पुणे : भारतात बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा असून आगामी काळात तो अधिक जटील
होईल. नवे रोजगार निर्माण करण्यातील प्रचंड अनुशेष बाकी असताना तंत्रज्ञान बदलाच्या वेगामुळे
सध्याचे रोजगारही धोक्यात आले आहेत. या आव्हानावर मात करायची असेल तर उद्योजकता विकास
हाच प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व विचारवंत लेखक अच्युत गोडबोले यांनी
येथे केले.
‘देआसरा फाऊंडेशन’ने नवोदित व्यावसायिकांना समविचारी उद्योजकांशी जोडण्याच्या हेतूने सुरु केलेल्या ‘देआसरा कनेक्ट क्लब’चे उद्घाटन श्री. गोडबोले यांच्या हस्ते झाले. जागतिक उद्योजकता दिनाचे औचित्य साधून पर्सिस्टंट कंपनीच्या देवांग मेहता सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘व्यावसायिक यशाचा मूलमंत्र’या विषयावर ते बोलत होते. ‘देआसरा फाऊंडेशन’चे संचालक एस. आर. जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले, उद्योगमित्र, तसेच शहरातील उद्योजक, व्यावसायिक याप्रसंगी उपस्थित होते.उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा दीर्घकालीन उपक्रम असतो आणि तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे ‘देआसरा फाऊंडेशन’चे कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगून श्री गोडबोले म्हणाले, की भारतात आजघडीला वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण होण्याची गरज आहे, परंतु गेल्या वर्षाचे उदाहरण घेतले तर केवळ १.३० लाख नोकऱ्या तयार झाल्या. देशांतर्गत एकूण उत्पादनाचा (जीडीपी) वेग ७ टक्के असताना रोजगार निर्मितीचा वेग केवळ १.३ टक्के राहिला. यातून रोजगाराचा प्रचंड अनुशेष निर्माण झाला आहे.
दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान व ऑटोमेशन यांच्या वेगामुळे जुने ते कालबाह्य होण्याचे प्रमाणही वाढत आहे.
बड्या कंपन्यांतील ऑटोमेशनमुळे चालू वर्षी एकट्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चार लाख नोकऱ्या
संपुष्टात येतील, असा अंदाज आहे.
ते पुढे म्हणाले, की सध्याच्या काळात स्थिर व दीर्घकालीन नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. आधुनिक
तंत्रज्ञानामुळे जुने रद्दबातल होत असले तरी नवनव्या संधीही निर्माण होत आहेत. पुढील काळ हा सेवा क्षेत्र, तसेच छोट्या व मध्यम उद्योगांतून (एसएमई) रोजगार निर्मितीला पोषक आहे. उद्योजकता शालेय
वयापासूनच रुजवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत आणि पालकांनीही आपल्या मुलांवर नोकरी लादण्यापेक्षा
उद्योग उभारण्यात त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. उद्योजक म्हणून घडत असताना तरुणांमध्ये
दूरदृष्टी व ध्येयाप्रति एकाग्रता हे गुण बाणवणे आवश्यक आहे. कल्पकता ही फक्त दैवी देणगीच नसून ती
शिकूनही साध्य करता येते. जोखीम घेणाऱ्या व्यावसायिकांना अपयश किंवा अडथळे आल्यास त्यांना
आधार देण्याची व्यवस्था सरकारने उभारली पाहिजे.
‘देआसरा फाऊंडेशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले यांनी यावेळी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. येत्या पाच वर्षांत २५००० व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यातून किमान एक लाख रोजगार निर्माण करण्याचे ‘देआसरा’चे ध्येय आहे. या फाऊंडेशनने स्थापनेनंतर अल्पावधीतच मार्गदर्शन पुरवून ६२नवउद्योजक घडवले आहेत. कल्पकता आणि व्यवसायाची जिद्द असणाऱ्यांचा अनुभवी उद्योजकांशी संपर्क घडवावा, या हेतूने ‘देआसरा कनेक्ट क्लब’ स्थापन करण्यात आला आहे. फाऊंडेशनचे सहकार्य लाभलेले व्यावसायिक आपोआप या क्लबचे सदस्य होतील आणि संपर्क मेळावे, उद्योग क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने आदी उपक्रमांचा त्यांना विनाशुल्क लाभ होईल. उद्यमशील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी ‘देआसरा’ने ‘यशस्वी उद्योजक’ हे मासिक सुरु केले असून ‘बिझनेस इन ए बॉक्स’ या नावाने विविध व्यवसायांची सूचीही आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
फाऊंडेशनच्या उद्योगमित्र रुपाली श्रीश्रीमाळ यांनी स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.