बारामतीमध्ये ४१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
बारामती -केवळ नवनिर्मितीच्या संकल्पना मांडून चालणार नाही तर अशा कल्पनांचे उत्पादनात रुपांतर झाले तरच त्याचा देशाला उपयोग होईल असे स्पष्ट मत येथे जागतिक कीर्तीचे संशोधक आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले .
डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते आज बारामतीमध्ये ४१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शालेय शिक्षण विभाग, विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार सुप्रिया सुळे, अजितदादा पवार शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सिस्काचे प्रमुख राजेश उत्तम चंदानी, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने, शिक्षण संचालक नामदेव जरग आणि विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. काकोडकरांनी देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी नवीन संशोधक घडवण्याची अवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ‘यासाठी मुलांमधील संशोधनाच्या उर्मीला चालना द्यायला हवी. मुलांना ज्ञान देत त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे, असे ते म्हणाले. ‘ज्या देशात उत्तम संशोधन झाले,’ त्या देशांनी प्रगती केली. त्यामुळे संशोधन, तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची भूमिका हवी. नवनिर्मितीच्या संकल्पना फक्त मांडून चालणार नाही, तर त्या कल्पनांचे रूपांतर उत्पादनात झाले तरच त्याचा राष्ट्राला उपयोग होईल,’ असे मार्गदर्शन डॉ. काकोडकरांनी केले.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपले विचार आज या प्रदर्शनात व्यक्त केले. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे असल्याचे विनोद तावडे यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना तंत्रज्ञान कसे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे, हे सांगितले. संशोधनामुळे आपले जीवन सुखकर झाले असले तरी या तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हायला हवा असेही त्या म्हणाल्या.
हा उपक्रम सकाळ माध्यम समूह आणि सिस्कातर्फे प्रायोजित करण्यात आला .