पुणे – केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक विधानभवन सभागृहात श्री. आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार अमर साबळे, खासदार अनिल शिरोळे, सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, समिती सदस्य्, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
श्री. आढळराव-पाटील म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरुन प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. तसेच काही विकास कामे तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणीमुळे प्रलंबित असल्यास त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
खासदार अमर साबळे म्हणाले, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी.
खासदार अनिल शिरोळे म्हणाले, विविध विभागप्रमुख व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. या बैठकीचे महत्व लक्षात घेवून संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी बैठकीस नियमित उपस्थित रहाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देवून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, जिल्ह्यात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व केंद्र पुरस्कृत योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत.
यावेळी समिती सदस्यांनी वीज पुरवठा, रस्त्यांची कामे, शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह, आरोग्य, शिक्षण पोषण आहार आदी विषयां बाबत केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतली.
या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, भूमी अभिलेख्यांचे संगणकीकरण, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, अटल मिशन फॉर रिजुव्हीनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत ), स्मार्ट सिटी मिशन, राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन-नॅशनल रुरबन मिशन आदी योजनांचा खासदार आढळराव-पाटील यांनी आढावा घेतला.