पुणे: एका व्यक्तीचे अवयवदान हे अनेक लोकांच्या अवयव प्रत्यारोपनासाठी उपयुक्त ठरत असल्याने भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये वर्षानुवर्षे अवयव प्रत्यारोपनासाठी वाट पाहत असलेल्या रुग्णांच्या “वेटिंग लिस्ट” मध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून अवयवदानासंबंधी समाजामध्ये जागृती आवश्यक असल्याचे तसेच अवयव दानामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग अग्रेसर असल्याने विशेषतः शहरी भागाची याबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र शासनाच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य समन्वयक आरती गोखले यांनी व्यक्त केले.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या वैद्यकीय-मनोवैद्यकीय सामाजिक विभाग तसेच समुपदेशन विभागाच्या वतीने अवयवदान व अवयव प्रत्यारोपण संबंधी आयोजित एक दिवशीय कार्यशाळेमध्ये आरती गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर हे होते तर डॉ अनुराधा पाटील, प्रा. दादा दडस व प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरती गोखले यांनी वैद्यकीय-मनोवैद्यकीय सामाजिक विभाग, समुपदेशन विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विद्यार्थ्यांना अवयवदान व अवयव प्रत्यारोपनासंबंधी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना यावेळी “ब्रेन डेड” आणि “ग्रीन कोरिडोअर” या काय संकल्पना आहेत तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना कोण-कोणत्या अवयव दानासंबंधी व कशापद्धतीने समुपदेशन केले जाते यासंबंधी उदाहरणासहीत मार्गदर्शन केले.
भारतामध्ये अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्य हे गतवर्षी ५९ अवयवदान करणारे तामिळनाडू पाठोपाठ दुसरे आघाडीचे राज्य ठरले असून जनजागृतीमध्ये पुणे जिल्हा हा अग्रेसर असल्याचे मत देखील गोखले यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेमध्ये सहभागी असणाऱ्या २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी अवयवदानासंबंधी स्वेच्छेने नोंदणी केली.
डॉ वलोकर, डॉ अनुराधा पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. दादा दडस यांनी प्रास्ताविक केले
प्रज्ञा थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. चेतन दिवाण यांनी आभार मानले