मुंबई – गेली अनेक वर्षं हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या विश्वात रमलेल्या सुमीत
राघवनचं मराठीतलं पदार्पण म्हणून सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलेल्या ‘संदूक’ या
चित्रपटाच्या धम्माल संगीताचं अनावरण मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात झालं.
चित्रपटाशी संबंधित सर्व प्रमुख कलावंत, तंत्रज्ञ आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत
अतिशय अनौपचारिक पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या संगीत
अनावरण सोहळ्यामुळे चित्रपटात नेमकी काय धमाल पाहायला मिळणार आहे, याची
चुणूकच उपस्थितांना बघायला मिळाली.
‘ओरँजेन एंटरटेनमेंट’चे विश्वजीत गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती
असलेल्या ‘संदूक’मधून सुमीत मराठी चित्रपटांत प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार
असून ‘बाळकडू’च्या यशानंतर पुन्हा एकदा अतुल काळेचं कुशल दिग्दर्शन या चित्रपटातून
अनुभवता येणार आहे. १९४०च्या दशकातील गोष्ट मांडणारा ‘संदूक’ हा ऐतिहासिक–विनोदी
चित्रपट आहे. मराठीत गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या ज्यॉनरचे चित्रपट बनत असून
त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर संदूकच्या
निमित्ताने प्रथमच ऐतिहासिक–विनोदी या आगळ्यावेगळ्या ज्यॉनरचा चित्रपट बघायला
मिळणार आहे. सुमीत राघवन आणि भार्गवी चिरमुले या प्रमुख जोडीबरोबर शरद पोंक्षे,
अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे यांसारख्या कसलेल्या अभिनेत्यांची जुगलबंदी अनुभवता
येणार आहे.‘मातीच्या चुली’, ‘दे धक्का’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘तिचा बाप त्याच बाप’, ‘असा मी
अशी ती’ आणि ‘बाळकडू’ यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर ‘संदूक’मधून प्रथमच गतकाळ
उभा करणारा दिग्दर्शक अतुल काळे म्हणतो, “‘संदूक’ हे माझं ब-याच वर्षांपासूनचं स्वप्न
आहे. शक्य असतं तर माझा पहिला चित्रपट म्हणून ‘संदूक’च बनवणं मला आवडलं असतं.
माझं हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी १२ वर्षं लागली आहेत. त्यामुळे मी अर्थातच आनंदी
आहे आणि आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ या स्वप्नाला लाभणं हा माझ्यासाठी
दुग्धशर्करा योग आहे. सुमीतशी माझी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मैत्री असून
‘संदूक’साठी अन्य कोणत्याच नावाचा विचार करणं मला अशक्य होतं.”
यासंदर्भात सुमीत म्हणतो, “‘संदूक’ माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकतर हा माझा
पहिला मराठी चित्रपट आहे. दुसरं म्हणजे माझा बालपणापासूनचा मित्र अतुल काळे याच्या
दिग्दर्शनात मला काम करायला मिळणार आहे. हा खूप भव्य, महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.
इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली, असं मी म्हणेन.”
विश्वजीत गायकवाड म्हणाले, “३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘येड्यांची
जत्रा’ या आमच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आमची
‘ओरँजेन एंटरटेनमेंट’ ही कंपनी चांगल्या संहितेच्या शोधात होती. ‘संदूक’ ज्या प्रकारे
आकाराला आला आहे, ते पाहाता प्रेक्षकांना हाही चित्रपट आवडेल, याची आम्हाला खात्री
आहे. ‘संदूक’मध्ये सकस आशय आहे, विनोदाचा शिडकावा आहे, अॅक्शन आहे, पण याचं
सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट १९४०च्या दशकातील आहे. ‘संदूक’ची सर्वांनाच भुरळ
पडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशिष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी
लिहिली असून हृषिकेश जोशी याचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी
यांनी पार पाडली असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. गुरू ठाकूरच्या गाण्यांना
अजित-समीर या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं असून वेशभूषा महेश शेर्ला यांची, तर
अॅक्शन संकल्पना प्रद्युम्नकुमार यांची असणार आहे. येत्या ५ जून रोजी हा चित्रपट
प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.