राष्ट्रीय सीएसआर परिषद : ५०१ सेवाभावी संस्थांच्या परिचय पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सीएसआर निधीतून अनेक चांगले प्रकल्प सेवाभावी संस्था राबवीत असतात, त्यामुळे अनेक चांगले बदल सामाजात घडून येत आहेत. सरकार प्रत्येकासाठी चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतू प्रत्येकच गोष्ट सरकार करेलच या विश्वासावर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपले योगदान दिले तर सशक्त समाजासाठी आवश्यक असे कार्य होवू शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सोशल रिस्पोन्सिबिलीटीच्या माध्यमातून राष्ट्रीय सीएसआर परिषदेचे आयोजन पं. भीमसेन जोशी कलामंदीर, औंध येथे करण्यात आले होते. सीएसआर हेल्पलाईन व ५०१ एनजीओच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री. शेखर मुंदडा, भारत विकास ग्रुपचे मुख्य संचालक श्री. हनुमंतराव गायकवाड, पुण्याचे विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी, पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त श्रीमती कांचनगंगा जाधव, हिवरे बाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार, कोहिनूर ग्रुपचे मुख्य संचालक श्री. कृष्णकुमार गोयल, दे आसरा फाउंडेशनचे संचालक श्री. एस. आर. जोशी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे श्री. हर्षल विभांडीक, सोशल रिस्पोन्सिबिलीटीचे अध्यक्ष श्री. विजय वरुडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर पूज्य श्री. श्री. रवीशंकरजी गुरुजींनी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या एनजीओना ‘एकत्रित’ कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘वसुधैव कुटुंबंम’ असे समजून सर्वांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येवून कार्य करावे, असा संदेश यावेळी गुरुजींनी दिला.
हिवरे बाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार म्हणाले की, आजच्या घडीला पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती होताना दिसून येते, ही चांगली बाब आहे. मात्र, पाणी आडवा, पाणी जिरवा यांच्या बरोबरीने उपलब्ध असलेले पाणी विवेकाने वापरणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याचा ताळेबंद राखणे ही खरी काळाची गरज आहे.
विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी म्हणाले की, कॉर्पोरेट आणि एनजीओ यांच्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. एनजीओला काम करताना नक्की कोणत्या अडचणी येतात, हे कॉर्पोरेट जगताने समजावून घेताना त्यांना मदत करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. याचबरोबरीने अशा कार्यामध्ये महापालिकेला देखील निश्चितच सामाविष्ट करून घेता येवू शकेल.
धर्मादाय सहआयुक्त श्रीमती कांचनगंगा जाधव म्हणाल्या की, सर्वच एनजीओना नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे सीएसआर निधी मिळविण्यासाठी मदत होते, तसेच याविषयीच्या मार्गदर्शनासाठी लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी भारत विकास ग्रुपचे संचालक हनुमंतराव गायकवाड म्हणाले की, अनिवासी भारतीय नागरिक भारताच्या विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी तत्पर असतात. परंतू त्यांच्याकडे त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एनजीओची माहिती उपलब्ध नसते. संकेतस्थाळाच्या माध्यमातून आपण ही माहिती उपलब्ध करून दिल्यास याचा फायदा निश्चितच होईल.
यावेळी बोलताना कोहिनूर ग्रुपचे मुख्य संचालक श्री. कृष्णकुमार गोयल म्हणाले की, समाजातील चांगल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारे अनेक लोक आहेत. परंतू, आपला निधी नीट वापरला जातोय ना, याबाबत ते साशंक असतात. अशा वेळी एनजीओने आपल्या कामाचा ठसा उमटविला तरच असे निधी उपलब्ध करून देणारे अनेक लोक या कार्यात आनंदाने सहभागी होतील.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्री. शेखर मुंदडा यावेळी म्हणाले की, पूज्य गुरुजींच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेतून ही एनजीओ व कॉर्पोरेट यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आम्ही मांडली. या संकल्पनेला एनजीओ व कॉर्पोरेट या दोन्ही घटकांनी चांगला पाठींबा दिल्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी एनजीओसाठी ९टी (9T) ही संकल्पना शेखर मुंदडा यांनी मांडली. या कार्यक्रमात भारत विकास ग्रुप, सुमेरू बेव्हरेजेस व कोहिनूर ग्रुप यांनी मोलाचा वाटा उचलला. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री. शेखर मुंदडा यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधीर गाडगीळ यांनी तर आभारप्रदर्शन सोशल रिस्पोन्सिबिलीटीचे अध्यक्ष श्री. विजय वरुडकर यांनी केले. ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.