माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे लिखित ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे. २२ मार्च २०२४ : “भारतीय राज्यघटनेवर आज हल्ले चालू झाले आहेत. सध्या देशाची राज्यघटना कुरतडून कोण्या एका समाजाचे श्रेष्ठत्व निर्माण करण्याचे काम एका शक्तीने चालू ठेवलेले आहे. या शक्तीला रोखण्यासाठी समाजव्यवस्था बदलण्यासाठी सर्व राजकीय आणि सध्याची प्रशासकीय प्रारुपे (मॉडेल्स) कालबाह्य ठरू लागली आहेत. त्यामुळे देशातील समाजव्यवस्था बदलण्यासाठी आता तिसरी क्रांती होणे गरजेचे आहे.” असे मत ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाचे लेखक आणि भारतीय पोलिस सेवेतील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी एस. एम. जोशी सभागृह येथे बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांच्या हस्ते सुरेश खोपडेलिखित ‘तिसरी क्रांती- चेहरे नको, व्यवस्था बदलुया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या समारंभात लेखक या नात्याने खोपडे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संग्राम खोपडे व विक्रम शिंदे हे उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, ही पहिली क्रांती, जगातील सर्वात मोठी व उत्कृष्ट अशी राज्यघटना अस्तित्वात आली ही दुसरी क्रांती आहे. या दोन्ही क्रांतीमुळे सामान्यांच्या जगण्यामध्ये काहीशी भौतिक प्रगती झाली, परंतु धर्म, पंथ, जाती या नावाखाली माणसा- माणसांत भेद निर्माण केला जात आहे. त्यातून व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आल्याचे मत खोपडे यांनी या वेळी व्यक्त केले. देशातील लोकशाही सध्या पोकळ झाली आहे. यासाठी येथील समाजव्यवस्थाच कारणीभूत असून, सध्याच्या काळात आमदार आणि खासदार यांनाही हवे तेव्हा विकत घेता येऊ लागले आहे. ही सध्याची आपल्या लोकशाहीची अवस्था आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू परळकर यांनी केले. आभार विक्रम शिंदे यांनी व्यक्त केले.
“पोलीस दलात कार्यरत असताना मोहल्ला कमिट्या स्थापन करून त्याद्वारे समाजव्यवस्था बदलण्यासाठी सुरेश खोपडे यांनी प्रयत्न केला. हा प्रयोग पुढे जगातील अन्य देशांनी स्वीकारला. आपल्या देशाला याचे महत्त्व कळू शकले नाही. खोपडे हे पोलिस दलातून निवृत्त झाले असले तरी अद्यापही ते सामाजिक भान राखून आहेत. ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी नवसमाज निर्मितीचा प्रयोग मांडला आहे.” डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक