पुणे-बंकिम चंद्र यांच्या ‘वंदे मातरम’ या गीताने स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र केले तर रवीन्द्रनाथ टागोर यांचे ‘जनगणमन’ पुढे राष्ट्रगीत झाले. सावरकरांचे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ प्रत्येक देशभक्त व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणते तर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविते. देशभक्तीपर गीतांमध्ये मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागविण्याची ताकत असते. त्यामुळे देशभक्तीपर गीत गाण्याच्या स्पर्धा शाळा – महाविद्यालयांमधून आयोजित केल्या गेल्यास त्यातून मुलांमध्ये तसेच युवकांमध्ये राष्ट्र अभिमान व प्रेम निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
डॉ. विजया वाड यांनी संपादित केलेल्या ‘प्रिय हा भारत देश’ या १०० देशभक्तीपर कवितांचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. ५) राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राज भवन येथे झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
आजच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असले तरीही मुलांना मातृभाषेची गोडी लावणे देखिल तितकेच आवश्यक असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले. देशभक्तीपर गीतांप्रमाणेच गेल्या शंभर वर्षातील शंभर उत्कृष्ट लघु कथा मराठीतून पुस्तक रूपाने संकलित करून ते पुस्तक राज्याच्या सर्व ४३००० गावांमधील मुलांपर्यंत पोहोचविण्याची सुचना राज्यपालांनी यावेळी केली.
‘प्रिय हा भारत देश’ या काव्य संग्रहात विजया वाड यांच्यासह प्रवीण दवणे, प्रियंवदा करंडे, नीला सत्यनारायण, एकनाथ आव्हाड, गौरी कुलकर्णी, निशिगंधा वाड यांसह २७ कवींच्या रचनांचा समावेश आहे.