चेन्नई
अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आज (शनिवारी) सकाळी ११ वाजता झालेल्या सोहळ्यात जयललिता यांनी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांना मंत्रिमंडळात जयललिता यांच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.याआधी शुक्रवारी ओ पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमताने जयललिता यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. विधिमंडळ गटनेनेतपदी निवड झाल्यामुळे राज्यपालांनी नियमानुसार जयललिता यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास राजभवनाकडे निघालेल्या वाहनांच्या ताफ्यातून तब्बल २१७ दिवसांनंतर जयललिता पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गराड्यातून वाट काढत त्यांनी राज भवनात गाठले. राज्यपाल के. रोसय्या यांची भेट घेऊन त्यांनी विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याच्या निर्णयाची प्रत राज्यपाल रोसय्या यांना दिली. त्याचबरोबर मंत्र्यांची यादीही राज्यपालांकडे सोपवली.