पुणे, दि. ८ जुलै, २०२६ : मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीवर मात करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येलवाडी आणि सांगुर्डी गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा रात्रभर अखंड परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पूर्ववत केला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांचे गावभर कौतुक होत आहे.
चाकण एमआयडीसी उपविभागांतर्गत येणाऱ्या येलवाडी व सांगुर्डी गावांना जोडणारे वीज खांब पूराच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले होते. त्यामुळे या दोन्ही गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या चाकण एमआयडीसी उपविभागाचे अभियंता प्रकाश शेळके, वासुलीचे शाखा अभियंता प्रमोद जाधव व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.
सतत चाललेला मुसळधार पाऊस आणि परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या चिखलामुळे महावितरणची वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नव्हती. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी हार न मानता नवीन वीज खांब आणि इतर आवश्यक अवजड साहित्य स्वतःच्या खांद्यावरून वाहून नेले.
अंधार, पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात कर्मचाऱ्यांनी रात्रभर थांबून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. महावितरणच्या या तत्परतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे येलवाडी व सांगुर्डी गावांमधील वीजपुरवठा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात यश आले आहे.
कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी यांनी कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या या कामगिरीचे आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे.
पानशेत भागातही दरड कोसळल्याने ९ गावे अंधारात; ३५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
पानशेत शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या घोडखल येथे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याची दुसरी मोठी घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीत घोडखल येथील बोराळकर रोहित्र त्याच्या व त्याच्या वीज वाहिन्या संपूर्ण यंत्रणा मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडली गेली आहे. शिवाय दरड कोसळल्यामुळे या भागातील मुख्य रस्ता देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून, तिथपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
त्यामुळे कशेडी गावाच्या पुढील घोडखल, गोंडेखल, दापसरे, कुर्तवडी घोल, टेकपोळे, माणगाव, खानू, चांदर आणि गरजाईवाडी या नऊ गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे या दुर्गम भागातील सुमारे ३५० ग्राहक अंधारात असून, महावितरणचे पथक रस्ता खुला होताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सज्ज आहे.
ताम्हिणीत दरड कोसळली; २५ वीज खांबांसह रोहित्राचे नुकसान, ४०२ ग्राहक अंधारात
आपत्तीची आणखी एक भीषण घटना ११ केव्ही मुळशी ताम्हिणी फिडर अंतर्गत दुपारी दावडी परिसरात घडली. येथे संपूर्ण दरड कोसळून त्याचा मोठा भाग थेट बॅकवॉटरपर्यंत वाहून गेला. या भूस्खलनात महावितरणच्या पायाभूत यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले असून, उच्चदाबाचे १५ आणि लघुदाबाचे १० वीज खांब, एक रोहित्र व त्याचा सांगाडा मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले आहेत. या मोठ्या नुकसानामुळे परिसरातील एकूण ६ गावे अंधारात बुडाली असून, यामध्ये ३७५ घरगुती, २५ व्यावसायिक आणि २ औद्योगिक अशा एकूण ४०२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे व भूस्खलनात वाहून आलेल्या राडा-रोड्यामुळे मर्यादा येत असल्याचे मुळशीचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांनी सांगितले.

