पुणे- पत्रकारिता आणि जनतेचे प्रश्न यांच्यातील नाते विस्कळीत झाले असून जगभर अशीच परिस्थिती असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त करुन सामाजिक बांधणीमध्ये पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते, असे प्रतिपादन केले.
पुणे येथे महिला व बालविकास या विषयावरील माध्यम कार्यशाळेत ते बोलत होते. युनिसेफ आणि चरखा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन नेटवर्क यांच्या विद्यमाने आयोजित कार्यशाळेस आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आशीष भारती, युनिसेफच्या संवाद तज्ञ स्वाती मोहपात्रा, राजलक्ष्मी नायर, बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत गांगल, डॉ.गोपाळ पंडगे, डॉ. खनिंद्र भुयान, माध्यम समन्वयक तानाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
निळू दामले म्हणाले, पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांशी आपले नाते जोडून घ्यायला हवे. कृषी, विज्ञान, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये खूप काही नवीन करण्यासारखे आहे. खरे पत्रकार कोणत्याही अडचणीचा सामना करु शकतात. फक्त त्यांच्यात समाजाच्या प्रश्नांशी जोडून घेण्याची ऊर्मी हवी. सामाजिक बांधणीमध्ये पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद करुन त्यांनी विविध भागात जाऊन केलेल्या पत्रकारितेचे अनुभव सांगितले.
आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आशीष भारती यांनी माध्यमांचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, सरकार एकटे काम करत नाही, त्यासाठी समाजातील सर्वच घटकांची मदत लागत असते. कुपोषण, बालमृत्यू यासारख्या प्रश्नांबाबत माध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत गांगल यांनी शिशू पोषणाची माहिती समाजाच्या प्रत्येक घटकाला असणे गरजेचे असल्याचे सांगितले. राजलक्ष्मी नायर आणि डॉ. खनिंद्र भुयान यांनी गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्य, पोषण याबाबत माहिती सांगितली. युनिसेफच्या संवाद तज्ञ स्वाती मोहपात्रा यांनी माध्यम कार्यशाळेचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले. कार्यशाळेत विविध राज्यातील माध्यम प्रतिनिधींचा सहभाग होता.