पुणे -‘उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये संख्यात्मक वाढ दिसत असली, तरी गुणात्मक वाढीबाबत मोठी झेप घेणे गरजेचे आहे,’ असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्यासाठी कौशल्याधारित शिक्षणाची बाब गांभीर्याने घेऊन २०३० पर्यंत ५० कोटी जनतेपर्यंत ते पोहोचविण्याचे अभियान हाती घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपती बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पतंगराव कदम यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या संग्रहालयाचेही राष्ट्रपतींच्या हस्ते उद घाटन करण्यात आले. शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत विकसित देशांची बरोबरी करण्यासाठी भारतातील खासगी शैक्षणिक संस्था फार महत्त्वाची भूमिक पार पाडू शकतात. शैक्षणिक संस्थांच्या संख्यात्मक वाढीसोबतच या संस्थांनी गुणवत्तेचाही ध्यास घेणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. नावीन्याचा ध्यास घेतलेली समाजाभिमुख संशोधने आणि सामाजिक बदलांना चालना देणारी शिक्षणपद्धती भविष्यात देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पवार, शिंदे, चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक केले.