पठडीबाहेरचे विषय घेऊन मराठीत सध्या सिनेमे केले जात आहेत. प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. असा्च एक पठडीबाहेरचा आगळावेगळा आणि धमाल मस्ती असलेला ‘पीजी’ म्हणजेच ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. लाडे ब्रदर्स फिल्म प्रा.लि ची निर्मिती असलेल्या आणि डॉ. अंबरीश बी. दराक यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची म्हणजेच ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही गोडजोडी या सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. सिनेमाचे निर्माते जयंत लाडे असून रोहन शिंदे-नाईक व बाबासाहेब येलपाले हे सहनिर्माते आहेत. लाडे ब्रदर्स फिल्म्स प्रा.लि. आणि डॉ.अंबरीश बी. दराक प्रस्तुत ‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाला असून येत्या २९ मे ला रिलिज होत आहे. स्वाती चांदोरकर यांनी या सिनेमाला आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘अ पेईंग घोस्ट’ या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. एक वेगळीच कथा या सिनेमात रेखाटण्यात आली असून धमाल मस्ती या सिनेमात बघायला मिळणार आहे. उमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, श्रावणी पिल्लई, सनवी नाईक, समृद्धी साळवी, मॄणाल जाधव, सिद्धी कोळेकर, खुशबू कुलकर्णी, अतुल परचुरे, अनिता दाते, समिर चौघुले, उमा सरदेशमुख, उमेश दामले, श्रीरंग देशमुख, कांचन पगारे, भूषण तेलंग, पौर्णिमा अहिरे, गिरीश जोशी, मंगेश दिवाणजी, अजय टिल्लू, सिद्धेश्वर झाडबुके आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका या सिनेमात असणार आहेत. इतकी मोठी कलाकारांची फौज आहे म्हटल्यावर सिनेमात नक्कीच काहीतरी धमाल घडणार आहे.
‘अ पेईंग घोस्ट’ सिनेमाची कथा वसंत पुरूषोत्तम काळे यांची असून कथाविस्तार श्रावणी आणि सुश्रूत यांनी केला आहे. तर संवाद संजय मोने यांनी लिहिले आहेत. सिनेमटोग्राफीची जबाबदारी प्रसाद भेंडे यांनी सांभाळली असून सिनेमाला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. तर वैभव जोशी यांनी सिनेमातील गाणी लिहिलीये. व सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी दिपाली विचारे आणि सुभाष नकाशे यांनी केली आहे.
सिनेमाबाबत दिग्दर्शक सुश्रूत यांनी सांगितले की, ” ‘अ पेईंग घोस्ट’ हा सिनेमा प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या ‘बदली’ या कथेवर आधारीत आहे. माझी मैत्रिण श्रावणी पिल्लई आणि मी सिनेमाची कथा लिहिली आहे. आम्ही दोघेही या फॅमिली एन्टरटेन्मेंट असलेल्या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी योग्य निर्मात्यांच्या शोधात होतो. तेव्हा आम्ही या सिनेमाची कथा जयंत लाडे यांना ऎकवली आणि त्यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यात रस दाखवला. शिवाय पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद आहे. सर्वांनीच मला खूप सहकार्य केले. मला आवार्जून माझे निर्माते जयंत लाडे यांचा उल्लेख करायचा आहे कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला”.