मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या चार दिवसापासून मराठवाड्यात व आज अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी भागाची पाहणी केली. ही परिस्थिती पाहता पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, प्रत्येक हाताला काम मिळेल, याचे सूक्ष्म नियोजन करण्यास सांगितले आहे. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आवश्यकता भासल्यास जनावरांच्या छावण्या सुरु करण्यात याव्यात, जनावरांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 10 टक्के अधिकचे पाणी कसे उपलब्ध होईल, याचे सूक्ष्म नियोजन करावे. मागेल त्याला काम आणि मागेल त्याला जॉबकार्ड देण्यात येईल. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, म्हणून वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावामध्ये लोकप्रतिनिधींनी जावे, तेथे राज्य शासन दुष्काळ निवारणासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी.
जलयुक्त शिवार अभियान, शेततळे, कम्पार्टमेंट बंडिंगची कामे सुरु करावी. पाऊस झाल्यास विकेंद्रीत जलसाठे तयार होतील, त्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीत उपयोग होऊ शकेल. वीज बील वसूली स्थगितीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्याला मिळणाऱ्या दुष्काळाच्या सवलतीप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यालाही सवलती मिळाव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे.
श्रीमती गुंड, आमदार श्री. मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी श्री. कवडे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.