यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारा, बर्लिनसारख्या मानाच्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकाविणारा, ‘इफ्फी’, ‘मामि’ आणि ‘पिफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला अविनाश अरूण दिग्दर्शित ‘किल्ला’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी २६ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच भाषेच्या आणि राज्याच्या सीमा तोडून सर्व प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला ‘किल्ला’ आता महाराष्ट्रासहित गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांमध्येही प्रदर्शित होणार असून तो तब्बल २२५ चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येतोय हे विशेष. एम. आर. फिल्म्स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांसोबत अमृता सुभाष ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे.
लहान मुलांच्या तरल भावविश्वाभोवती ‘किल्ला’ चित्रपटाची गोष्ट फिरते. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून गुहागरला आलेल्या चिन्मय ऊर्फ चिनूची ही कथा आहे. पुण्यासाऱख्या शहरातून कोकणात आलेल्या चिन्मयला नव्या वातवरणाशी जुळवुन घेणं अवघड जात असतानाच त्याच्या आयुष्यात त्याच्याय वर्गातील चार उनाड मित्र येतात. या मित्रांमुळे चिनूलाही त्याच्यातलाच एक वेगळा पैलू सापडतो. काही दिवसांतच एकमेकांचे चांगले मित्र बनलेल्या या पाचही जणांच्या आय़ुष्यात एक अशी घटना घडते जिथे चिनू या सर्वांपासून तुटुन एकटा पडतो आणि तिथूनच त्याचा स्वतःच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. उनाड वयाची पायरी ओलांडून जाणत्या वयाचा उंबरठा ओलांडण्याचा त्याचा हा प्रवास त्याला खुप काही शिकवून जातो. या सर्व प्रवासाची कथा म्हणजे ‘किल्ला’ हा चित्रपट.
कोकणच्या निसर्गसौंदर्याचा नितांत सुंदर अनुभव देणा-या अप्रतिम छायाचित्रणाने नटलेला असा हा ‘किल्ला’ चित्रपट. साधी सरळ पण मनाला थेट भिडणारी कथा आणि कलाकारांचा तेवढाच संयत अभिनय यामुळे किल्लाने यापूर्वीच अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवल्यानंतर अनेक प्रेक्षक किल्लाची आतुरतेने वाट बघत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून शुक्रवारपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यावर्षी ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ आणि ‘टाइमपास २’ सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.