शिलाँग
आपल्या प्रेरक जीवनातून देशातील तरुणाईच्या स्वप्नांना उमेदीचे ‘अग्निपंख’ देणारे भारताचे मिसाइल मॅन, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शिलाँग येथील ‘आयआयएम’मध्ये व्याख्यान देत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ. कलाम यांना अस्वस्थ वाटून ते व्यासपीठावरच कोसळले. त्यांना तातडीने नॉनग्रिम हिल्स येथील बेथनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पद कोणतेही असो, नेहमी शिक्षकाच्याच भूमिकेत असणाऱ्या डॉ. कलाम यांना मृत्यू आला तो ज्ञानदान करतानाच! ८४व्या वर्षीही कार्यरत असलेल्या डॉ. कलाम यांच्या आकस्मिक निधनाने देशभरात हळहळ व्यक्त होत असून, देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक जीवनाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती’ असा बहुमान मिळालेल्या डॉ. कलाम यांना राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरांतील मान्यवरांनी आदरांजली वाहिली असून, केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ) – डॉ. कलाम यांचे व्यक्तिमत्त्व अगदी वेगळे होते. ‘भारताचे भविष्य मुलांमध्ये आहे, हे त्यांनी नेमके ओळखले होते. त्यामुळेच ते सातत्याने विद्यार्थी आणि तरुण पिढीची संवाद साधत. तरुण पिढीला मुद्दाम भेटून त्याच्या हृदयाला स्पर्श करणारे असे डॉ. कलाम होते. त्यांनी देशाला दिशा दाखविण्याचे काम केले. ‘भारत काहीही करू शकतो’ हे ‘स्पिरिट’ आणि विश्वास त्यांनीच आपल्याला दिला. त्यांचे हे ‘स्पिरिट’ पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
डॉ. गोविंद स्वरूप (रेडिओ ॲस्ट्रोलॉजिस्ट्) – डॉ. कलाम यांनी देशाला महासत्तेचे स्वप्न दाखविले. विज्ञान, तंत्रज्ञानाबरोबरच शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीचा विचार त्यांनी आयुष्यभर केला. राष्ट्रपती झाले तरीही ते राजकारणी कधीच झाले नाही. देशाचा विकास हाच त्यांना ध्यास होता. त्यांच्या जाण्याने जगाचे तर नुकसान झालेच. त्याबरोबर तरुणांना स्फूर्ती देणारा नेताही हरपला आहे. पोखरणच्या अणुस्फोट चाचणीतही त्यांचे विशेष योगदान होते; तसेच त्यांचे क्षेपणास्त्रविषयक संशोधनही मोलाचे आहे. मी बोलविले तेव्हा ते माझ्या विनंतीला मान देऊन ‘आयुका’मध्ये आले होते.
डॉ. विजय भटकर (ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ) – विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातल्यास देशाची प्रगती वेगाने होईल, असे डॉ. कलाम यांनाही वाटत होते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) ते संचालक असताना मी इलेक्ट्रॉनिक सिस्टिम विभागाचा प्रमुख होतो. त्या काळी आमच्यात अनेक वेळा संवाद होत. ‘अवकाश संशोधनात भारत खूप प्रगती करेल’, असे डॉ. कलाम आम्हाला नेहमी सांगत. आज त्यांचा आत्मविश्वास प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसते. त्यांनी आम्हाला ‘सुपर कॉम्प्युटर’साठीही प्रोत्साहन दिले. भारत प्रगत राष्ट्र कसे होईल, याची दृष्टी डॉ. कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’मधून दिली. ते एक आदर्श योजक आणि महत्त्वाकांक्षी होते. अनेक अभियंत्यांना त्यांनी आजवर मार्गदर्शन केले असून प्रत्येकात प्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
भारतरत्न सी. एन. आर. राव – डॉ. कलाम हे थोर राष्ट्रवादी होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानप्रसार करण्यात ते रमत. या निमित्ताने अनेक वेळा त्यांचा सहवास मला लाभला. मनाने इतका निर्मळ माणूस फारच दुर्मिळ म्हणावा लागेल