पुणे-अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २५ मेपासून सुरू होणार असून या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
या वर्षीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सुरू करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सुरुवात २५ मेपासून होणार आहे. ज्या शाळेतून विद्यार्थ्यांने दहावीची परीक्षा दिली आहे, त्या शाळेतून विद्यार्थ्यांने अर्ज भरायचा आहे. प्रवेश अर्ज दोन टप्प्यांत भरायचा असून पहिल्या टप्प्यांत विद्यार्थ्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती भरायची आहे. पहिला टप्पा २५ मे पासून भरता येणार आहे.यापूर्वी माहिती पुस्तक विकत घेणे, अर्जाचा पहिला भाग भरणे त्यानंतर दुसरा भाग भरणे अशा टप्प्यांत प्रवेश प्रक्रिया विभागण्यात येत असे. यातील प्रत्येक टप्प्यासाठी ठरावीक मुदत निश्चित करून त्या मुदतीतच विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागत होता. दिलेल्या मुदतीत अर्ज भरण्याचा टप्पा पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागत होते. या वर्षी मात्र प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. यंदा प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावरही विद्यार्थी माहिती पुस्तक विकत घेऊन प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका, लॉग इन आयडी आणि पासवर्ड २५ मेपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून दीडशे रुपयांना मिळणार आहे