पुणे – टेरिफ कार्ड नाहीच -मीटरप्रमाणे च रिक्षा भाडे घ्या अन्यथा 1 हजार रुपये दंड अशी भूमिका उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी जाहीर केली आहे आणि मीटर रिकॅलिबरेशन केल्याशिवाय वाढीव भाडे घेणे नियमबाह्य आहे. त्यामुळे कोणताही रिक्षाचालक जर याप्रकारे जादा भाडे आकारत असेल तर त्याची तक्रार प्रवाशांनी आरटीओकडे करावी. असे आवाहन हिप्रवासी वर्गाला केले आहे
रिक्षा मीटर रिकॅलिबरेशन (पुर्नप्रमाणिकरण) केल्याशिवाय टेरिफ कार्ड दाखवून वाढीव दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. अशा प्रकारे रिकॅलिबरेशन न करता जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकाची तक्रार प्रवाशांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) करता येणार आहे. या तक्रारीच्या आधारे आरटीओच्या वतीने त्या रिक्षाचालकाकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.
पुणे शहर व परिसरामध्ये एक जुलैपासून रिक्षा भाडेवाढ लागू झाली आहे. मीटर रिकॅलिबरेशन केल्याशिवाय वाढीव भाडे आकारू नये, असा नियम आहे. मात्र, भाडेवाढीच्या पहिल्या दिवसापासून रिक्षाचालकांनी मीटर रिकॅलिबरेशनशिवाय जादा भाडे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. जादा भाडे आकारल्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवले.
रिकॅलिबरेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रिक्षाचालकांचे नुकसान टाळावे, यासाठी रिक्षा संघटना प्रयत्न करीत आहेत. संघटनेच्या प्रयत्नांना प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देत आहे, असे रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले. रिकॅलिबरेशनच्या कामास जर जास्त कालावधी लागत असेल तर संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.