच्या प्रेमासाठी आग पेटवत राहणं, माझ्या कौशल्याचा आदर करणं, माझ्या असुरक्षिततेवर नियंत्रण ठेवणं, आत्म-शंका आणि आत्मनिरीक्षणाच्या दिवसांतून जाणं, त्या उदासीन भावनेतून बाहेर पडणं, कारण चांगले … तो एक प्रकल्प मिळविण्यासाठी स्टार्स ला खरोखर संरेखित करावे लागते .. जे तुम्हाला सर्वोत्तम करण्यासाठी सक्षम करते.

मी या सुंदर इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही पाठिंब्याशिवाय आले आहे, मला पूर्ण माहिती आहे की मी करत असलेला प्रत्येक चित्रपट मला टिकून राहण्यासाठी हिट किंवा प्रशंसा मिळवणे आवश्यक आहे.असे वाटेत की मार्गदर्शक भेटले ज्यांना मी खरोखर माझे पालक देवदूत म्हणू शकते. निखिल अडवाणी सर तुम्ही माझे मार्गदर्शक आहात.. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला.. तुम्ही मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि तुम्ही मला #वेदा दिला!

मला माहित नाही की जर तुम्ही आणि हा विशेष चित्रपट माझ्यासोबत नसता तर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतका आत्मविश्वास आणि उत्साह असता किंवा नाही
झी स्टुडिओ आणि एमे एंटरटेनमेंट : मला या सर्जनशील ठिकाणाचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद ज्याला मी आता माझे कुटुंब म्हणते. जॉन: प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तू एक्शन चा  बाप आहेस आणि चित्रीकरणातून तू माझा नॉर्थ स्टार झाला आहेस. मला आनंद आहे की मी आता तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर तुमचा सल्ला घेऊ शकेन 

तुमच्यामुळे मी आणखी एक दिवस लढण्यासाठी जगते . तुमच्यामुळे मी आणखी एक दिवस स्वप्न पाहण्यासाठी जगते . मी वचन देते की मी तुम्हाला निराश करणार नाही.

प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. नंबर 1 वर ट्रेंड होत असलेला #वेदाचा टीझर पाहणे खूप आनंददायी आहे! ते अतिवास्तक आहे. माझा प्रवास किकस्टार्ट व्हावा अशी मला नेहमीच इच्छा होती … आणि तो इथून सुरु होते 

12 जुलैला सिनेमागृहात भेटूया 

https://www.instagram.com/p/C4zgw6JxU0v/?igsh=MThlNGx1bjdzOGRuNQ==

तमन्ना भाटिया दिसणार ” डेअरिंग पार्टनर्स ” मध्ये !

 पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया ही कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असते. नुकतच तिने तिच्या आगामी प्रोजेक्ट ची घोषणा केली या बद्दल ती म्हणते मी माझ्या आगामी प्रोजेक्ट ‘डेअरिंग पार्टनर्स’ बद्दल खूप उत्साहित आहे. ज्यामध्ये डायना पेंटीसोबत स्क्रीन शेअर करत आहे. 

‘डेअरिंग पार्टनर्स’ ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे जे अल्कोहोल स्टार्ट-अपचे भागीदार म्हणून एक धाडसी प्रवास सुरू करतात. याची कथा खूप सुंदर लिहीली आहे. या प्रकल्पा बद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 

 अर्चित कुमार आणि निशांत नाईक दिग्दर्शित ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये जावेद जाफरी यांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे लेखन नंदिनी गुप्ता, मिथुन गंगोपाध्याय आणि आर्ष व्होरा यांनी केले आहे. ‘डेअरिंग पार्टनर्स’च्या पलीकडे तमन्ना यावर्षी अनेक मनोरंजक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीकडे तेलगूमध्ये ‘ओडेला 2’, हिंदीमध्ये वेदा आणि तमिळमध्ये ‘अरनमानाई 4’ मध्ये ती दिसणार आहे.

देशातील व्यवस्था बदलण्यासाठी हवी ‘ तिसरी क्रांती ‘ 

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे लिखित ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे. २२ मार्च २०२४ : “भारतीय राज्यघटनेवर आज हल्ले चालू झाले आहेत. सध्या देशाची राज्यघटना कुरतडून कोण्या एका समाजाचे श्रेष्ठत्व निर्माण करण्याचे काम एका शक्तीने चालू ठेवलेले आहे. या शक्तीला रोखण्यासाठी समाजव्यवस्था बदलण्यासाठी सर्व राजकीय आणि सध्याची प्रशासकीय प्रारुपे (मॉडेल्स) कालबाह्य ठरू लागली आहेत. त्यामुळे देशातील समाजव्यवस्था बदलण्यासाठी आता तिसरी क्रांती होणे गरजेचे आहे.” असे मत ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाचे लेखक आणि भारतीय पोलिस सेवेतील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी एस. एम. जोशी सभागृह येथे बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांच्या हस्ते सुरेश खोपडेलिखित ‘तिसरी क्रांती- चेहरे नको, व्यवस्था बदलुया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या समारंभात लेखक या नात्याने खोपडे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संग्राम खोपडे व विक्रम  शिंदे हे उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, ही पहिली क्रांती, जगातील सर्वात मोठी व उत्कृष्ट अशी  राज्यघटना अस्तित्वात आली ही दुसरी क्रांती आहे. या दोन्ही क्रांतीमुळे सामान्यांच्या जगण्यामध्ये काहीशी भौतिक प्रगती झाली, परंतु धर्म, पंथ, जाती या नावाखाली माणसा- माणसांत भेद निर्माण केला जात आहे. त्यातून व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आल्याचे मत खोपडे यांनी या वेळी व्यक्त केले. देशातील लोकशाही सध्या पोकळ झाली आहे. यासाठी येथील समाजव्यवस्थाच कारणीभूत असून, सध्याच्या काळात आमदार आणि खासदार यांनाही हवे तेव्हा विकत घेता येऊ लागले आहे. ही सध्याची आपल्या लोकशाहीची अवस्था आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू परळकर यांनी केले. आभार विक्रम शिंदे यांनी व्यक्त केले. 

“पोलीस दलात कार्यरत असताना मोहल्ला कमिट्या स्थापन करून त्याद्वारे समाजव्यवस्था बदलण्यासाठी सुरेश खोपडे यांनी प्रयत्न केला. हा प्रयोग पुढे जगातील अन्य देशांनी स्वीकारला. आपल्या देशाला याचे महत्त्व कळू शकले नाही. खोपडे हे पोलिस दलातून निवृत्त झाले असले तरी अद्यापही ते सामाजिक भान राखून आहेत. ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी नवसमाज निर्मितीचा प्रयोग मांडला आहे.” डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक

मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

पुणे दि.२२: पुण्यातून महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार स्विकारला . यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना महावस्त्र , पुष्पगुच्छ आणि श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा भेट देत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, ऊद्योजक रेखा चोरगे, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, रंजना कुलकर्णी, पुणें शहर महिला सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना ऊपशहर प्रमुख श्रुती नाझीरकर, श्रद्धा शिंदे, सुप्रिया पाटेकर, मंगल सोनटक्के, युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी शिवसेना कार्यालय सचिव , संतोष लांडगे, शिवसेना ऊपशहरप्रमुख संजय डोंगरे, धैर्यशील कदम, संकेत मोरे, संजय तुरेकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

याभेटीवेळी उपस्थित शिवसैनिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोहोळ यांचा विजय मताधिक्यांचा विक्रम निश्चितपणे गाठेल अशी भावना व्यक्त केली.

पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: पुणे शहरातील पार्किंगच्या जागेचा वापर मालवाहतूक करणारी वाहने लोडिंग, अनलोडिंग करतेवेळी करत असल्याने इतर वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यापूर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे शहरात २३ मार्च पासून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत लक्ष्मी रोड वरील संत कबीर चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, केळकर रस्त्यावरील टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्त्यावरील टिळक चौक ते शनिपार चौक, टिळक रस्त्यावरील टिळक चौक ते जेधे चौक, जंगली महाराज रस्त्यावरील स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक, कर्वे रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा, महात्मा गांधी रस्त्यावरील पंडोल अपार्टमेंट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक व नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क मधील कोरेगाव पार्क जंक्शन ते ताडीगुत्ता चौक वर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा बदल अत्यावश्यक सेवेतील वाहनांना असणार नाही, असेही कळविले आहे.

विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंगचे तात्पुरते आदेश जारी
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत टिळक स्मारक मंदिर गेटच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्‍िटट्यूतकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशन व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटर तात्पुरत्या स्वरूपात नो पार्किंगचे आदेश जारी करण्यात येत आहेत.

वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ४ एप्रिलपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.

नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

लोकशाही दिन रद्द

पुणे, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचार संहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने माहे एप्रिल व माहे मे च्या पुणे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा यांनी दिली आहे.

कॉंग्रेसने केली निष्ठावंताची हत्या:न्याय यात्रा काढून निष्ठावंतांवर अन्याय-आबा बागुल

कसब्यात धंगेकर पॅॅटर्न नाही तर सर्व एकत्र येऊन कॉंग्रेस पॅॅटर्न राबविला,पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी नाहीत -नियुक्त उमेदवाराबाबत आक्षेप

निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

पुणे
एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे मग न्याय कुणाकडे मागायचा ,हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे.असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला.शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे.यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे.दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे.एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे.वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली.जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली.त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील.असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले.त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत.निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

मानवीहक्कासंबंधी ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे उदघाटन

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजन 

पुणे :भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज द्वारे आयोजित मानवी हक्क या विषयावरील ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे उदघाटन दि.२१ मार्च रोजी   झाले.श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.एस.थुराईराज,अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्या.ए.आर.मसूदी,भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,कुलसचिव जी.जयकुमार,भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे हे मान्यवर उदघाटन समारंभासाठी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,प्रा.शिवांगी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत ५० स्पर्धक संघानी सहभाग घेतला आहे. दि.२३ मार्च रोजी समारोप होईल.समारोप कार्यक्रमास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अभय ओक,नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अनिलकुमार सिन्हा,मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.हूनसु अल सुऊद,अलाहाबाद  न्यायालयाचे न्या.अरुम कुमार सिंग देशवाल,केरळ उच्च न्यायालयाचे न्या.सोफी थॉमस,गुजरात उच्च न्यायालयाचे न्या.अनिरुद्ध पी.मायी उपस्थित राहणार आहेत.
‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’  चे हे बारावे वर्ष असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.पी.एन.भगवती यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ २०११ साली सुरु करण्यात आली.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा नावाजली आहे.मानवी हक्कांच्या संदर्भातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल या स्पर्धेतून जागृती घडवून आणली जाते.भारती विद्यापीठाचे संस्थापक कै.डॉ.पतंगराव कदम,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्यवाह डॉ.विश्वजित कदम,कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता कदम-जगताप,कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले. 
‘ मानवी हक्कांच्या विस्तारात आणि संरक्षणात  न्यायालयानी  महत्वाची भूमिका बजावली असून भारताची त्यासंबंधी भूमिका अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महत्वपूर्ण ठरली आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हे  मानवी हक्कांच्या जपणुकीचे महत्वपूर्ण उदाहरण असून सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधी वेळोवेळी सकारात्मक आणि संरक्षक भूमिका घेतली आहे.तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीने काही वेळा मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र दिसत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स,फेशल रेकग्निशन,बायोमेट्रिक माहितीचे अनधिकृत हस्तांतरण ,सोशल मीडिया माध्यमातून होणारे शोषण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देखरेख ठेवणे, खासगी अधिकारांवर गदा आणणे, भेदभाव करणे दिसून येत आहे.त्याबाबत सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन होणार नाही यासाठी दक्ष आहे’,असा सूर उदघाटन कार्यक्रमातील मान्यवरांच्या भाषणात उमटला.