पुणे –
विद्यार्थांना शिकविताना त्यांना त्या-त्या विषयांचे ज्ञान मिळाले कसे मिळेल हे पाहिले पाहिजे,त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना शिकविले पाहिजे ;पण कोणत्याही परिस्थिती मुलांना शिक्षण हे शिक्षेसारखे वाटले नाही पाहिजे असे समुपदेशन सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे शिक्षकवर्गांना केले.
महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गुणात्मक शिक्षण पद्धतीला चालना मिळावी यासाठी शिक्षक – पालक यांच्यासाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जयश्री बागुल , माजी उपमहापौर आबा बागुल आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सत्वशीला चव्हाण यांनी विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. सुमारे एक हजार पालक या कार्यशाळेला उपस्थित होते.
यावेळी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण म्हणाल्या कि, मुलांवर चांगले संस्कार हे जितके महत्वाचे आहे त्यापेक्षाही त्यांच्या कलेनुसार त्यांच्याशी वागणे महत्वाचे आहे. शिक्षक मुलांची दुसरी आई आहे. मुले सगळ्यात जास्त वेळ शिक्षकांबरोबर असतात. मुलाने एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर आपल्याला माहित नसले तर त्याला चुकीची माहिती देऊ नका पहिले तुम्ही समजून घ्या मगच त्याला माहिती द्या . शिक्षकवर्गानी मुलांना शिकविताना त्यांना शिक्षण देत आहोत, ज्ञान मिळणार आहे यानुसारच शिकवावे. कोणत्याही परिस्थितीत मुलांना शिक्षण हे शिक्षेसारखे वाटले नाही पाहिजे. विविध विषयांचा अभ्यास घेताना मुलांवर सक्ती कदापि नको. त्यात मुलांची मतेही जाणून घ्या, त्यांना काय वाटते, ते काय म्हणतात याचा आदर केल्यास गुणात्मक शिक्षण मुलांना देणे सहजशक्य आहे.पालकांनी मुलाला काय हवे आहे त्याची काय मागणी आहे ते जाणून घ्या आपण ती पूर्ण करू शकत नसल्यास त्यांच्याशी संवाद करा आणि त्यातून मार्ग काढा मुलांशी संवाद केल्याने त्याला त्याची जाणीव होते . पालकांनी मुलांवर सक्ती कधीच केली नाही पाहिजे. तुमची तक्रार असते , हा किंवा ही कधीच ऐकत नाही, उलट उत्तरे देतात ती का देतात याचा आधी विचार केला पाहिजे.असेही त्या म्हणाल्या.
समुपदेशन ही काळाची गरज आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात त्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देताना शिक्षक -पालकांसाठी समुपदेशन आवश्यक असल्याची भूमिका माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मांडली. ते म्हणाले मुलांवरील चांगल्या संस्कारासाठी ,त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये घेतल्या पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले.