पुणे (प्रतिनिधी) : देश आणि समाज जोडण्याचे काम साहित्य , कला , संस्कृतीच्या माध्यमातून होत आहे . त्यामुळे साहित्याची शक्ती हि सर्वात जास्त आहे . आपण आर्थिक दृष्ट्या सबळ झालो तरी समाजजीवन आणि व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी संस्कार आणि विचार महत्वाचा आहे असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.
साहित्य , कला , संस्कृती ने होते समाज जोडण्याचे काम -नितीन गडकरी
येथील सरहद्द संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे उदघाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले , त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार , संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजीत पातर, पालक मंत्री गिरीश बापट , अभिनेते धर्मेंद्र , सरदार त्रिलोचनसिंग , एस. एस. विर्क , पी. एस. पसरीचा , संजय नहार आदी उपस्थित होते . यावेळी संमेलन पुरस्कार प्रदान करण्यात आले . त्यामध्ये सर्वश्री धर्मेंद्र , डॉ. त्रिलोचनसिंग , डॉ. एस. पी. सिंग ओबेरॉय , डॉ. केवल धीर, उज्जल दोसांझ तसेच चरणजीत कौर नंदा आणि राजी शिंदे यांचा समावेश आहे. संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुक चे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
तीन दिवसीय संमेलनाला देशाच्या विविध भागातून आणि अकरा देशातील साहित्यिक ,रसिक उपस्थित आहेत. श्री गडकरी म्हणाले , साहित्य, संस्कृती , कला हि आपली शक्ती आहे आणि संपूर्ण जगात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे . गुरु गोविंदसिंग यांनी समाजाला , देशाला विचाराने प्रेरणा दिली आहे .मुळामध्ये साहित्य हे समाजाला प्रेरणा आणि दिशा देत असते. आज सगळ्या क्षेत्रात परिवर्तन होत आहे. विज्ञान , तंत्रज्ञान याचा प्रभाव वाढत आहे . मात्र सशक्त समाजाला सुसंस्कारित करण्यासाठी साहित्याची आवश्यकता आहे . यामुळे देश , समाज आणि व्यक्तिगत पातळीवरही समृद्धता येते. हि आज देशाची गरज आहे. आपला इतिहास , कला आणि संस्कृती नवीन पिढी पर्यंत जाण्यासाठी साहित्य हा प्रभावी मार्ग आहे. त्यासाठीच साहित्याचा संस्कार गरजेचा आहे. अनेक भाषा – एक देश हा विचार संमेलनामुळे अधिक बळकट होणार आहे .
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरवात पंजाबी भाषेतून केली आणि उपस्थितांना सुखद धक्का दिला . ते म्हणाले , या संमेलनाच्या माध्यमातून दोन राज्यांचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. पंजाबी साहित्याने साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. नवा विचार आणि चिरंतन भूमिका ठेवली आहे . भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे . पण साहित्याच्या भाषेला कोणत्याही भाषेचे बंधन नाही . या संमेलनाच्या माध्यमातून साऱ्या जगाला पंजाबी साहित्याचे दर्शन होणार आहे.
श्री. पवार यांनी पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्याविषयी भाष्य केले . ते म्हणाले, देशामध्ये अनेक राज्य असून देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्वाची आहे . तरीपण भारतीय विचारसरणी हि सर्वात महत्वाची आहे . देशाच्या संरक्षणात आणि कृषी क्षेत्रात या दोन राज्यांचे योगदान मोठे आहे . देशाच्या एकतेची भावना अधिक बळकट होण्यासाठी संमेलन महत्वाचे आहे. संत नामदेव महाराज आणि संत गुरुनानक यांनी जो विचार दिला तो आजही जगाला मार्गदर्शक ठरणारा आहे .
सुरवातीला श्री. नहार यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. या संमेलनास सर्वांचा पाठिंबा असल्याने हे संमेलन जनतेचे आहे . सरकारकडून जरी मदत मिळाली नाही तरीही संमेलन यशस्वीपणे पार पडले जाईल . महापौर जगताप यांनी संमेलनास शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक मंत्री गिरीश बापट तसेच संतसिंग मोखा , अभिनेते धर्मेंद्र यांनी मनोगते व्यक्त केली.