पुणे, – पंतप्रधान कौशल्य विकास योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि स्वयंपूर्ण व्हावे असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव काळात गणेश मंडळाच्या सहकार्याने संवादपर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कसबा गणपती सार्वजनिक गणेश मंडळ येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सहसचिव भूषण रुपदे उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.निनाळे म्हणाले की, व्यावसायीक व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्यावतीने भरती मेळावे व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतात. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेद्वारे युवकांना मोठया प्रमाणावर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. युवकांनी याचा लाभ घेऊन देशाला व राज्याला प्रगतीपथावर न्यावे. मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या मेक इन महाराष्ट्र योजनेमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासाठी युवकांनी व्यावसायीक शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी संवादपर्व उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. युवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक मोठया संख्येने उपस्थित होते