मुंबई -जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी 2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 10000 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात आली आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. हळूहळू हा उपक्रम ३० जिल्ह्यात सुरु करण्यात येईल.